Thursday 6 July 2023

जाळण्यामागचं राजकारण... विनीत वर्तक ©

 जाळण्यामागचं राजकारण... विनीत वर्तक ©

'अडकलेला पतंग आधी काढायला बघतात, नाहीच निघत म्हंटल्यावर फाडायला निघतात'... चंद्रशेखर गोखले. 

मानवी वृत्तीच एक सहज दर्शन या चारोळीतून होतं. एखादी गोष्ट माझी नाही तर ती कोणाचीच होऊ शकत नाही ही माणसाची एक सहज प्रवृत्ती असते. त्याच प्रवृत्तीतून मग असूया, द्वेष आणि सुडाची भावना निर्माण होते. या भावनांना हवा मिळाली की त्याच वणव्यात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. अनेकदा दुर्लक्ष केलेल्या, सहन केलेल्या किंवा लपलेल्या भावना राक्षस बनून बाहेर पडतात. त्यातून फक्त आणि फक्त विनाश होतो. त्यात आपलं किती नुकसान होते याचा अंदाज येईपर्यंत कृती झालेली असते. अगदी सोशल मिडिया वर रोजच्या रोज घडणाऱ्या घटनांतून दिसणारी ही कृतीच जागतिक पटलावर घडणाऱ्या घटनांना कारणीभूत ठरते आहे. यात दोन देश प्रामुख्याने होरपळताना दिसत आहेत. त्यातला एक आहे फ्रांस तर दुसरा आहे भारत. नक्की कशामुळे या सूडाच्या भावना निर्माण झाल्या? त्यातून काय निष्पन्न होते आहे? भविष्यात याचे काय दूरगामी परीणाम होणार? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. 

सध्या युरोपातील फ्रांस हा देश देशात घडणाऱ्या जाळपोळीत पोळून निघाला आहे. हळूहळू याचे लोण आजूबाजूच्या देशात सुद्धा पसरायला लागले आहेत. जर्मनी, बेल्जीयम आणि युनायटेड किंग्डम या देशात ही हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत. नक्की कश्यामुळे हे घडते आहे याचा मागोवा घेतला तर त्याचे अनेक कांगोरे आपल्या हाताशी लागतील. तरीपण या सगळ्या घटनांच्या मागे एक छुपं राजकारण आणि स्वार्थ लपलेला असतो हे उघड आहे. फ्रांस मधे हिंसाचाराच्या घटनांचा उद्रेक व्हायला कारण होतं एका १७ वर्षीय अल्जेरियन मुलाच्यावर पोलिसांनी केलेला गोळीबार ज्यात तो मुलगा मृत्युमुखी पडला. 'नाहेल' नावाचा हा युवक फ्रांस मधे विस्थापित होऊन आला होता. त्याला फ्रांस ने स्वतःच नागरीकत्व दिलेलं होतं. २७ जून २०२३ ला ट्राफिक पोलिसांनी त्याला गाडी चालवताना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गाडीची लायसेन्स प्लेट पण चुकीची होती. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. पण ट्राफिक मधे तो अडकला. त्याला पोलिसांनी ट्राफिक मधे पकडताना त्याच्यावर गोळीबार केला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. 

पोलिसांच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी फ्रांस मधे मोर्चा निघाला. या मोर्च्याचे रूपांतर मग हिंसक आंदोलनात झालं. याच हिंसक आंदोलनात आजही फ्रांस होरपळतो आहे. याला आता धार्मिक रंग देण्यात आला. याला आता विस्थापितांच्या प्रश्नांशी जोडण्यात आलं आहे. नक्की कश्यासाठी हे आंदोलन सुरु झालं हे मागे पडून आता लोकं रस्त्यावर अक्षरशः लुटालूट करायला आणि एकमेकांचे जीव घ्यायला उतरली आहेत. मुळात या सर्व घटनेत चूक कोणाची होती याचा शोध आणि कारवाई सुरु असताना अचानक या घटनेने अनेक निद्रिस्त प्रश्नांना जागं केलं आहे. गेल्या काही वर्षात मुस्लिम राष्ट्रातील असंतोषामुळे अनेक कुटुंब युरोपातील देशात वास्तव्याला आली आहेत. दरवर्षी त्यांच्या संख्येत भर पडते आहे एकट्या फ्रांस मधे २०२१ पर्यंत ५ लाखापेक्षा जास्त विस्थापित लोक रहात आहेत. त्यातील अनेक आता फ्रांस चे नागरीक बनले आहेत. पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या निर्णयाचे चुकीचे पडसाद आता उमटायला लागले आहेत. 

