Sunday, 30 April 2023

'टर्निंग पॉईंट'... विनीत वर्तक ©

 'टर्निंग पॉईंट'... विनीत वर्तक ©

आपण आजवर शिकलो ते सगळं चुकीचं होतं असं कोणी म्हणालं तर???

सध्या जगातील सर्वच खगोल आणि भौतिक शास्त्रज्ञ या गोष्टीचा अनुभव घेत आहेत. कारण जे समोर आलं आहे ते आपल्या विश्वाबद्दलच्या संकल्पना मुळापासून हादरवून टाकणारं आहे. हे मी नाही सांगत तर जगातील अतिशय नावाजलेले वैज्ञानिक आपल्याला पुन्हा विज्ञान लिहावं लागेल असं म्हणायला लागले आहेत. 

याला कारण आहे मानवाच्या तंत्रज्ञान प्रगतीने विश्वाबद्दलच्या आपल्या माहितीला दिलेला छेद. हबल दुर्बीण अवकाशात सोडल्यानंतर तिने आपल्याला विश्वातील अनेक रहस्यांचा उलगडा करून दिला. पण तरीही अनेक प्रश्न हे अनुत्तरीत होते. त्याचा मागोवा घेण्यासाठी मानवाने २०२१ मधे जेम्स वेब दुर्बीण अवकाशात पाठवली. हबल पेक्षा तब्बल १०० पट ताकदवान असणारी ही दुर्बीण विश्वाची जडणघडण समजून घ्यायला आपल्याला मदत करेल हे आपल्याला माहीत होतच पण जेम्स वेब ने नुकत्याच शोध लावलेल्या काही गोष्टींमुळे आपल्या विश्वाबद्दलच्या संकल्पनेलाच मुळी मुळापासून हादरे बसले आहेत. 

आपण आजवर शिकत आलो अथवा शिकवलं गेलं की विश्वाची निर्मिती १३.८ बिलियन वर्षापूर्वी झाली. तिकडून ते आजच्या क्षणापर्यंत आपण विश्वाच्या प्रवासाचं एक मॉडेल तयार केलं. अमुक एक वर्षांनी तारे तयार झाले, दीर्घिका तयार झाल्या, ग्रह तयार झाले, धूमकेतू, लघुग्रह, कृष्णविवर, ते सुपरनोव्हा आणि पल्सार अश्या सगळ्याच गोष्टी कश्या पद्धतीने आणि कोणत्या वेळी विश्वात निर्माण झाल्या याच एक सर्वसाधारण मॉडेल आपल्या संपूर्ण विश्वाच्या आकलनासाठी तयार केलं गेलं. त्याच मॉडेल च्या आधारे आपण अनेक नियम, ठोकताळे आणि गणित मांडलं. आजवर ते बरोबर ही येत होतं. त्यामुळेच आपल्याला असा ठाम विश्वास बसला की आपण विश्वाची मूलभूत संरचना समजलो आहोत. नक्कीच काही अनुत्तरित प्रश्न नक्कीच होते पण तरीही एक अंदाज आपल्याला होता. 

याच खगोल शास्त्रातील मॉडेल ला जेम्स वेब ने हादरे दिले आहेत. जेम्स वेब ने टिपलेल्या काही दीर्घिकांन बद्दलची माहिती जेव्हा सार्वजनिक करण्यात आली त्या नंतर खगोल विश्वात भूकंपाचे धक्के बसायला सुरवात झाले आहेत. सामान्य माणसाच्या मनात येईल की दीर्घिका शोधण्यासाठी तर जेम्स वेब दुर्बीण बनवली मग तिने जर खूप दूरवरच्या दीर्घिका ज्या आत्तापर्यंत आपल्याला दिसल्या नव्हत्या त्या शोधल्या तर त्यामुळे नाकी काय बिनसलं. काय बिनसलं हे समजून घेण्यासाठी थोडक्यात विश्वाचं मॉडेल समजून घेऊ. 

विश्वाच्या मॉडेल मधे बिग बँग झाल्यानंतर आपली अशी धारणा होती की पहिले तारे बनायला आणि पहिल्या दीर्घिका बनण्याची किंवा कृष्णविवर बनण्याची सुरवात साधारण १ ते २ बिलियन वर्षानंतर झाली. साधारण १ ते २ बिलियन वर्षात विश्वात लाईट कुठेच नव्हता सगळं काही अंधारमय होतं त्यालाच आपण डार्क एज असं नाव दिलं. आता घोळ असा झाला आहे की जेम्स वेब ने चक्क या डार्क एज च्या काळात अस्तित्वात असणाऱ्या दीर्घिका शोधल्या आहेत. त्या पण एक नाही तर ५-६ दीर्घिका एकत्र नांदत आहेत. त्यातील काही तर आपल्या मिल्की वे आकाशगंगेपेक्षा मोठ्या आहेत. या दीर्घिका बिग बँग नंतर ३०० ते ५०० मिलियन वर्षात अस्तित्वात आहेत. यांच्या सोबत एक अत्यंत छोटी दीर्घिका पण शोधली आहे. ती लहान असली तरी प्रचंड वेगाने ताऱ्यांची निर्मिती करत आहे. आपली मिल्की वे मधे प्रत्येक वर्षी १-२ नवीन तारे जन्माला येतात तर इकडे या दीर्घिकेत असलेल्या गॅसेस पासून १००% तारे निर्माण होत आहेत. त्यांच प्रमाण मिल्की वे पेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. 

