Monday 22 April 2019

#आयुष्य_जगलेली_माणसं.. भाग ९ ( पद्मश्री मुरलीकांत पेटकर )... विनीत वर्तक ©

सप्टेंबर १९६५ चा काळ होता. भारत पाकिस्तान युद्धाला सुरवात झाली होती. अश्याच एका रात्री मुरलीकांत पेटकर सियालकोट इकडे आपल्या युनिटसह सकाळच्या साखर झोपेत होते. त्याचवेळी एका पाकिस्तानी सैनिकाने त्यांच्या युनिटवर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. काय होते आहे कळायच्या आत सगळीकडे अफरातफरी माजली. ह्या सगळ्यात समोरून येणाऱ्या एक, दोन नाही तर तब्बल सात गोळ्या मुरलीकांत पेटकर ह्यांच्या शरीरात घुसल्या. इतक्या गोळ्या शरीरात घुसल्यावर सामान्य माणसाने इहलोकाकडे प्रस्थान केलं असतं पण खेळाडू असणाऱ्या पेटकरांनी यमाला थांबवलं. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी भारतीय सेनेत बॉक्सिंग चं राष्ट्रीय पदक जिंकणारे मुरलीकांत पेटकर ह्यांनी आधीपासून खेळात प्राविण्य मिळवलेलं होतं. त्यांच्या ह्याच खिलाडूवृत्तीने त्यांना पुन्हा जीवनदान दिलं. पण ह्या गोळ्यांनी त्यांचा कंबरे खालचा भाग निकामी करून टाकला होता. १९६५ च्या युद्धामधील शौर्याबद्दल त्यांना रक्षा मेडल ने सन्मानित करण्यात आलं.

१९६५ सालच्या त्या हल्यात जखमी झाल्यावर ही त्यांनी आपली खिलाडूवृत्ती जोपासली. आपल्या शरीराच्या अपंगत्वावर मात करताना त्यांनी १९६७ ला भालाफेक, थाळीफेक, टेबल टेनिस, तिरंदाजी ह्या सर्व खेळात महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला. भारतीय सेनेची शिस्त, व्यायामा सोबत आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी खेळत पुन्हा पुनरागमन केलं. १९६९ मधून भारतीय सेनेच्या सेवेतून मुक्त झाल्यावर पुढे काय हा प्रश्न होता. जे. आर. डी. टाटांनी १९६५ च्या युद्धातील सैनिकांसाठी मदत करण्याची तयारी दाखवली होती. पण तात्पुरती मदत घेऊन सहानभूती च्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा मुरलीकांत पेटकर ह्यांनी जे.आर.डी. टाटांकडे सन्मानाने काम करून देण्याची मागणी केली. तेव्हा टाटांनी त्यांना पुण्याच्या टेल्को मध्ये नोकरी दिली. ह्या नंतर मुरलीकांत पेटकरांनी तब्बल ३० वर्षाच योगदान टेल्को च्या उभारणीत दिलं. (विनीत वर्तक ©)

१९६० – ७० च्या दशकात भारतात खेळाचा दर्जा खूपच दुय्यम होता. खेळासाठी कोणतीही तरतूद नव्हती. त्यात दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी तर काहीच नाही. पण त्याही काळात मुरलीकांत पेटकर ह्यांनी जागतिक पॅरालिंपिक्स स्पर्धा जी हायडेलबर्ग, जर्मनी इकडे आयोजित करण्यात आली होती त्यात भाग घेतला. त्यात ५० मीटर फ्री स्टाईल पद्धतीने पोहण्याच्या स्पर्धेत ३७.३३ सेकंदांचा जागतिक विक्रम नोंदवत सुवर्ण पदक पटकावलं. पॅरालिंपिक्स स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावणारे मुरलीकांत पेटकर हे पहिले भारतीय ठरले. त्याआधी ही मुरलीकांत पेटकर ह्यांनी १९७० सालच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत ५० मीटर फ्री स्टाईल पोहण्यात सुवर्ण तर भाला फेकीत रौप्य तर गोळा फेक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई भारतासाठी केली होती. त्या काळात खेळासाठी उदासीन असणाऱ्या भारतात त्यांच्या ह्या भीमपराक्रमाची नोंद खेदाने घेतली गेली नाही. त्यांचा हा पराक्रम देशापासून लपून राहिला. (विनीत वर्तक ©)

