Saturday 14 May 2022

#खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २१)... विनीत वर्तक ©


 #खारे_वारे_मतलई_वारे ( भाग २१)... विनीत वर्तक ©

"We have urged for a ceasefire. No one will win this war. All will lose. That's why, we are in favour of peace," ... नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत  

जर्मनी च्या दौऱ्यावर असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन, जर्मनी इकडे भारताची भुमिका स्पष्ट केली होती. रशिया- युक्रेन मधील युद्धाची सुरवात यापेक्षा रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारी २०२२ मधे आक्रमण केलं असं लिहिणं जास्त संयुक्तिक राहील. आज या घटनेला जवळपास ३ महिन्यांचा कालावधी होत आला पण नक्की हे युद्ध कोण जिंकणार किंवा कधी संपणार याबद्दल आजही जग सांशक आहे. कारण सध्या असलेली परिस्थिती अतिशय किचकट आहे. काही थोर अभ्यासकांनी भारताने रशियाची साथ सोडावी, युक्रेनला पाठिंबा द्यावा अश्या आशयाची मांडणी केली. कारण भारताने तसं केलं तर हेच अभ्यासक ७० वर्षाची काही पूर्व राजकारण्यांनी रशियाशी केलेली मैत्री कशी पाण्यात घालवली यावर रकाने भरून लेख लिहतील. रशिया सोबत राहिलं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून राजकारण्यांनी विचार केला नाही अशी आवई उठवतील. या सर्वावर बर्लिन इकडे भारतीय पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य अतिशय सूचक आहे. आम्ही कोणाच्या बाजूने नाहीत. या युद्धातून कोणीच जिंकणार नाही आणि सगळेच हरतील. मुळात सद्य परिस्थितीच आकलन सगळ्यात चांगल्या पद्धतीने भारताने केलं आहे. ते का? आणि कस हे इकडे आपण समजून घेणं गरजेचं आहे. 

१) रशियाने युक्रेन सोबत युद्ध केलं कशाला? 

या आधीच्या लेखात मी लिहिलं होतं की युद्धाची कारणं काय होती. युक्रेन ने नाटो सोबत जाणं रशियाला अजिबात मान्य नव्हतं आणि तोच सगळ्यात मोठा अडसर आजही आहे. युक्रेन असाही आधी रशियाचा भाग होता. तो आजही ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि समाजाने एकमेकांशी जोडलेला आहे. त्यामुळे रशियाच युक्रेन च्या राजकारणात तिथल्या परिस्थितीवर एक अदृश्य प्रभाव राहिलेला आहे. हाच प्रभाव अजून वाढवण्यासाठी, युक्रेनला युरोपियन आणि अमेरिकेपासून दूर करण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी एक आरपार ची कारवाई करण्याचं ठरवलं आणि ती प्रत्यक्षात अमलात आणली. 

२) या युद्धात कोण बरोबर कोण चुकीचं? हे युद्ध कोण जिंकेल? 

असं म्हणतात युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असते. त्यामुळे कोण बरोबर आणि कोण चूक या विचाराला काही अर्थ नसतो. पण या युद्धाने दोन्ही देशातील फरक मात्र उघडे केले आहेत. रशिया जिकडे तात्विक दृष्ट्र्या बरोबर आहे तिकडेच सैनिकी दृष्टीने बघता संपूर्णपणे चुकलेली आहे. जेव्हा हे युद्ध सुरु झालं तेव्हा मी लिहिलं होतं की फार फार तर ७२ तासात रशिया युद्धापेक्षा आपली सैनिकी कारवाई पूर्ण करेल. हा अंदाज जगातील युद्ध क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांचा ही होता. या अंदाजाला काही कारणं होती. ती म्हणजे रशिया आणि युक्रेनची सैनिकी शक्ती. कागदावर रशिया ची सेना त्यांची आयुध, मिसाईल, लढाऊ विमान, रणगाडे इत्यादी बाबतीत युक्रेन जवळपास कुठेच बसत नव्हता. रशियाच वायू दल युक्रेनपेक्षा १० पट मोठं आहे. जेव्हा लाखो सैनिक युक्रेन च्या सरहद्दीवर उभे राहून युक्रेन मधे प्रवेश करतील तेव्हा अवघ्या काही तासात युक्रेन च्या तटबंद्या ढासळतील असा अंदाज पुतीन, जगातील संरक्षण क्षेत्रातील विश्लेषक या सर्वांना होता. पण एका गोष्टीच आकलन करण्यात सगळेच कमी पडले. 