या सगळ्या शोधामुळे जगातील सर्वच वैज्ञानिक हादरले आहेत कारण मुळातच विश्व संकल्पनेच्या आपल्या माहितीला याने हादरे बसले आहेत. जर का डार्क एज च्या काळात इतक्या मोठ्या दीर्घिका आणि त्याच सोबत बिलियन आणि बिलियन तारे अस्तित्वात असतील तर मुळात बिग बँग झालं तरी असेल का? बिग बँग ही संकप्लना तर चुकीची असेल तर आपल्या सगळ्याच थेअरी चुकीच्या ठरतील. बरं या दीर्घिकांच्या मध्यभागी भले मोठे कृष्णविवर ही आढळून आलेली आहेत. मग इतकी ऊर्जा आणि त्यांची निर्मिती कशी झाली असेल? कदाचित ते बिग बँग च्या पूर्व जन्मातील तर नाहीत न? जर असतील तर याचा अर्थ समांतर विश्व अस्तित्वात आहे. एकूणच एक ना अनेक प्रश्न जगातील सर्वच वैज्ञानिकांसमोर उभे ठाकले आहेत. ज्याची उत्तर शोधण्यासाठी पुन्हा आपल्याला खगोल शास्त्राच्या बेसिक पर्यंत जावं लागणार आहे. 

एकूणच काय तर जेम्स वेब ने लावलेला शोध हा संपूर्ण खगोल आणि भौतिक शास्त्रासाठी टर्निंग पॉईंट ठरलेला आहे. येत्या काळात याच प्रश्नांची उत्तर शोधणाऱ्या वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार मिळाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. तूर्तास बघूया आगे आगे क्या होता है!... 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Thursday, 27 April 2023

'समांतर विश्व' (भाग २)... विनीत वर्तक ©

 'समांतर विश्व' (भाग २)... विनीत वर्तक ©

मागच्या भागात आपण बघितलं की पार्टीकल फिजिक्स मधली ऊर्जेची समीकरणं सुटत नव्हती. तेव्हा १९३० साली Wolfgang Pauli नावाच्या वैज्ञानिकाने अशी एक कल्पना मांडली की समजा आपण या समीकरणात एखादा पार्टीकल मिळवला तर सर्व समीकरणं ही बरोबर सुटतात. एक असा पार्टीकल ज्यावर कोणता भर नसेल, सुक्ष्म असेल आणि ऊर्जा घेऊन संक्रमण करत असेल. पण नुसतं समीकरण सोडवलं म्हणजे ती गोष्ट सिद्ध होतं नाही. प्रयोगातून सप्रमाणात त्याच अस्तित्व दाखवून देण्याची गरज होती. पुढे जाऊन James Chadwick नावाच्या वैज्ञानिकाने याच अस्तित्व प्रयोगातून दाखवून दिलं. त्याला नाव दिलं "न्यूट्रिनो". या शब्दाचा ग्रीक अर्थ होतो "little neutral one" ( लहान पण अलिप्त). हा पार्टीकल खूप लहान होता पण याच्या काही गोष्टी चक्रावणाऱ्या होत्या ज्यात विश्वाची गुपित लपलेली होती. 

न्यूट्रिनो हा एक एलिमेंटरी पार्टीकल आहे. याचा अर्थ काय तर त्याच विभाजन करता येत नाही. तो एखाद्या  गोष्टीच सगळ्यात सुक्ष्म रूप आहे. इलेकट्रॉन पेक्षा न्यूट्रिनो तब्बल १० लाख पटीने लहान आहे. न्यूट्रिनो इतके महत्वाचे का तर त्यांना विश्वात कोणीच थांबवू शकत नाही. त्यांचा जन्म जिकडून झाला तिकडून ते सरळ रेषेत प्रवास करत राहतात. त्यांच्या रस्त्यात ना ग्रह येत, ना तारे येत, ना गुरुत्वाकर्षण, ना चुंबकीय क्षेत्र. ते सगळ्याला भेदून पुढे जात राहतात. त्यांना थांबवणं अशक्य आहे. समजा तुम्हाला एका न्यूट्रिनो ला थांबवायचं असेल तर १ प्रकाशवर्ष अंतराच्या जाडीचं शिसे (LEAD) ची भिंत बांधावी लागेल. त्यातून सुद्धा न्यूट्रिनो अडकण्याची शक्यता फक्त ५०% आहे. आता हे न्यूट्रिनो तयार होतात कुठे? तर अगदी आपल्या शरीरात त्यांची निर्मिती सतत सुरु असते. आपल्या शरीरात पोटॅशियम च्या रेडिओ डिके मधून ते सतत बाहेर फेकले जात आहेत. आपल्या सूर्याकडून बिलियन्स ऑफ बिलियन न्यूट्रिनोचा मारा आपल्यापैकी प्रत्येकावर होत आहे. आपल्या नखाच्या जागेतून तब्बल १ बिलियन पेक्षा जास्त न्यूट्रिनो प्रत्येक क्षणाला जात आहेत. 

