Friday 25 November 2022

एक से भले दो, दो से भले तीन... विनीत वर्तक ©

एक से भले दो, दो से भले तीन... विनीत वर्तक ©

गेल्या आठवड्यात इंडोनेशिया मधल्या बाली इकडे जी २० शिखर परिषद म्हणजेच संमेलन झालं. जगातील महत्वाच्या भारतासह सगळ्या १९ राष्टांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या वर्षीच संमेलन भारतासाठी अनेक कारणांनी महत्वाचं होतं. खरे तर जी २० म्हणजे काय? त्याचा हेतू काय? त्यातून त्यात भारताचं असलेलं स्थान? यावर्षी ते महत्वाचं का? हे सगळं घडवून आणण्यात काय पावलं टाकली गेली आहेत हे आपण समजून घेणं महत्वाचं आहेच पण हे घडवून आणण्यात आणि भारताची एक वेगळी प्रतिमा जागतिक स्तरावर निर्माण करण्यात ज्यांनी योगदान दिलं आहे ते पडद्यामागचे सूत्रधार ओळखणं ही तितकं महत्वाचं आहे. 

जी २० किंवा ग्रुप ऑफ २० हा एक आंतरराष्ट्रीय देशांचा एक समुदाय आणि मंच आहे. १९९० च्या दशकात आलेल्या मंदीच्या सावटानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अश्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी आणि एकत्रितपणे लढा देण्यासाठी या गटाची १९९९ साली स्थापना झाली. १९ देशांसह युरोपियन युनियन या समुहाचा भाग झाले. जी २० हा जगातील एक शक्तिशाली राष्ट्रांचा समुह आहे. जगातील ८५% जी.डी.पी. चा हिस्सा याच समूहातील राष्टांकडे आहे. जगातील ७५% व्यापाराचा हिस्सा आणि या पृथ्वीवरील ६०% जनता ही याच देशांचा हिस्सा आहे. यावरून लक्षात येईल की जी २० किती महत्वाचा समूह आहे. १९९९ पासून भारत याचा सदस्य देश असूनसुद्धा भारताला याचं सारथ्य करण्याची संधी आजवर दिली गेली नव्हती. पण येत्या वर्षात भारताला जी २० च नेतृत्व करण्याची संधी दिली गेली आहे. २०२२ ते २०२३ या काळात भारत जी २० च सारथ्य करणार आहे. कोणाला वरवर वाटेल की ही एक सामान्य घटना आहे. प्रत्येक देशाला संधी मिळाली तशी आपल्याला मिळाली. पण दिसते तसं नसते म्हणूनच जग फसते ही युक्ती इकडे तंतोतंत लागू आहे. 

जी २० मधील प्रगत देशांची आपसात खूप भांडणे आहेत. अगदी अमेरिकेपासून ते भारतापर्यंत प्रत्येक देश वेगवेगळ्या पद्धतीने आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी झटतो आहे. कोरोना महामारी आणि आता सुरु असलेलं रशिया- युक्रेन युद्ध यामुळे जागतिक व्यापाराची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. अश्या काळात जगातील प्रगत देशांच्या अर्थकरणाचे नेतृत्व भारताकडे येण्यामागे अनेक चाली खेळल्या गेल्या आहेत. जग सध्या स्थितंतरातून जात आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या एकाकडून दुसऱ्याकडे सरकत आहेत. वर्चस्वासाठी अनेक चाली रचल्या जात आहेत. एकीकडे अमेरिका आणि चीन यांच्यात एक प्रकारे सुप्त कुरघोडी सुरु आहेत तर दुसरीकडे अमेरिकेसह नाटो देश रशिया विरुद्ध उभे ठाकले आहेत. तर तिसरीकडे रशिया आणि चीन या सर्वांना उत्तर देण्यासाठी कधी नव्हते इतके जवळ आले आहेत. तिकडे जपान, पूर्व आशियायी देश आणि चीन साऊथ चायना समुद्रात युद्धजन्य स्थितीत एकमेकांसमोर उभे आहेत तर तिकडे उत्तर कोरिया एकावर एक मिसाईल सोडून आपण विनाशासाठी तयार असल्याचा संदेश जगाला देत आहे. 

जागतिक परिस्थिती इतकी हाताबाहेर जात असताना पण जागतिक मंचावर अतिशय सडेतोड आणि व्यापक अशी भूमिका गेले काही वर्ष मांडणाऱ्या भारताच्या विदेश नीती च जगभर कौतुक झालं आहे. एकीकडे आपलं मत हे कोणाच्या दबावाखाली न मांडता आणि त्याचवेळी कोणताही पक्षपात न करता स्वतःच हित साधून घेताना जगात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारताच्या शब्दाला वजन आलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आता आलेलं जी २० समूहाचं नेतृत्व. सुरक्षा आणि विदेशनीती या दोन्ही मुद्यावर भारताने अतिशय दमदार मजल गाठली आहे. याला कारणीभूत आहेत पडद्यामागचे भारताचे दोन शिल्पकार जे अहोरात्र यासाठी पडद्यामागून काम करत आहेत. युक्रेन- रशिया मुद्दा असो वा भारत - अमेरिका संबंध, खनिज तेलाचा मुद्दा असो वा भारत चीन मधील तणाव असो पडद्यामागून भारताच्या प्रत्येक पावलाला जगातून समर्थन मिळवून देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या आहेत. याच सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या जी २० परिषदेत भारताच्या पंतप्रधानांनी रशियाचे प्रेसीडेंट पुतीन यांना उद्देशून म्हंटलेलं वाक्य जी २० च्या संयुक्त मसुद्यात (अहवालात) ४ थ्या क्रमांकावर लिहिलं गेलं आहे. इकडे लक्षात घेण्यासारखं म्हणजे याला जी २० च्या रशियासह सर्व देशांनी समर्थन दिलं आहे.  