जवळपास ४५० वर्षापूर्वी महाराष्ट्रात औरंगजेब ही असच सैन्य घेऊन उतरला होता. आपणही बघता बघता महाराष्ट्रावर एकछत्री अंमल प्रस्थापित करू असा त्याचा अंदाज होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अवघ्या काही शेकडो मावळ्यांनी त्याच्या लाखाच्या सैन्याची वाताहात केली. आज हे सगळं सांगण्याचं कारण इतकच की आज रशिया- युक्रेन युद्धात कागदावर अतिशय वरचढ असणारा रशिया प्रत्यक्ष युद्धात चाचपडताना दिसतो आहे. रशियाने जरी युक्रेनमधील काही प्रांत जिंकला असला आणि युक्रेनच मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं असलं तरी विजयापासून रशिया आणि त्यांच सैन्य खूप लांब आहे. 

कोणत्याही सैन्यासाठी सगळ्यात महत्वाचं असते ते त्याच मनोबल. त्याच खच्चीकरण झालं की अर्ध युद्ध तिकडेच हरतो. रशियन सैन्याला कोणतीही तयारी न करता पुतीन यांनी युक्रेनवर ताबा घेण्याचे आदेश दिले. आपण कारवाई कशी करणार? नक्की काय त्यातून मिळवायचं आहे? त्या आक्रमणाची व्यूहरचना कशी  असेल? युद्धात सैन्याला इंधन, दारुगोळा आणि अन्न याची व्यवस्था काय असेल? जर युक्रेन ने प्रतिकार केला तर आपली व्यूहरचना कशी असेल? जर आपल्याला एखाद्या ठिकाणी माघार घ्यायला लागली तर त्यासाठी प्लॅन बी काय असेल? सगळ्यात महत्वाचं आपण नक्की लढाई कुठपर्यंत आणि कितीवेळ चालू ठेवायची? याचा कोणताही अभ्यास न करता सैन्याला पुढे जाण्याचे आदेश दिले गेले. 

रशियन सैन्य मजबूत असताना पण आपण आपल्याच लोकांवर गोळ्या का चालवतो आहोत? आपण नक्की एखाद्या शहरावर आक्रमण करून जिंकल्यावर काय करायचं? याची कोणतीच कल्पना त्यांना नव्हती. सगळ्यात मोठी अडचण ठरली ती रसद. पुढे गेलेल्या रशियन सैन्याला रसद मिळायला अडचणी सुरु झाल्या. रणगाडा घेऊन आलो तर युक्रेन मधे पण त्याला लागणारं डिझेल नसेल तर रणगाडा युक्रेन च्या रस्त्यावर सोडून रशियन सैन्य माघारी फिरत होतं. हिच अवस्था बाकीच्या बाबतीत. पेट्रोल,डिझेल, टायर, गोळ्या, जेवण, पाणी या गोष्टींची रसद त्यांच्या पर्यंत पोचवायला अडचणी यायला लागल्या. याच वेळी युक्रेन सैन्याने रशियन सैन्याचे कच्चे दुवे ओळखून तिकडेच संघर्ष केला. मैदानात समोरासमोर लढण्यापेक्षा त्यांना शहरात येऊन मग त्यांच्यावर गनिमी पद्धतीने हल्ले सुरु केले. युक्रेन च्या सैन्याला तिथल्या गल्ली बोळांची अचूक माहिती होती तर रशियन सैन्य या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ होतं. युक्रेन सैन्याने रशियन सैन्याच्या रसदीवर आक्रमण केलं. त्यांची रसद थांबवली. याचा परीणाम म्हणजे अनेक ठिकाणी जिंकलेला भूभाग सोडून रशियन सैन्याला माघारी परतावं लागलं. 

युक्रेन ला जरी नाटो ने आपल्यात स्थान दिलं नसलं तरी अमेरिका सह इतर नाटो राष्ट्रांनी रशियाला थोपवून धरण्यासाठी आपली हत्यार अक्षरशः युक्रेन मधे ओतली. अमेरिकेने दिलेल्या गन आणि अँटी टॅंक मिसाईल सिस्टीम नी रशियाच्या रणगाड्यांची अक्षरशः धूळधाण उडवलेली आहे. रशियाच वायू दल अद्यावत लढाऊ विमान असताना सुद्धा एअर सुप्रीमसी मिळवण्यात अयशस्वी ठरलं. रशियाची लढाऊ विमान एन्टी एअरक्राफ्ट मिसाईल ची लक्ष्य झाली. आत्तापर्यंत ७००० रशियन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर जवळपास २०,००० ते ४०,००० रशियन सैनिक जखमी झाले आहेत. हा आकडा अमेरिकेने गेल्या २० वर्षात अफगाणिस्तान मधे गमावलेल्या सैनिकांन इतका आहे. रशियाने २० वर्षातले सैनिक दोन महिन्यात गमावलेले आहेत. जवळपास जनरल लेव्हल च्या ७ रशियन सैन्य अधिकाऱ्यांचा यात मृत्यू झाला आहे. याचा अर्थ रशिया हरते आहे असा नाही. 