हे सगळं वाचून आपल्याला चक्कर येईल पण वैज्ञानिकांच्या दृष्टीने हा एक खजिना होता. न्यूट्रिनोला कोणीच अडवू शकत नाही म्हणजे ते आपल्या जन्मदात्या सोर्स ची माहिती विश्वाच्या अनंत पाटलांवर कित्येक मिलियन, बिलियन प्रकाशवर्ष अंतरावर घेऊन जात असतात. याचा अर्थ काय तर आपल्या सूर्याकडून निघालेले किंवा अगदी आपल्या शरीरातून निघालेले न्यूट्रिनो तुमची, आमची माहिती घेऊन विश्वाच्या अनंत प्रवासाला प्रत्येक क्षणाला जात आहेत. त्यांच्याकडे असलेल्या माहितीतून अनेक गोष्टी कळू शकतात. जसे की कोणत्या प्रक्रियेमुळे ते तयार झाले? त्याची ऊर्जा किती होती? साधारण किती अंतरावरून ते आले आहेत? हे सर्व कळू शकते. न्यूट्रिनो जसे आपल्या शरीरातून निघतात कारण आपल्या शरीरात होत असलेल्या आण्विक क्रियेमुळे. सूर्य तर आण्विक क्रियांचा दादा आहे. तिकडे तर प्रत्येक क्षणाला १० बिलियन हायड्रोजन बॉम्ब चे स्फोट होत आहेत. त्यातून निघणाऱ्या ऊर्जेने आपण आज जिवंत आहोत. त्यामुळे सूर्य सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिनो निर्माण करतो. पण विश्वाच्या या पसाऱ्यात सूर्य एक साधा तारा आहे. याचा अर्थ काय तर आपल्या विश्वात घडणाऱ्या प्रचंड ऊर्जेच्या घडामोडी जश्या सुपरनोव्हा, कृष्णविवरांची टक्कर, न्यूट्रॉन तारे, पल्सार अश्या विविध गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिनो च निर्माण करतात. हे न्यूट्रिनो मग ती माहिती घेऊन विश्वाच्या पोकळीत प्रवास करत राहतात. 

आता इकडे सगळ्यात मोठी अडचण ही होती की न्यूट्रिनोला जर काहीच थांबवू शकत नाही तर त्यांच्याकडे असलेली माहिती मिळवायची कशी? तर याच उत्तर आहे त्यांच्या रस्त्यात तुम्ही पारदर्शक वस्तू ठेवा. जेव्हा त्यातला एखादा न्यूट्रिनो त्या वस्तू च्या अणू सोबत टक्कर करेल तेव्हा त्याच स्वरूप तुमच्यासमोर उघडं होईल. मग अशी वस्तू कोणती पृथ्वीवर एकाच ठिकाणी मुबलक प्रमाणात आहे. तो प्रदेश म्हणजे अंटार्टिका. अंटार्टिका हा जगातील सगळ्यात मोठा न्यूट्रिनो टेलिस्कोप आहे. विश्वाच्या पोकळीत अनंत अंतरावरून आलेले न्यूट्रिनो पृथ्वीला छेदत असताना अंटार्टिका मधील बर्फासोबत कधीतरी आपलं अस्तित्व दाखवतात. आता वैज्ञानिकांनी अंटार्टिका च्या आत खोलवर जिथला बर्फ हजारो वर्ष तसाच्या तसा आहे तिकडे जवळपास ५००० सेन्सर बसवलेले आहेत. असे तर न्यूट्रिनो या बर्फातून कोणत्याही अडचणी शिवाय प्रवास करतात पण वर्षातून साधारण १० वेळा एखाद्या न्यूट्रिनोची टक्कर बर्फाच्या अणूशी होते. त्यातून निर्माण झालेला फोटॉन कणाला मग हे सेन्सर बंदिस्त करतात. त्याच अनुमान लावल्यावर हे न्यूट्रिनो कुठून आले असावेत याची माहिती मिळते. 

आता तुमच्या मनात विचार येईल की या सगळ्याचा समांतर विश्वाशी काय संबंध? न्यूट्रिनो आणि समांतर विश्व याची सांगड काय आहे? तर ते जाणून घेण्यासाठी आपण वैज्ञानिकांनी अंटार्टिका मधे केलेल्या ANITA (ANtarctic Impulsive Transient Antenna) प्रयोगा बद्दल जाणून घेऊ. या प्रयोगात रेडिओ व्हेव शोधणारे हाय एनर्जी सेन्सर एका फुग्यातून अंटार्टिका मधे सोडण्यात आले. या प्रयोगात काय घडलं ते इकडे लिहत नाही. पण त्यातून काय निष्कर्ष आले ते चक्रावणारे आहेत. तर वर लिहिलं तसं अंटार्टिका च्या बर्फात असणारे सेन्सर आणि अनिता चे सेन्सर यांनी शोधलेल्या न्यूट्रिनो मधे साम्यता असायला हवी होती. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. अनिता च्या सेन्सर नी ३ वेळा वेगळ्या पद्धतीच्या न्यूट्रिनो बद्दल माहिती दिली. या न्यूट्रिनो ची एनर्जी ही प्रचंड विलक्षण होती. त्यांची निर्मिती होण्यासाठी घडलेली घटना ही तितकीच मोठी असायला हवी. आपल्याला ज्ञात इतर स्रोतांच्या आधारे आपल्या वैश्विक बुडबुड्यात इतक्या ताकदीचे न्यूट्रिनो निर्माण करणारी घटना घडलेली नाही. 

