Thursday 3 November 2022

एका डिफेन्स ची गोष्ट... विनीत वर्तक ©

 एका डिफेन्स ची गोष्ट... विनीत वर्तक ©

असं म्हणतात की, एखादं युद्ध जगाचा नकाशा बदलू शकतं आणि ते अनेक अर्थाने खरं ही आहे. आजवरच्या इतिहासात आपण दोन महायुद्ध अनुभवलेली आहेत. भारतावर अनेकवेळा परकीय आक्रमण होत आलीच आहेत. आत्ताचा काळ ही काही वेगळा नाही. १९९९ साली भारताला कारगिल युद्धाचा चटका लागलाच. पण अनेकवेळा युद्ध तुमच्यातले कच्चे दुवे पण आपल्याला दाखवून जातात. हीच वेळ असते जेव्हा आपण आपल्यातील त्या कच्या दुव्यांवर काम करायचं असते. कारगिल युद्धातुन भारताच्या अनेक बाजू उघड्या पडल्या. त्यातील एक बाजू म्हणजे शत्रूने आपल्यावर मिसाईल ने हल्ला केला तर तो थोपवण्याची ताकद आपली आहे का? याच उत्तर ठळकपणे नाही असं होतं. तेव्हा मग अश्या कोणत्याही मिसाईल हल्यापासून वाचवण्यासाठी डिफेन्स यंत्रणा बनवण्याची योजना आखली गेली. २००० साली वाजपेयी सरकारच्या काळात या योजनेला मूर्त स्वरूप देण्यात आलं. ज्याचं नाव होतं 'Indian Ballistic Missile Defence Program'.

पाकिस्तान आणि चीन असे दोन अणवस्त्रधारी शत्रू देश भारताच्या सरहद्दीवर दोन्ही बाजूने सज्ज असताना त्यांच्या मिसाईल हल्याला निष्प्रभ करण्यासाठी भारताला एका मिसाईल डिफेन्स प्रणाली ची गरज ओळखून भारताने द्वि स्तरीय मिसाईल डिफेन्स प्रणाली कार्यक्रम हाती घेतला. यातला पहिला स्तर म्हणजे Prithvi Air Defence (PAD) missile. ही डिफेन्स प्रणाली अतिउंचीवरून भारताच्या दिशेने येणाऱ्या मिसाईल चा मागोवा घेत त्याचा खात्मा करते. याची क्षमता ५० किलोमीटर ते ८० किलोमीटर उंचीवरील कोणत्याही मिसाईल ला रोखण्याची आहे. तर दुसरी आहे Advanced Air Defence (AAD) Missile ही डिफेन्स प्रणाली ३० किलोमीटर च्या आतील भारताकडे झेपावणाऱ्या मिसाईल चा खात्मा करू शकते. भारताने आधीच PAD ही प्रणाली कार्यांवित केली आहे. आता भारत वेगाने (AAD) वर काम करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतो आहे. त्याचा भाग म्हणून भारताने बुधवारी यातील AD-1 या मिसाईल ची यशस्वी चाचणी घेतली. 

AD-1 हे एक लांब पल्ल्याचे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आहे जे लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि विमानांच्या कमी एक्सो-वातावरण आणि एंडो-वातावरणाच्या इंटरसेप्शनसाठी डिझाइन केलेले आहे. हे दोन-स्टेज सॉलिड मोटरद्वारे चालविले जाते आणि मिसाईल ला लक्ष्यापर्यंत अचूकपणे मार्गदर्शन करण्यासाठी स्वदेशी विकसित प्रगत नियंत्रण प्रणाली, नेव्हिगेशन आणि मार्गदर्शन अल्गोरिदमने सुसज्ज करण्यात आलेलं आहे. या चाचणीत सर्व मिसाईलच्या उप-प्रणालींनी अपेक्षेनुसार कामगिरी केली आणि फ्लाइट डेटा कॅप्चर करण्यासाठी तैनात केलेल्या रडार, टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग स्टेशन्ससह अनेक इतर सेन्सर्सद्वारे कॅप्चर केलेल्या डेटाद्वारे हे प्रमाणित केलं गेलं की ही चाचणी १००% यशस्वी झालेली आहे. भारताच्या संरक्षण सिद्धतेत यामुळे अजून वाढ झालेली आहे. 

भारत जगातील मोजक्या ६ देशांपैकी एक देश आहे ज्याच्याकडे स्वतःची मिसाईल डिफेन्स प्रणाली कार्यरत आहे. तसेच भारत जगातील ४ देशांपैकी (अमेरिका, रशिया, चीन हे इतर तीन देश) ज्याच्याकडे उपग्रह हल्ला निष्प्रभ करण्याचं मिसाईल डिफेन्स तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भारत जगातील असा एकमेव देश आहे ज्याच्याकडे स्वतःच्या मिसाईल डिफेन्स प्रणाली सोबत जगातील सगळ्यात प्रगत पहिल्या दहा मिसाईल डिफेन्स प्रणालीतील दोन मिसाईल डिफेन्स प्रणाली कार्यरत आहेत. ज्यात भारत - इस्राईल संयुक्तरित्या विकसित केलेली बराक - ८ आणि जगातील सर्वोत्तम मिसाईल डिफेन्स प्रणाली एस ४०० यांचा समावेश आहे. या प्रत्येक प्रणाली च स्वतःच असं कार्यक्षेत्र आहे. भारत अश्या वेगवेगळ्या मिसाईल डिफेन्स प्रणाली एकमेकात मिसळून स्वतःभोवती एक अभेद्य संरक्षण कवच निर्माण करण्याच्या दृष्टीने वेगाने पुढे जातो आहे. 

रशियाने उपग्रहाला मारता येईल अश्या पद्धतीची मिसाईल डिफेन्स प्रणाली एस ५०० निर्माण केली आहे. ज्याच्या चाचण्या सुरु आहेत. रशियाने ही प्रणाली जगात फक्त भारतासाठी उपलब्ध केली आहे. सप्टेंबर २०२१ मधे रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह म्हणाले होते की,  "भारत एस ५०० विकत घेणारा एक संभाव्य देश असू शकतो". येत्या काही वर्षात भारत कदाचित एस ५०० मिसाईल डिफेन्स प्रणाली विकत घेण्याचा करार रशियासोबत करण्याची दाट शक्यता आहे. एस ५०० प्रणाली हायपरसॉनिक मिसाईल ला सुद्धा निष्प्रभ करण्यास सक्षम असल्याने चीन वर अंकुश ठेवण्यासाठी भारत याचा विचार करत आहे. 

ऑफेन्सिव्ह डिफेन्स हाच सुरक्षित राहण्याचा कलियुगातील मंत्र आहे. भारताने कधी कोणत्या देशावर हल्ला केला नाही पण भारतावर होणाऱ्या हल्ल्यांना चोख प्रतिउत्तर देण्यासाठी भारताने मिसाईल डिफेन्स प्रणालीत लवकरात लवकर आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. २ नोव्हेंबर रोजी झालेली AD-1 या मिसाईल च्या यशस्वी चाचणीने भारताने एक दमदार पाऊल पुढे टाकलं आहे. या चाचणीमागे असणाऱ्या सर्व वैज्ञानिक, अभियंते, कामगार, आणि अनेक छोटे मोठे उद्योग ज्यांनी याच्या निर्मितीत आपलं योगदान दिलं आहे त्यांना कडक सॅल्यूट.     

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



No comments:

Post a Comment