रशियाने तोडीस तोड नुकसान युक्रेन च केलं आहे. आत्तापर्यंत ४ मिलियन ( ४० लाख ) युक्रेन नागरिकांनी देश सोडला आहे. रशियाने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. ज्यात शहराच्या शहर बेचिराख झाली आहेत. युक्रेन मधील त्या शहरात पुन्हा लोकवस्ती होऊ शकणार नाही इतकं नुकसान झालेलं आहे. जवळपास ४००० युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत. कित्येक हजारो जखमी आहेत. २००० पेक्षा जास्त निष्पाप युक्रेनचे नागरिक यात मारले गेले आहेत. प्रत्येक दिवशी या आकड्यात वाढ होते आहे. रशियन सैन्याने आपली स्ट्रॅटर्जी आता बदललेली आहे. पण त्यांची आगेकूच चालू आहे. युक्रेन त्यांना तोंड देतो आहे. एकूणच काय तर कोणा एका राष्ट्राचा यात विजय होणं ही शक्यता जवळपास संपुष्टात आलेली आहे. जोवर हे युद्ध सुरु राहणार तोवर दोन्ही बाजूने नुकसानीचे आकडे वाढत जाणार. 

३) यात भारत  कुठे आहे? भारताच्या दृष्टीने हे युद्ध  चांगलं की वाईट? भारताची भुमिका योग्य की अयोग्य? 

भारताची भूमिका यात अतिशय योग्य आहे असं माझं वयक्तिक मत आहे. आपण कोणाची बाजू घ्यायची तशी गरज नाही. युद्ध वाईट आहे. चालू असलेला नरसंहार थांबवावा हीच भारताची भूमिका आहे. कारण या युद्धात कोणीच जिंकणार नाही हे स्पष्ट आहे. पण या युद्धामुळे जागतिक अर्थ व्यवस्थेची घडी मात्र रुळावरून घसरलेली आहे हे निश्चित आहे. रशिया, युक्रेन हे दोन्ही देश गहू आणि सूर्यफूल या दोघांच्या निर्यातीत जगात खूप वरच्या क्रमांकावर आहेत. साहजिक तिकडून यांची निर्यात थांबल्याने त्याचा फटका भारताला बसणार आहे. गव्हाच्या किंमतीत खूप वाढ झालेली आहे. त्यामुळेच भारताने गव्हाच्या निर्यातीवर प्रतिबंध लावले आहेत. खनिज तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेत वाढल्या आहेत. रशिया खूप मोठा पुरवठादार असल्याने आवक कमी आणि मागणीत वाढ झाली आहे. जरी भारताने रशियाकडून स्वस्त दरात क्रूड ऑइल घ्यायला सुरवात केली तरी ते भारताच्या एकूण गरजेचा १% हिस्सा व्यापत. त्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेल दरवाढ होणं अपेक्षित आहे. 

हे युद्ध थांबवण्याचे सगळे प्रयत्न भारत करत आहे. तिकडे अमेरिका हे युद्ध भडकवत आहे. समोरून रशियाने मानवतेची पायमल्ली केली अशी ओरड करायची आणि मागच्या दराने शस्त्रास्त्रांचा साठा युक्रेन मधे ओतायचा. एकीकडे युरोपियन युनियन, अमेरिका भारतावर रशिया विरोधी भूमिका घेण्यासाठी दडपण आणत आहेत. पण भारताने मांडलेली चर्चेची भूमिका त्यांना नको आहे. हे युद्ध थांबेल ते फक्त आणि फक्त तह होऊन. एकतर रशिया लढून लढून थकेल. स्वतःच जिंकलेला भूभाग घेऊन तात्पुरती युद्धबंदी करेल. कारण रशियाची अथवव्यस्था जास्ती काळ हे युद्ध सहन करू शकणार नाही. दुसरा पर्याय म्हणजे युक्रेन आणि रशियाने आपापसात चर्चा करून एक पाऊल मागे घेऊन युद्ध थांबवावं. या शिवाय अन्य कोणताही पर्याय सद्यस्थितीला शक्य दिसत नाही. 

त्यामुळेच भारतीय पंतप्रधानांनाच सूचक वक्तव्य संपूर्ण जगासाठी आत्ताच्या परिस्थितीच योग्य वर्णन आहे. भारताची या सगळ्यात भूमिका मला तरी खूप पटलेली आहे. येत्या काळात गोष्टी कश्या घडतील यावर वाऱ्यांची दिशा बदलू शकेल. पण तूर्तास जगाच्या डोक्यावर घोंगावणाऱ्या वादळाने शांत होण्यासाठी खारे आणि मतलई वाऱ्यांनी शांत होण्याची गरज आहे. त्यांना शांत करण्यात भारत येत्या काळात निर्णायक भूमिका बजावू शकतो. तसं झालं तर जागतिक पटलावर भारताचं स्थान अधिक मजबूत होईल यात शंका नाही. 

जय हिंद!!!

क्रमशः 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





No comments:

Post a Comment