काही वैज्ञानिक याचा अर्थ असा काढत आहेत की हे आलेले न्यूट्रिनो आपल्या वैश्विक बुडबुड्याच्या बाहेरून आलेले आहेत. हे सिद्ध करते की आपल्या सारखच समांतर विश्व अस्तित्वात आहे. न्यूट्रिनो हे प्रकाशाच्या वेगानेच प्रवास करतात पण कोणत्याही माध्यमात त्यांचा वेग कमी होत नाही. पण प्रकाशाचा वेग माध्यम बदलल्यावर बदलतो. त्यामुळेच न्यूट्रिनो हे प्रकाशापेक्षा जास्त वेगात प्रवास करतात. जर दोन गाड्या १०० किलोमीटर वेगाने धावत असतील पण आपण एखाद्या गाडीला जास्त वेळा पिवळा सिग्नल दिला की जिकडे तिचा वेग मंदावेल तर दुसरी गाडी साहजिक आपल्या लक्ष्यापर्यंत खूप आधी पोहचेल. अगदी सेम न्यूट्रिनोच्या बाबतीत घडते. भले त्यांचा आणि प्रकाशाचा वेग सारखा असला तरी न्यूट्रिनो कोणाला न जुमानता आपल्या वेगात जात राहतात तर प्रकाशाचा वेग मंदावतो. 

अनिता प्रयोगातून पुढे आलेले निष्कर्ष हे खूप प्राथमिक आहेत. त्यावर अजून संशोधन सुरु आहे. काही वैज्ञानिकांच्या मते आपल्या उपकरणातील चूक किंवा विश्वात घडलेल्या गोष्टी ज्या आपल्याला ज्ञात नाहीत किंवा अजून काही कारण या न्यूट्रिनोसाठी असू शकेल. पण तरीही एकवेळ फक्त कल्पना म्हणून गणल्या गेलेल्या समांतर विश्वाच्या दाव्याला मात्र या प्रयोगातून एक सिद्धता मिळाली आहे किंवा त्या दृष्टीने एक पाऊल टाकलं गेलं आहे. गेल्या १०० वर्षात प्रकाशाने वेगवेगळ्या स्वरूपातून आपल्याला विश्वाची ओळख करून दिली. इन्फ्रारेड, अल्ट्राव्हॉयलेट ते व्हिझिबल स्पेक्ट्रम अश्या सगळ्याच रूपात. आता येणारा काळ हा न्यूट्रिनोचा असणार आहे. जस विज्ञान प्रगत होत जाईल तसं न्यूट्रिनो कडून मिळणारी माहिती अजून स्पष्ट होईल. मला खात्री आहे येणाऱ्या काळात न्यूट्रिनो समांतर विश्वाच्या कल्पनेवर शिक्कामोर्तब करतील. तूर्तास समांतर विश्व अस्तित्वात असू शकते यावर माझा विश्वास आहे हे या निमित्ताने सांगू इच्छितो.  

समाप्त. 

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

 



Wednesday, 26 April 2023

'समांतर विश्व' (भाग १)... विनीत वर्तक ©

 'समांतर विश्व' (भाग १)... विनीत वर्तक ©

रात्रीच्या आकाशात लुकलुकणारे तारे अनेकदा हे विश्व किती अथांग आहे याची प्रचिती देत असतात. आपण एखाद्या रात्री जो प्रकाश बघत असतो तो त्या ताऱ्याकडून कधीतरी कित्येक हजारो वर्षापूर्वी निघालेला असतो. अनेकदा तो बघताना आपण हरवून जातो आणि आपल्या मनात विचार येतो की या अथांग विश्वाची मर्यादा तरी किती असेल? वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यावा लागतील. विश्व हे एखाद्या बुडबुड्या सारखं आहे. अगदीच सोप्प समजून द्यायचं असेल तर एखाद्या फुटबॉल वर्तुळाकार आहे. आपली पृथ्वी समजा या फुटबॉल च्या मध्यभागी आपण मानली तर फुटबॉल चा आकार म्हणजेच व्यास किती मोठा आहे तर ९३ बिलियन ( १ बिलियन १०० कोटी) प्रकाशवर्ष. पृथ्वीवरून आपण किती लांब वर एखाद्या दिशेने जाऊ शकतो तर साधारण ४६.५ बिलियन प्रकाशवर्ष अंतरापर्यंत. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की विश्वाची निर्मिती तर १३.८ बिलियन वर्षापूर्वी झाली. मग विश्वाचा आकार ४६.५ बिलियन प्रकाशवर्ष अंतराचा कसा काय झाला? तर याच उत्तर आहे की त्याची निर्मिती सुरु झाल्यापासून त्याचा आकार सतत वाढतो आहे. साधारण हा वेग आहे ७३.३ किलोमीटर / सेकंद / मेगापार्सेक (१ मेगापार्सेक म्हणजे १०००००० प्रकाशवर्ष इतकं अंतर). 