या सर्व गोष्टी जरी समोर सहज वाटत असल्या तरी त्यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी होत असतात. कोणत्याही दोन राष्टांचे राष्ट्राध्यक्ष असेच सहज भेटत नाहीत. त्यातली मित्रता, सहजता किंवा त्यातील अंतर किती ठेवायचं याचे सर्व आराखडे आणि बांधणी ही दोन्ही देशाच्या प्रतिनिधींकडून आधीच झालेली असते आणि त्याची माहिती मग राष्ट्रप्रमुखाला देण्यात येते. त्या नंतर आपण समोरच्या पासून किती अंतर राखायचं की गळ्यात गळे घालायचे हे ठरवलं जाते. नुकत्याच झालेल्या जी २० परिषदेच्या बैठकीत भारताच्या पंतप्रधानांचा वावर हा किती आश्वासक आणि आत्मविश्वास दर्शवणारा होता हे त्यांची आणि त्यांना भेटलेल्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाच्या देहबोलीवरून आपण बघू शकतो. या सर्वामागे भारताची उजळलेली प्रतिमा आणि वाढलेला दबदबा हा कारणीभूत असला तरी त्याची जाणीव योग्य प्रकारे करून देण्यात पडद्यामागे अनेक चक्र फिरवली गेली आहेत. याचे शिल्पकार आहेत भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवाल. 

जी २० च अध्यक्षपद म्हणून भारतात येत्या एका वर्षात जवळपास २०० बैठका वेगवेगळ्या समित्यांच्या होणार आहेत. ज्यात या २० देशांचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. त्याचा भाग म्हणून भारताच्या अनेक भागात त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या बैठकांमधील काही बैठका या जम्मू आणि काश्मीर सह अरुणाचल प्रदेश मधे होतील असं भारताने स्पष्ट केलं आहे. हे दोन्ही भूभाग आंतरराष्ट्रीय पातळीवर वादाचे भूभाग राहिलेले आहेत. एकावर पाकिस्तान आपला हक्क सांगतो तर दुसऱ्यावर चीन. पण दोघांच्या नाकावर टिच्चून जेव्हा इकडे जी २० समितीच्या बैठक होतील तेव्हा भारताने एका दगडात दोन पक्षी मारलेले असतील. ज्या अर्थी जी २० च्या बैठका जर त्या भागात होऊ शकतात तर तो भाग भारताचा अधिकृत भाग आहे यावर शिक्कामोर्तब होते आणि त्याच सोबत जी २० देशाचे प्रतिनिधी तिकडे बैठक घेऊ शकतात तर सुरक्षिततेच्या दृष्टीने तो भाग सामान्य आहे असा मोठा संदेश जागतिक पातळीवर जाणार आहे. त्यामुळेच जागतिक मंचावर गेली अनेक दशके री ओढल्या जाणाऱ्या या मुद्यांवर भारताने जी २० देशांची मोहर बसवल्यात जमा आहे. 

जी २० च अध्यक्षपद मिळणं हे म्हणूनच अनेक अर्थाने भारतासाठी महत्वाचं असणार आहे. पुढील एक वर्ष अनेक बाबतीत भारताची भूमिका ठळक उठून दिसणार आहे. भारताने आपल्या या कालावधीसाठी जे ब्रिदवाक्य निवडलं आहे त्यात खूप काही स्पष्ट होते आहे,  

'वसुधैव कुटुम्बकम' 

''One Earth, One Family, One Future' 

प्रगत देश आणि प्रगतिशील देश यातला सगळ्यात मोठा दुवा म्हणून भारताकडे दोन्ही बाजूने बघितलं जात आहे. आज भारताची जी छबी तयार झाली आहे त्यामागे पडद्यामागून सुत्र हलवणाऱ्या भारताच्या दोन महत्वाच्या व्यक्तींचा खूप मोठा वाटा आहे. या दोन्ही व्यक्ती जगात देशप्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचा दरारा त्यांच्या कामामुळे आणि त्यातील प्रत्येक व्युव्हरचेनसाठी आहे. या दोन्ही व्यक्तींना भारताचे हुकमाचे एक्के मानलं जाते. त्यामुळेच आज भारताकडे जी २० सारख्या मोठ्या समूहाचं अध्यक्षपद आलेलं आहे. या व्यक्तींची योग्य जागी निवड करून भारताला जागतिक पातळीवर मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांच ही तितकं कौतुक आहे. 

येत्या एका वर्षात जी २० च्या निमित्ताने ज्या चाली या दोघांकडून पडद्यामागून खेळल्या जातील त्या निश्चित भारताला येत्या काळात एक महत्वाचं स्थान जागतिक मंचावर मिळवून देणार आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य  :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




No comments:

Post a Comment