आपल्या ह्या पराक्रमाची दखल घेण्यासाठी मुरलीकांत पेटकर ह्यांनी तत्कालीन सरकारकडे पाठपुरावा केला. अपंग म्हणून त्यांना देशाच्या सर्वोच्च अश्या अर्जुन पुरस्कारापासून सरकारने त्यांना वंचित ठेवलं. १९७५ ला महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च असा शिव छत्रपती पुरस्कार मिळूनसुद्धा तिन वेळा सरकारने अर्जुन पुरस्कार देण्यासाठी नकार दिला. कधी अपंग म्हणून तर कधी त्यांनी केलेल्या पराक्रमाला लोटलेला कालावधी आता खूप जास्ती आहे असं सांगत त्यांना परतीची वाट दाखवण्यात आली. १ नोव्हेंबर १९४७ ला पेठ इस्लामपूर ह्या सांगली जिल्ह्यात जन्माला आलेल्या मुरलीकांत पेटकरांनी सरकार कडून कोणत्याही पुरस्कार अथवा आपल्या पराक्रमाची नोंद घेण्याची आशा सोडून दिली होती. (विनीत वर्तक ©)

गेल्या काही वर्षात भारत सरकारने पुरस्कार वितरणाच्या एकूण पद्धतीत अमुलाग्र बदल केला. त्याचाच परिणाम म्हणून विस्मृतीत गेलेल्या मुरलीकांत पेटकर ह्याचं नाव गो स्पोर्ट फौंडेशन सोबत राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर ह्या भारताच्या क्रिकेट खेळातील दिग्गजांनी सरकारकडे सुचवलं. सचिन तेंडूलकर ने मुरलीकांत पेटकर ह्यांना १५ लाख रुपयांची मदत केली तर राहुल द्रविड ने त्यांच्या नावाची शिफारस भारत सरकारकडे केली. त्यांच्या पराक्रमाला जवळपास ४४ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटल्यावर भारत सरकारने २०१८ साली भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच “पद्मश्री” पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं. सरकार दफ्तरी आलेल्या कटू अनुभवानंतर मुरलीकांत पेटकर ह्यांनी सर्व आशा सोडल्या होत्या पण जानेवारी २०१८ ला भारत सरकार कडून आलेल्या एका पत्राने ह्या खेळाडूच्या डोळ्यात एक लढाई जिंकल्याचा आनंद झाला. उशिरा का होईना भारत सरकारने पॅरालिंपिक्स स्पर्धेत भारताला पाहिलं सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या ह्या सैनिकाचा गौरव केला. (विनीत वर्तक ©)

युद्धात ७ गोळ्या अंगावर झेलत ज्यातली एक गोळी अजूनही त्यांच्या मणक्यात रुतलेली आहे अश्या परिस्थितीत आलेल्या अपंगत्वाला बाजूला सारत जिद्दीने जागतिक स्पर्धेत भाग घेऊन भारताचा तिरंगा अटकेपार फडकवणाऱ्या मुरलीकांत पेटकर ह्यांना माझा सलाम. तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर्श येणाऱ्या अनेक पिढ्यांना अपंगत्व, कोणतही व्यंग असताना ही सर्वोच्च कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. एक असाधारण आयुष्य जगलेल्या मुरलीकांत पेटकर ह्यांना माझा साष्टांग दंडवत.

माहिती स्त्रोत :- गुगल.

फोटो स्त्रोत :- गुगल.



सूचना :- ह्या पोस्ट मधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट असून नाव काढून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई होईल.

No comments:

Post a Comment