गेल्या १३.८ बिलियन वर्षात शुन्यातून निर्माण झालेल्या विश्वाचा ९३ बिलियन प्रकशवर्ष अंतराचा एक बुडबुडा ( एक फुटबॉल) तयार झाला आहे. हा बुडबुडा प्रत्येक सेकंदाला अजून अजून वाढत आहे. या एका बुडबुड्यात जवळपास २ ट्रिलियन ( २ लाख करोड ) अंदाजित दिर्घिका आहेत. ज्या एकमेकांपासून वेगाने लांब लांब जात आहेत. तुमच्या मनात येईल की दिर्घिका लांब जात आहेत का? तर याच उत्तर होय आणि नाही असं दोन्ही आहे. कारण दिर्घिका आपली जागा सोडत नाही आहेत. तर दोन दिर्घिकांच्या मधे जी मोकळी जागा आहे ती जागाच फुगत आहे त्यामुळे या बुडबुड्यात असलेल्या सगळ्या गोष्टी एकमेकांपासून लांब जात आहेत. हे समजण्यासाठी एक सोप्प उदाहरण एखाद्या फुग्यावर दोन टिपके काढा आणि त्यातील अंतर मोजून ठेवा. आता फुग्यात हवा भरत जा. तुमच्या लक्षात येईल की जितकी हवा तुम्ही जास्त भराल तितके ते दोन टिपके आपोआप लांब गेलेले असतील. त्यातील अंतर वाढलेलं असेल. आता टिपके स्वतःहून तर लांब नाही गेले पण ते लांब गेले कारण त्यांच्यामधील जो भाग आहे तो प्रसरण पावला. आपलं विश्व असच प्रसरण पावते आहे. या प्रसारणाला जी अज्ञात शक्ती कारणीभूत आहे तिला आपण 'डार्क एनर्जी' म्हणतो तर जो प्रसरण पावणारा भाग आहे तो 'डार्क मॅटर'. 

आता हे सगळं झालं आपल्या बुडबुड्या पर्यंत. पण विश्वाच्या अथांग पसाऱ्यात आपलाच बुडबुडा एकटा आहे का? आपण जो बघतो तो एकच फुटबॉल अस्तित्वात आहे का? हा प्रश्नच एका नव्या विचारांना चालना देणारा आहे. कारण आपल्या विश्वा सारखा दुसरा बुडबुडा विश्वात नसले कश्यावरुन आपल्या बघण्याच्या आकलनापलीकडे अजून अनेक बुडबुडे अस्तित्वात असूच शकतात. का नाही? विचार करा आपण समुद्राच्या मध्यभागी आहोत आपली नजर जाते तिथवर सगळं पाणीच आहे चारी बाजूने पण याचा अर्थ आपल्या नजरेपलीकडे जमीन नसलेच हे आपण ठामपणे कसं सांगू शकतो? याचा अर्थ काय तर क्षितिजा  पलीकडे बघण्याची, त्याच आकलन करण्याची साधन आपलीकडे नाहीत. पण ती नसली तरी समजा आपल्याकडे उंचावर जाण्याचं साधन असेल समजा एखाद रॉकेट तर आपण उंचावरून त्या पाण्याची व्याप्ती बघू आणि कदाचित दूरवर आपल्याला जमीन सुद्धा दिसेल. 

परत आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ. आपल्याकडे दोन पर्याय आहेत. एकतर आपली दृष्टी आपल्याला अजून व्यापक करावी लागणार आहे किंवा आपल्याला रॉकेट च तंत्रज्ञान आत्मसात करावं लागणार आहे. ज्याने आपण लांबवर बघू शकू. पहिला पर्याय आपल्याला करता येणं अशक्य आहे. कारण आपल्याला माहित आहे की प्रकाश एका विशिष्ठ वेगात प्रवास करतो तसेच तो इतक्या दूरवरून येताना त्याच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. अनेक ग्रह, तारे, गॅसेस, धुळीचं साम्राज्य आणि इतर वैश्विक गोष्टींशी लढा देत तो आपल्या पर्यंत पोहचतो तेव्हा इतका क्षीण झालेला असतो की त्याला बघण्याची आपली नजर बोथट होते. तो कितपत स्पष्ट आपल्याला मार्ग दाखवेल यावर मर्यादा येतात. विश्वाचा आकार ज्या वेगाने वाढतो आहे ते बघता आपल्याला जे दिसते आहे तेच धूसर होत जाणार आहे. कारण ज्या वेगात विश्व प्रसरण पावते आहे तितका जास्ती वेळ लांबच्या प्रकाशाला आपल्यापर्यंत पोहचायला लागणार आहे. 

दुसरा मार्ग म्हणजे रॉकेट तंत्रज्ञान. याचा अर्थ काय जर आपण आपल्या विश्वाच्या माहिती मध्ये भर टाकली किंवा असं काही शोधलं जे आपल्याला आपल्या बाहेरच्या विश्वाबद्दल काही सांगेल? पण जर असं काही असेल तर त्याने प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगात प्रवास करायला हवा आणि विश्वाच्या पोकळीत त्याला अडवणारं कोणी नसेल. मग असं काही या विश्वात आहे का? 

