Saturday 27 April 2019

चार्जिंग पॉइंट... विनीत वर्तक ©

चार्जिंग पॉइंट... विनीत वर्तक ©

आज आयुष्य धकाधकीच झालं आहे. उर फुटेस्तोवर आज प्रत्येकजण पुढे जाण्यासाठी, शर्यतीत राहण्यासाठी धावत आहे. ‘थांबला तो संपला’ ही म्हण आजच्या जगात अगदी तंतोतंत लागू पडते. कारण जागरहाटीमध्ये आपण थांबलो की काळाच्या पाठीमागे जायला वेळ लागत नाही. पण आज धावण्याची व्याख्या बदलली आहे. आधी आपण एक किंवा दोन शर्यतीत पळायचो पण आता आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक शर्यत झाली आहे. सगळ्या बाजूने लढाई करताना आपलीच होणारी दमछाक आपण कितीही नाकारली तरी हळूहळू अनेक घटनांन मधून बाहेर येत असते. दमछाक झाल्यावर आपली काळजी घेणारं ‘आपलं माणूस’ आज आपण सगळेच हरवून बसलो आहोत.

माणूस माणसाला पारखा झाला आहे. कारण माणसाकडे माणसासाठीच वेळ नाही अशी आपल्या आयुष्याची स्पर्धा सुरु झाली आहे. आज जिंकल्यावर झालेला आनंद आणि हरल्यावर वाटणार दुखं दोन्ही मोकळं करावसं वाटणार माणूस आणि त्याच ते निरागस मन दोन्ही हरवलं आहे. मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया ह्या सगळ्यात आपण अलगद अडकलो गेलो आहोत. कोणी कितीही अलिप्त व्हायचा प्रयत्न केला तरी तो किती वेळ? ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. ह्या सगळ्यांन पासून पळण हा एकमेव मार्ग आहे का? नक्की असं केल्याने आपल्याला हाताशी काही गवसत असलं तरी तितकचं निसटत ही असते हे कोणीच मान्य करायला तयार नसतो. आवडो अथवा न आवडो ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्या आहेत हे निर्विवाद सत्य आहेत.

कोणत्याही गोष्टीला पूर्ण करायला उर्जा लागते असं विज्ञान सांगते आणि ते माणसाच्या बाबतीत ही तितकंच खरं आहे. सतत आयुष्याच्या शर्यतीत पळण्यासाठी उर्जा लागते. त्यात वाढलेली स्पर्धा, बदललेले नात्यांचे संदर्भ, मोबाईल, इंटरनेट, सोशल मिडिया ह्यावरून होणाऱ्या गोष्टींचा भडीमार ह्यामुळे आपल्याला जास्ती उर्जेची गरज भासते. त्याचवेळी आपल्याला ह्या सगळ्यात उर्जा देणारे चार्जिंग पॉइंट आपण आपल्या माणसांच्या रूपाने गमावून बसलो आहोत. एके काळी प्रचंड मोठी कुटुंब आणि तितकेच विविध चार्जिंग पॉइंट असायचे. काका, मामा, दादा, ताई असे किती तरी विविध चार्जिंग पॉइंट आपल्या घरात असायचे. त्याची कमी भासली तर जोडीला आपले मित्र मैत्रीण असायचे. पण काळाच्या स्पर्धेत आपण हे सगळेच मागे सोडून बसलो आहोत.

एकेकाळी घरात भांडण झाल्यावर, चल सोड रे ! असं म्हणत खांद्यावर हात टाकून बोलणारा मित्र किंवा हातात हात घेऊन, समजू शकते ! असं बोलणारी मैत्रीण कधीच काळाच्या पडद्याआड गेली आहे. अडचणीच्या वेळेस धावून येणाऱ्या काका, मामा, दादांना आपण गेल्या कित्येक वर्षात भेटलो ही नसूं. दादा, ताई आज भेटताना फक्त आभासी जगातून आपल्या भिंतीवर डोकावतात आणि तिकडूनच अदृश्य होतात. खरे तर आज वाढलेल्या स्पर्धेत आपल्याला पुन्हा उर्जा देणारे हे चार्जिंग पॉइंट वाढायला हवे होते. पण आपण नकळत त्यांनाच मागे सोडून आलो आहोत. त्याचे परिणाम आज दिसत आहेत. मनाचा होणारा कोंडमारा, अदृश्य जगात जगण्याची सवय, आभासी जगातून मिळालेल्या कमेंट आणि लाईक्स वरून आज आपण आपल्या जिवनाच मूल्यमापन करत आहोत.

आज कुठेतरी आपल्याला अश्या चार्जिंग पॉइंट ची खूप गरज आहे. उर्जा मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी आधाराची गरज असते असं काही नाही. कोणीतरी एकूण घेणारं, कोणाकडे मन मोकळ करावसं वाटणार आणि ते केल्यावर मोकळं झालेल्या आकाशाप्रमाणे मनाला उभारी देणारे चार्जिंग पॉइंट पण आपल्याला खूप उर्जा देऊन जातात. आज कुठेतरी अश्या चार्जिंग पॉइंट ची खूप गरज प्रत्येकाला आहे. ते चार्जिंग पॉइंट अगदी आपल्या घरापासून ते आपल्या कार्याच्या क्षेत्रात ते अगदी आवडीच्या क्षेत्रात सगळीकडे असायला हवेत. कारण प्रत्येक चार्जिंग पॉइंट हा प्रत्येकवेळी देणारी उर्जा वेगवेगळ्या पातळीवर देणारा असेल. हे सगळे जर एकाचवेळी सगळ्या क्षेत्रात आपल्यासोबत असतील तर ह्या स्पर्धेच्या युगात आपण कधीच मागे पडणार नाहीत. पडलो तरी पुन्हा एकदा राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घ्यायला हेच पुन्हा आपल्याला उर्जा देतील. कोणी, कोणाला, कुठली उर्जा देणार चार्जिंग पॉइंट बनवायचं हे मात्र प्रत्येकाने आपलं ठरवायचं.

No comments:

Post a Comment