Saturday 22 June 2019

मंदिरांच विज्ञान भाग १६... विनीत वर्तक ©

मंदिरांच विज्ञान भाग १६... विनीत वर्तक ©

भारतात मंदिरांची निर्मिती हजारो वर्षापासून झालेली आहे. कित्येक मंदिरांना १००० वर्षापेक्षा जास्ती कालावधी लोटला आहे. इतक्या प्रचंड कालावधी नंतर सुद्धा ह्यातील अनेक मंदिरांच सौंदर्य आजही टिकून आहे. ह्यातील प्रत्येक मंदिर हे आपल्यामागे काही न काही इतिहास, पौराणिक कथा, भूगोल, स्थापात्यशास्त्र, कला, संगीत, शास्त्र ते विज्ञान आणि तंत्रज्ञान घेऊन आजही काळाच्या कसोटीवर उभं आहे. पण काळाच्या ओघात, परकीय आक्रमणांनी त्यांची पडझड झाली असली तरी त्यांच्या निर्मितीमागचं तंत्रज्ञान आजही अनेक वैज्ञानिकांना बुचकळ्यात टाकते. ह्या मंदिरावर असलेली शिल्पकला, त्यांच्या निर्मिती मध्ये वापरलं गेलेलं गणित, त्यातला स्थापात्यशास्त्र, अभियांत्रिकी, विज्ञानाचा भाग आजही रहस्य आहे. रहस्य ह्यासाठी की आज विज्ञानाच्या कक्षेत काही प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला तरी ह्या सर्व गोष्टी ७०० ते १२०० वर्षापूर्वी कश्या शक्य झाल्या असतील ह्याच उत्तर आज कोणीच देऊ शकत नाही.

हिंदू धर्मात भगवान शंकराच महत्व सर्वोच्च आहे. ज्याला सृष्टीचा नाश करणारा ते सृष्टी निर्माता असं म्हंटल गेलं आहे. म्हणून शंकराची सर्वच मंदिरे ही सगळ्याच बाबतीत भव्यदिव्य, कलाकुसरेने नटलेली, विज्ञान- तंत्रज्ञान ह्यांची कास धरणारी बांधली गेली आहेत. त्यामुळेच आज इतके वर्षानंतर त्यामागचं तंत्रज्ञान काही प्रमाणात आपल्याला लक्षात आलं तरी त्याची उकल आजही एक कोडं आहे. भगवान शंकराला वाहिलेलं असचं एक मंदिर भारतात आहे ज्याच नावं आहे ‘विरूपक्षा मंदिर’ कर्नाटक मधील हंपी इकडे असलेलं हे मंदिर शंकराला वाहिलेलं असून ह्याची निर्मिती देवराया २ ह्या विजयनगरी साम्राज्याच्या राजाच्या काळात झाली आहे. साधारण १५६५ च्या सुमारास विजयनगरी साम्राज्य लयाला गेल्यावर ह्या ठिकाणी परकीय आक्रमणांनी ह्या साम्राज्याची राजधानी असणाऱ्या हंपी शहराची प्रचंड नासधूस केली. इकडे असलेली अनेक मंदिरे त्यातील शिल्पकला नष्ट केली. पण त्यात विरूपक्षा मंदिर हे वाचलं. आज तब्बल ७०० वर्षानंतर त्या साम्राज्याच्या खुणा घेऊन उभं आहे.

भारताच्या दक्षिण भागातील मंदिरांन प्रमाणे हे मंदिर प्रचंड अश्या शिल्प कलेने नटलेलं आहे. ह्या मंदिरात असलेल्या खाबांची रचना आणि ह्या मंदीराच स्थापात्यशास्त्र हे खूप उच्च दर्जाच आहे. ह्या मंदिरातील प्रत्येक गोष्ट समानतेने उभारली गेली आहे. ह्या मंदिराचा १० वर्षापेक्षा जास्त काळ अभ्यास केल्यावर डॉक्टर क्याथेलीन कमिन्स ज्या की यु.ए.बी. डिपार्टमेंट आर्ट आणि आर्ट हिस्ट्रीमध्ये प्रोफेसर आहेत असा निष्कर्ष काढला आहे की,

“ For a long time, there was an assumption that the sculptures on the outside of Hindu temples didn’t necessarily mean anything as a group. However, these figures are more than just architectural decoration. they were certain, very conscious choices being made as to where deities and specific forms of deities were placed”

हे वाचल्यावर लक्षात येते की कोणतीही मूर्ती कशी असावी, कुठे असावी, कोणत्या पद्धतीची असावी अथवा मंदिराचा कोणत्या भागाचा आकार कसा असावा ह्याचा पूर्ण अभ्यास केला गेला होता. त्यानंतर त्यांची निर्मित केली गेली आहे.