कसं असते की कधी कधी आपल्या हाताशी अचानक घबाड लागते. त्यातून आपल्याला पडत असलेल्या अनेक प्रश्नांची उकल होत जाते. तशीच काहीशी घटना विज्ञानाच्या बाबतीत घडली. भौतिक शास्त्राच्या एका शाखेचा म्हणजेच पार्टीकल फिजिक्स चा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की गणिताच्या पार्टीकल मधील एनर्जी च गणित कागदावर तर सुटत होतं पण प्रत्यक्षात मात्र प्रयोगाच्या वेळी वेगळेच निष्कर्ष हाती लागत होते. आपण शाळेत रसायन शास्त्रात रासायनिक प्रक्रिया शिकलो आहोत. हायड्रोजन आणि ऑक्सिजन चे रेणू मिळून पाणी तयार होते. त्याच एक रासायनिक समीकरण असते. त्यात हायड्रोजन चे दोन रेणू असतात आणि ऑक्सिजन चा एक तेव्हाच पाणी तयार होते. याचा अर्थ डावीकडील संख्या आणि उजवीकडील संख्या या समान असायला हव्यात नाहीतर त्या रासायनिक प्रक्रियेला एकतर अर्थ नाही किंवा ते रासायनिक समीकरण चुकीचं आहे. 

आता अशीच मज्जा पार्टीकल फिजिक्स मधे घडत होती. पार्टीकल च्या समीकरणातील डावीकडील आणि उजवीकडील एनर्जी (ऊर्जा) ही समान येत नव्हती. याचा अर्थ काय तर एकतर ती प्रक्रिया चुकीची आहे किंवा आपण समीकरण चुकीचं लिहितो आहे. प्रत्यक्ष प्रयोगात प्रक्रिया तर जशी अपेक्षित आहे तशीच घडत होती मात्र ऊर्जा जास्ती प्रमाणात बाहेर पडत होती. याचा अर्थ सरळ होता आपल्या हातून काहीतरी अदृश्य असं निसटते आहे ज्याला ऊर्जा आहे, ज्याच्यावर कोणता भार नाही (पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह). पण नक्की हे काय होतं? नक्की हे समीकरण सोडवल्यावर काय हाताशी लागणार होतं? त्याचा आणि समांतर विश्वाच्या संकल्पनेशी काय नातं? हे सगळं समजून घेऊ पुढल्या भागात. 

क्रमशः

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



Tuesday, 28 March 2023

चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट (भाग २)... विनीत वर्तक ©

 चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट (भाग २)... विनीत वर्तक ©

प्रत्येक मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन ही एक लाईफलाईन आहे. असा एकही मुंबईकर नसेल ज्याने कधी मुंबईत राहून ट्रेन ने प्रवास केला नसेल. माझी तर ट्रेनशी नाळ अगदी जन्मापासून जुळली आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. रेल्वे लाईन ला जवळपास खेटून असलेल्या घरामुळे ट्रेन चा आवाज जन्मापासून भरून राहिला तो आजपर्यंत. त्यामुळेच लोकल ट्रेन किंवा एकूणच भारतीय रेल्वे च्या बदलांचा मी एक मुक साक्षीदार आहे. काही वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्प हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय होता त्यातल्या त्यात मुंबईकरांसाठी थोडासा जास्तीच. किती नवीन गाड्या या वर्षी सुरु होणार? मुंबई करांच्या पदरी दरवर्षी प्रमाणे निराशा की आशेच्या काही गोष्टी घडल्या यावर कित्येक महिने चाललेल्या चर्चांमध्ये मी माझा सहभाग दिलेला होता. पण गेल्या काही वर्षात कात टाकल्याप्रमाणे भारतीय रेल्वे मधे खूप मोठ्या प्रमाणावर बदलांचे वारे वाहू लागले. आता तर त्या वाऱ्यांनी इतका जोर धरला आहे की येत्या काही वर्षात ही नक्की भारतीय रेल्वेच आहे न की आपण परदेशात आहोत असा प्रश्न आपल्याला पडू शकेल. त्यामुळेच मला पुन्हा एकदा असं वाटते आहे की 'चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट'. 

जगातील तिसरं सगळ्यात मोठ रेल्वे नेटवर्क भारतात आहे. भारतात रोज जवळपास २.५ कोटी लोक रेल्वे ने प्रवास करतात आणि त्यात एकट्या मुंबईचा वाटा ७५ लाख प्रवाशांचा आहे. १ लाख २८ हजार किलोमीटर च्या रुळांच्या लांबीवर १३,००० पेक्षा जास्ती ट्रेन धावत असतात. हे आकडेच सांगतात की एकट्या मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही कित्येक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वे च व्यवस्थापन हे तितकचं कठीण आहे. त्यात भरीस भर म्हणून होणारा भ्रष्टाचार, सरकारी मानसिकता, राजकीय हस्तक्षेप, तसेच भारतीयांची मानसिकता या सगळ्या गोष्टी भारतीय रेल्वे च्या वाढीसाठी किंवा एकूणच त्याचा दर्जा उंचावण्यासाठी सगळ्यात मोठ्या अडचणीच्या होत्या. परदेशातून बुलेट ट्रेन, तिथल्या मेट्रो ट्रेन किंवा रेल्वेतून फिरताना मिळणाऱ्या सुविधा, प्रवासाचा दर्जा आणि स्वच्छता या सर्व गोष्टी आपल्या भारतात कधी येतील असा विचार अनेकदा मनात यायचा. यासाठी अनेक दशके वाट बघावी लागेल हेच उत्तर मिळायचं. 