आपल्या मराठीत एक म्हण आहे, "भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी" ( इकडे कोणत्याही जातीचा अपमान करण्याचा उद्देश नाही. म्हणीचा वापर फक्त संदर्भासाठी केलेला आहे याची नोंद वाचकांनी घ्यावी.) त्याप्रमाणे विस्थापित झालेल्या आणि आता नागरीक बनलेल्या लोकांनी हळूहळू मूळ लोकांच्या उरावर बसण्याची सुरवात एकप्रकारे केलेली आहे. आपल्याला दिलेलं नागरीकत्व हा फ्रांस च्या लोकशाहीचा भाग आहे त्यामुळे आपणच किंवा आपली संस्कृती याचा अविभाज्य भाग असली पाहिजे असा मतप्रवाह सुरु झालेला आहे. लोकशाही च्या सार्वभौमत्व तत्वाचा आणि समान नागरीक असण्याचा गैरफायदा घेत मूळ लोकांच्या घरावर आपला हक्क सांगितलं जातो आहे. त्यामुळे ज्यांच हे घर होतं किंवा मूळ फ्रांसच्या लोकांमध्ये आणि विस्थापित नागरिकांमध्ये आता धुसफूस सुरु झाली आहे. हे लोण इकडे थांबणारे नाही कारण या दोन नागरिकांमधील दरी आता वाढत जाणार आहे. ज्या निष्पाप लोकांना याचा त्रास झाला, ज्यांची दुकान, बिझनेस आणि इतर संपत्ती लुटली गेली किंवा जाळली गेली त्यांचा 'लोकशाही' या शब्दावरचा विश्वास डळमळीत झाला असेल यात शंका नाही. याचा त्रास नुसत्या एका धर्मापुरती मर्यादित राहणार नाही तर हळूहळू तिकडे विस्थापित होणाऱ्या अथवा कामानिमित्त जाणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरीकाला होणार आहे. 

आपल्याच घरात घुसून जर बाहेरचे आपल्याला कायदे आणि सर्वधर्मसमभाव शिकवायला लागले तर आपली जी प्रतिक्रिया असेल तीच प्रतिक्रिया किंवा ते पडसाद फ्रांस मधे येत्या काळात दिसून येणार आहेत. ते नक्की काय असतील याबद्दल आत्ताच सांगता येणं कठीण असलं तरी एकूणच लोकशाही च्या ढाच्याला यामुळे धक्का बसणार आहे हे नक्की आहे. याला दुसरी एक बाजू पण आहे. ज्या पोलिसांनी त्या मुलावर गोळी चालवली त्यांना तसं करण्याचं योग्य कारण अजून देता आलेलं नाही. तो मुलगा पळत असला हे खरं असलं तरी तो अतिरेकी नव्हता अथवा तसं अजूनतरी सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे त्या पोलिसांनी वंशवादामुळे तर हे कृत्य केलेलं आहे असं प्रथमदर्शनी दिसून येते आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांची कृती समर्थनीय नाही. पण असं असलं तरी त्यांच्या चुकीला धर्माचा आधार घेत  त्यातून एकूणच केलेलं नुकसान कुठेतरी त्या धर्माच्या एकूणच मूळ तत्वांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. कोणताही धर्म, पंथ, जात अथवा संप्रदाय कोणत्याच प्रकारच्या अमानुष कृत्यांना थारा देत नाही पण लोकांच्या भावनाना चुकीची दिशा दाखवत त्याच भावनांचा आसरा घेत अनेक राजकारणी, संधीसाधू आणि सुप्त हेतू बाळगणारे या तत्वांना वेगळ्या चौकटीत बसवत संपूर्ण जगात हिंसाचार करू शकतात हे सिद्ध झालेलं आहे. याला एका विशीष्ठ धर्माची लोकं बळी पडतात हे आजवर सिद्ध झालेलं आहे. 