विरूपक्षा मंदिराच्या पूर्वे कडे असणाऱ्या प्रवेश द्वारावर असणाऱ्या गोपुराची उंची जवळपास ५२ मीटर (१६५ फुट उंच X १५० फुट लांबी X १२० फुट रुंदी ) असून हा गोपूर ९ मजल्यांचा आहे. ह्याची निर्मिती जवळपास ७०० वर्षापूर्वी झाली असून आजही सुस्थितीत उभा आहे. (आजकाल ४ मजल्यांची बिल्डींग ४० वर्ष उभी नाही रहात तर ९ मजल्यांचा अवाढव्य असा ७०० वर्षापूर्वीचा गोपूर व्यवस्थित आहे. ह्यात देव कुठे नसून त्याकाळी बांधकाम करण्यासाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान, विज्ञान कारणीभूत आहे.) असे गोपूर दक्षिण भारतातील अनेक मंदिरात बघायला मिळतील पण ह्या गोपुराच वैशिष्ठ थोडं वेगळं आहे.

विरूपक्षा मंदीरामध्ये तंत्रज्ञानाचा एक आविष्कार बघायला मिळतो ज्याचं रहस्य अजूनही गुलदस्त्यात आहे. ह्या मंदिरात पिनहोल कॅमेरा तंत्रज्ञांनाचा वापर केला आहे. ह्या गोपुरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या मंदिराच्या एका भागात ह्या गोपुराची सावली उलट पडते. हा भाग मंदिराच्या आतल्या बाजूस आहे. त्यामुळे अशी सावली कशी काय पडत असेल ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आपल्याला पिनहोल कॅमेराच तंत्रज्ञान समजून घ्यावं लागेल. प्रकाश पडणाऱ्या एखाद्या पडद्यावर असणार एक लहान छिद्र त्यावर पडणाऱ्या सर्व प्रकाशाला एकत्रित एका ठिकाणी करून समोर असणाऱ्या गोष्टींची प्रतिमा बनवू शकते. एखादी चांगली प्रतिमा मागच्या बाजूस निर्माण होण्यासाठी ह्या छीद्राचा आकार आणि मागच्या पडद्याच त्याच्यापासून असलेलं अंतर ह्याचं गुणोत्तर साधारण १/१०० पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. विरूपक्षा मंदिराच्या गोपुरामुळे सूर्याची किरणे अडवली जातात. पण गोपुराच्या बाजूने येणारी सूर्यकिरणे मात्र मागे असलेल्या मंदिरावर पडतात. मंदिर बांधताना एक छोट छीद्र त्यात योग्य ठिकाणी बनवून “पिनहोल कॅमेरा” तंत्रज्ञान वापरून त्याची प्रतिमा मागच्या भिंतीवर उलटी उमटेल अशी रचना केली अगेली आहे.

कॅमेरा तंत्रज्ञानाने प्रतिमा निर्माण करण्याचा शोध साधारण १८१६ च्या आसपास लागला असा आजचा इतिहास सांगतो. पण सूर्य प्रकाशाच्या किरणांना एकत्र करून एका ठिकाणी फोकस करण्याच तंत्रज्ञान ह्या मंदिरात तब्बल ७०० वर्षापूर्वी वापरलं गेलं आहे. म्हणजे छायाचित्र निर्मिती करण्यासाठी लागणार तंत्रज्ञान भारतात अवगत होतं. जर हे तंत्रज्ञान अवगत नसेल तर त्या छीद्राचा आकार किती असावा? छीद्र आणि मागचा पडदा ह्यांच्या अंतरातील गुणोत्तर किती असावं ह्याच गणित सोडवल्या शिवाय अश्या उलट्या प्रतिमेची निर्मिती अशक्य आहे. इकडे हे छिद्र आरश्याच पण काम करून गोपुराची उलटी प्रतिमा मागच्या भिंतीवर आजही दाखवते.



आजही आपण फक्त असं तंत्रज्ञान वापरलं असेल ह्याचा अंदाज बांधू शकतो. त्यांनी ह्याची निर्मिती कशी केली? का केली? हे तंत्रज्ञान पुढे कुठे लुप्त झालं? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजही आजचं विज्ञान देऊ शकत नाही. भारतातील प्रत्येक मंदिर हे नाविन्यपूर्ण गोष्टी आणि वैशिष्ठ ह्यांनी ओतप्रोत भरलेलं आहे. पण ते बघण्यासाठी देव, देव न करता त्या मंदिराच्या श्रद्धेला नमन करत तंत्रज्ञानाची कास धरून शोधण्याची गरज आहे.

माहिती स्रोत :- गुगल, विकिपिडिया, इतर तत्सम इंटरनेट लिंक

फोटो स्रोत :- विकिपिडिया, गुगल





No comments:

Post a Comment