Monday 17 June 2013


सखी R A,
गेले २० वर्ष बघतो आहे तुला. ८ वीच्या क्लास मधली आपली ओळख इतकी वर्ष टिकून राहील अस अजिबात वाटल नव्हत. पहिला दिवस क्लास चा आणि आपण दोघेही पहिल्या रांगेत. तुझी ओळख सुद्धा नानांनी करून दिली हि माझ्याच बिल्डींग मध्ये राहते. ते दोन गोल काचेचे गोळे आणि त्या मागील तुझे बारीकसे डोळे मला अजून हि आठवतात. काळाच्या ओघात तुझी ती काच कधीच निघून गेली तो भाग वेगळा. पहिली दोन वर्षे तर अशीच गेली. तुला चिडवता चिडवता कधी तुझ्याशी मैत्री झाली हे मला सुधा कळल नाही. खर तर मंतरलेले दिवस होते. १० वी चा वर्ष कस उजाडल आणि संपून गेल कळलच नाही.

रिझल्ट लागले आणि तू ठरवल्याप्रमाणे आपल्या आवडीच्या क्षेत्रात गेलीस. मी माझ्या क्षेत्रात गेलो जरी माझी तितकी इच्चा नव्हती. आपल्यातील अंतर कधी वाढल ते कळलच नाही. परत एकदा भेटलीस स्टेशन वर अचानक एक दिवस मला तुझी ट्रेन कळली माझ्या वेळेच्या आसपास होती. मग काय रोज किंवा निदान २-३ दिवस आपली ओझरती भेट व्हायला लागली पण मैत्री कुठे वाढत नव्हतीच कशी आणि कसा आहेस ह्या पलीकडे आपण जास्ती काही बोलतच नव्हतो आणि नंतर परत आपण वेगळे झालो.

बरीच वर्षे गेली तू कुठे आहेस काय करतेस काहीच माहित नव्हता. तू आपल्या अभ्यासात आणि मी आपल्या करियर मध्ये धडपडत होतो. एक दिवस रस्त्यात भेटलीस तेव्हा कळले कि पदवी अभ्यासक्रमात मुंबई विद्यापीठात तू पहिली आली आहेस. तुला जितका आनंद झाला नसेल तितका मला झाला. एक मैत्रीण जिला अगदी जवळून ओळखतो जरी आपण जास्ती बोललो नसलो तरी तुझ्याबद्दल खूप काही माहिती होतच. मास्टर (पद्व्युतर) मध्ये सुद्धा तू मुंबई विद्यापीठातून पहिली आलीस. मला जेव्हा कळले तेव्हा तुझा खूपच अभिमान वाटला. कोलेज च विश्व आणि खरी परिस्तिथी वेगळी होती. तुला माहित आहे काय ती. तुझ्या त्या १० किलोच्या सर्तीफिकीत च्या पिशवीला कोणी एक चांगली नोकरी देत नव्हता हे बघून मला कसच झाल.

त्या वेळी पहिल्यांदा कळल कि हुशारी आणि नोकरी ह्याचा काही एक संबंध नसतो. त्या काळात पुन्हा एकदा आपली छान मैत्री फुलली बरच काही शेअरिंग झाल. त्या नंतर पुन्हा एका नवीन वळणावर आपण दोघे लांब गेलो आणि ते हि तब्बल ७ वर्ष. ह्या काळात बरच पाणी वाहून गेल. जरी आपण बोलत नसलो तरी तू काय करतेस आणि कशी आहेस ह्याची माहिती होतीच मला. तू रेडीओ ज्योकी सारख वेगळ क्षेत्र निवडलस. मला खात्री होती कि तुझ नाण खणखणीत आहे ते नक्की वाजणार तू जिकडे जाशील तिकडे तुझी मेहनत, जिद्द, हुशारी ह्यांनी तू खूप उंचावर जाणार हे आधीच माहित होत.
गेली १०-१२ वर्ष तू रेडीओ ज्योकी आहेस. तुझा फ्यान क्लब आहे. मला वाटते माझ्यापेक्षा तुझे कार्यक्रम कसे असतात हे महाराष्ट्रातील प्रत्येक रेडीओ ऐकणारा श्रोता सांगू शकेल. मी त्यावर जास्ती काही बोलायची गरज नाही. ४ वर्षापूर्वी आपण परत बोलू लागलो त्या पेक्षा मी म्हणेन कि एका मुरलेल्या लोणच्यासारखी आपली मैत्री घट्ट झाली. तुझ कार्यक्रम, पुस्तक, वाचन , साहित्य , शिक्षण,. एकही असा विषय नव्हता ज्यावर आपण वाद घातले नाहीत. श्रोता म्हणून तुझे कार्यक्रम ऐकले नसले तरी तुझ्या प्रत्येक कार्यक्रमाबद्दल माहित होतच. पुस्तक लिहण्याच असो किंवा कार्यक्रम करण्याच असो तू सगळीकडे नंबर १ राहिलीस..

गेले २० वर्षामध्ये तुझी सगळी जडण घडण बघितली आहे. तुझे व्याप , त्रास नी इतर काही गोष्टी तुझा संघर्ष सगळाच मला माहित आहे. लोकांना तो कधी कळणार हि नाही आणि दिसणार हि नाही. म्हणून तर तूझ यश हे माझ्यासाठी जास्ती महत्वाच आहे. कारण त्या मागील त्याग , धडपड , इच्चा , जिद्द, वेळ प्रसंगी टोमणे , कुटुंब आणि एक बायको , मुलगी , आणि आई ह्या सर्व नात्यांना बरोबर घेऊन तू आज इतक्या वरती विराजमान आहेस. आणि त्यातही तुला त्रास देणाऱ्या मित्राला तू विसरली नाहीस. आजही एक मैत्रीच सुंदर नात सगळ्याच पातळीवर जपून ठेवल आहेस. इतकी प्रसिद्ध आणि मोठी असून सुधा कुठेही तुझ्या बोलण्यात मला तो कुठे जाणवल नाही. माझ्यासाठी तू आजही ती २० वर्षापूर्वी होतीस तशी आहे आणि तुझ्यासाठी मी तो एक टवाळकी करणारा मित्र आहे..

विनीत वर्तक. 

No comments:

Post a Comment