भारतात जरी हिंसाचाराचं मूळ नसलं तरी भूतकाळात भारताच्या राजकारण्यानी केलेल्या अक्षम्य चुकांमुळे आजही त्याची किंमत मोजावी लागत आहे. 'खलिस्तान' हा शब्द आज पुन्हा भारताच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. खलिस्तानी विचारधारेच समर्थन करणारे आज जरी भारतात हिंसाचार घडवत नसले तरी त्यांनी परदेशातील भारताच्या वाणिज्य कार्यालयांना आपलं लक्ष बनवलं आहे. मुळात खलिस्तान संकल्पना काय आहे? का अजूनही हा हिंसाचार होतो आहे? हे आपण समजून घेतलं पाहिजे. १९४७ साली भारत स्वातंत्र्य झाला पण भारतातल्या दोन धर्माना इंग्रज विभाजित करून गेले हा इतिहास आपण वाचलेला आहे. पण हिंद, मुस्लिम या धर्मांपलीकडे भारतात शीख धर्म ही महत्वाचा होता. ज्यांना आपल्या धर्मासाठी एक वेगळा प्रांत हवा होता. भारतातल्या तत्कालीन राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी हा लहान प्रश्न खूप मोठा केला. आपला कार्यभाग उरकून घेतल्यावर त्या लोकांना वाळीत टाकलं ज्याचा परीणाम म्हणजे सुरु झालेली खलिस्तानी चळवळ. या चळवळीत त्याच घराणातल्या लोकांचा जीव गेला ज्यांनी हा प्रश्न निर्माण केला. आज भारतात हा प्रश्न किंवा ही चळवळ थंडावलेली असली किंवा अनेक शीख लोकांनी भारताला आपलं राष्ट्र, प्रांत मानून त्याच्या जडणघडणीत अमूल्य असं योगदान दिलं असलं तरी विदेशी शक्ती आणि अखंड भारताचे तुकडे करण्यासाठी सज्ज असलेल्या गॅंग ज्यात अनेक विद्रोही विचारसरणीच्या लोकांचा समावेश आहे. त्यांनी ही जखम पूर्ण भरू दिलेली नाही. 

आज कॅनडा आणि अमेरिकेत भारताच्या वाणिज्य कार्यालयांवर होणारे हल्ले हे त्याच शक्तींच्या वाईट कृत्यांच एक प्रतीक आहे. भारताची जगात होणारी भरभराट, भारताची वाढती अर्थव्यवस्था, भारताचा वाढत असलेला जागतिक दबदबा याला अंकुश लावण्यासाठी हेच देश आपल्या घरात अश्या कृत्यांना पडद्यामागून समर्थन आणि संरक्षण देत आहेत. एखादी अशी घटना घडली की निषेध करायचा पण पाठीमागून अश्या घटना घडतील याची पुरेपूर सोय करायची असं दुहेरी धोरण या देशांनी आज राबवलं आहे. पण या सगळ्यात त्यांच स्वतःच घर पण जळते आहे याची जाणीव त्यांना अजून झालेली नाही किंवा झालेली असून पण त्यांनी त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अश्या घटनांमध्ये वाढ झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. 

इकडे एक लक्षात घेतलं पाहिजे की भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही. आमच्या घरात आग लावायला याल तर तुमचं घर कधी जाळून खाक होईल तुमचं तुम्हाला कळणार नाही हे भारताने दाखवून दिलेलं आहे. खलिस्तानी चळवळीचं समर्थन आणि नेतृत्व करणाऱ्या अनेक लोकांचा गेल्या काही महिन्यात अचानक झालेला मृत्यू किंवा त्यांना भारताने जे सळो की पळो करून सोडलेलं आहे त्यातून स्पष्ट होते आहे. या शक्ती पुन्हा एकदा भारतात काहीतरी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. अडकलेला पतंग फाडायचा की तो अलगद काढायचा हे आपण भारतीय नागरीक म्हणून ठरवायचं आहे. दगड मारणारे हे दगड मारणार त्यांना कोणी थांबवू शकत नाही. पण मारलेला दगड परतवायचा कसा हे आपण शिकलं पाहिजे. फ्रांस आणि भारत हे दोन्ही देश सध्या जाळपोळीच्या घटनात होरपोळुन निघत आहेत. हीच वेळ आहे संयम ठेवून आग पसरू न देण्याची आणि हीच वेळ आहे अशी आग लावणाऱ्या लोकांना योग्य तो धडा शिकवण्याची. तूर्तास बघूया पुढे काय होते. 

जय हिंद!!! 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.





No comments:

Post a Comment