राजकीय इच्छाशक्ती, सरकारी यंत्रणा, वापर करणारी जनता यांची बदल करून दाखवण्याची इच्छा असेल तर 'स्काय इज द लिमिट' हे आज भारतीय रेल्वे ने सिद्ध करून दाखवलं आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वे ची स्टेशन, ट्रेन आणि एकूणच यंत्रणा यामध्ये खूप त्रुटी होत्या. खराब कोंदट असणारी स्टेशन, प्लॅटफॉर्म  वर येण्या जाण्यासाठी अपुरी असलेली व्यवस्था, स्टेशन च्या ब्रिज वर होणारी गर्दी, वयस्क आणि महिलांना होणारा त्रास, जागोजागी असणारा कचरा हे नॉर्मल होतं. त्याच वेळी रडत खडत जाणाऱ्या ट्रेन, त्यातील टॉयलेट आणि जेवणाची व्यवस्था, ट्रेन मधील एकूणच निराशाजनक वातावरण या सगळ्या गोष्टी भारतीय रेल्वे च्या एकप्रकारे इमेज बनल्या होत्या. जेव्हा इतर प्रवासाचे मार्ग कात टाकत होते तेव्हा प्रत्येक भारतीयाची नाळ जुळलेली रेल्वे मात्र चाचपडत होती. पण गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वेच्या या इमेज ला बदलावण्याचे प्रयत्न अगदी सगळ्याच पातळीवर केले गेले ज्यामुळे आज झपाट्याने भारतीय रेल्वे एका नव्या भारताचं आणि भारतीय मानसिकतेचं प्रतिनिधित्व करते आहे. 

गेल्या काही वर्षात भारतीय रेल्वे मधील स्वच्छता कमालीची वाढलेली आहे. रेल्वे स्टेशन वर बसवलेले सरकते जिने, लिफ्ट आणि इतर व्यवस्था यात खूप बदल झाला आहे. रेल्वे स्टेशन वर जाणं आता एक सुखद अनुभव वाटू लागला आहे. ट्रेन चा वाढलेला स्पीड आणि वक्तशीरपणा अनेकदा सुखद आश्चर्याचा धक्का देतो आहे. भारतीय रेल्वे आता एका नव्या रूपात समोर येऊ लागली आहे. मुंबईकरांसाठी बोलायचं झालं तर घामाच्या धारांची जागा आता एसी च्या थंड हवेच्या  झुळूकेने घेतली आहे. अर्थात एसी लोकल कधी हव्यात, त्यांच्या वेळा आणि फ्रिक्वेन्सी हे मुद्दे वादाचे असू शकतील. पण त्यांनी मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. 

वंदे भारत एक्सप्रेस ने खऱ्या अर्थाने भारतीय रेल्वे आणि भारतीय रेल्वे प्रवासाचं चित्र संपूर्णपणे बदलायला सुरवात केली आहे. कोणत्याही नवीन गोष्टींचं स्वागत भारतीय थोडं नाक मुरडून करतात आणि वंदे भारत एक्सप्रेस ही त्याला अपवाद नव्हती. आत्मनिर्भर भारताचं प्रतिनिधित्व करणारी ही भारतीय रेल्वे आज जागतिक स्तरावर एक अभ्यासाचा विषय झाली आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचा रेल्वे प्रवास आज वंदे भारत देशाच्या विविध भागात दररोज करते आहे. ही ट्रेन इतकी यशस्वी ठरली आहे की झालेल्या ट्रेन मधील १-२ अपवाद वगळले तर बाकी सर्व ट्रेन १००% जास्त कॅपॅसिटी ने धावत आहेत. एका वर्षात या ट्रेन ने भारतीय रेल्वे ला १०० कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवून दिलं आहे. भारतीय रेल्वे ने वंदे भारत एक्सप्रेस ची लोकप्रियता लक्षात घेऊन तब्बल १०२ वंदे भारत २ तर २०० वंदे भारत ३ चे टेंडर हा लेख लिहण्याआधीच भारतीय रेल्वे ने मेक इंडिया अंतर्गत भारतीय कंपन्यांना दिले आहे. ज्यांची एकत्रित किंमत ४.५ बिलियन (४५० कोटी ) अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ३५,००० कोटी रुपये इतकी प्रचंड आहे. 

येत्या २-३ वर्षात वंदे भारत एक्सप्रेस जवळपास भारतातील प्रत्येक पॅसेंजर ट्रेन ला रिप्लेस करणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ०-१०० किलोमीटर चा वेग अवघ्या ५४ सेकंदात गाठण्यास सक्षम असून १८० किलोमीटर / तास वेगाने सुरक्षित पद्धतीने धावण्याची तिची क्षमता आहे. भारतीय रेल्वे मधील रुळांच्या क्षमतेमुळे आज जरी तिचा वेग मर्यादित ठेवण्यात आला असला तरी येत्या काळात तब्बल २०० किलोमीटर / तास वेगाने ती धावणार आहे. या सोबत भारत आणि जपान यांच्या संयुक्त मदतीने तयार होत असलेल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन च काम वेगाने सुरु आहे. २०२६ पर्यंत भारतात पहिल्यांदा बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. काही राजकीय नेत्यांच्या आडमुढे धोरणांमुळे या प्रकल्पाला उशीर झाला असला तरी येत्या काही वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे. 

चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट हे स्विकारण्याची मानसिकता भारतीयांनी आत्मसात केली पाहिजे. वंदे भारत ट्रेन असो वा बुलेट ट्रेन किंवा अगदी एसी ट्रेन त्याने आम्हाला काय फायदा? गरिबाला काय फायदा? या राजकीय मानसिकतेमधून बाहेर पडण्याची गरज आहे. होऊ घातलेल्या बदलांचे परीणाम दिसायला काही वेळ जावा लागतो. काही वर्षांपूर्वी भारतीय रेल्वे ने केलेल्या बदलांची फळे आज आपण चाखत आहोत. आज जे बदल होऊ घातले आहेत त्याचे परीणाम दिसायला काही काळ जाणार हे निश्चित आहे. पण बदल होत आहेत ते महत्वाचं आहे कारण तेच शाश्वत आहे. ते होत आहेत म्हणून आपली प्रगती होत आहे. एक देश म्हणून आपण सर्व १४० कोटी भारतीय एक पाऊल पुढे टाकत आहोत. तेव्हा बदलांना राजकीय आणि कूपमंडूक वृत्तीतून विरोध करण्यापेक्षा त्या बदलांच एका आत्मनिर्भर भारताचा भाग होणं यात आपलं हित सामावलेलं आहे. 

भारतात वेगवेगळ्या आघाड्यांवर होऊ घातलेल्या बदलांविषयी पुढल्या भागात "चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट". 

जय हिंद!!!

क्रमशः 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

  



Sunday, 19 March 2023

चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट (भाग १)... विनीत वर्तक

 चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट (भाग १)... विनीत वर्तक 

काही वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे जेव्हा भारताच्या भूतपूर्व वित्तमंत्र्यांनी लोकसभेत एक जोरदार भाषण केलं होतं. त्यात त्यांनी सामान्य माणसाच्या भूमिकेतून विद्यमान सरकारने सुरु केलेल्या उपक्रमांची एक प्रकारे खिल्ली उडवली होती. त्यात त्यांनी डिजिटल इंडिया किंवा येऊ घातलेल्या डिजिटल व्यवहाराला ते सामान्य माणसाच्या कक्षेपासून खूप दूर असल्याची एक भविष्यवाणी त्यांनी केली होती. त्यांच्या भाषणात त्यांनी उपरोधिकपणे रस्त्यावर फळे, भाजी किंवा तत्सम विक्री करणारा विक्रेता आणि ती खरेदी करणारा ग्राहक हे कुठून डिजिटल व्यवहार करणार? त्यांनी केलेले व्यवहार आर्थिक कक्षेत कसे बसणार? असं म्हणून त्यांनी डिजिटल इकोसिस्टिम सामान्य भारतीयापासून कोसो लांब असल्याचं एक चित्र उभं केलं होतं. अर्थात ते उभं करताना त्यांचे स्वतःचे काही अनुभव असतील किंवा त्यांनी ते चित्र पक्षीय राजकारणातून उभं केलं असेल. पण म्हणतात न कधी कधी आपण जे बोलतो त्याच्या अगदी विपरीत परिस्थिती काळ आपल्या समोर उभी करतो. भारताचे ते अर्थतज्ञ त्यावेळी काळाची ती पावलं ओळखू शकले नाहीत किंवा त्यांनी ती मांडली नाही पण ती परिस्थिती येण्यापासून ते काळाला रोखू शकले नाहीत. 

आज भारत डिजिटल व्यवहारात जगात पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. ही आगेकूच इतकी प्रचंड आहे की अमेरिका, चीन आणि संपूर्ण युरोप जितके  डिजिटल व्यवहार करतात त्यांच्या एकत्रीत व्यवहारापेक्षा भारतात त्यापेक्षा जास्त आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरूपात होत आहेत. यात प्रत्येक वर्षी कित्येक पट वाढ होते आहे. याचा वेग इतका प्रचंड आहे की संपूर्ण जगात आणि आर्थिक तत्तवेत्ते असणाऱ्या सर्व लोकांना याची नोंद आज घ्यावी लागत आहे. याचा थोडा अंदाज आपल्याला आकड्यातुन येऊ शकतो. NPCI (National Payments Corporation of India) च्या छत्रछायेखाली २०१६ साली भारतात The Unified Payments Interface (UPI) चा श्रीगणेशा करण्यात आला. त्याच दरम्यान माजी अर्थमंत्र्यांनी वरील भाकीत केलं होतं. कदाचित ते खरं ठरेल अशी अपेक्षा ही सुरवातीला वाटली. कारण भारतीय मानसिकता हे त्याच मोठं कारण होतं. कागदांच्या रूपात अगदी एक आणि एक रुपयांचा हिशोब ठेवणारी आणि क्रेडिट अथवा कर्जाच्या मृगजळाला न भुललेली भारतीय आर्थिक मानसिकता डिजिटल व्यवहाराला कशी स्वीकारेल याबद्दल अनेक शंका होत्या. त्यात भारताची खूप मोठी लोकसंख्या खेड्यात रहाते. तिकडे ही व्यवस्था कितपत तग धरू शकेल याबद्दल अनेक आर्थिक सल्लागारांना शंका होती. 

पण त्याचवेळी भारतात वेगळेच वारे वहात होते. ते सांगत होते 'चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट' बदल हाच शाश्वत आहे. झपाट्याने अगदी खेडोपाड्यात पोहचलेले स्मार्ट मोबाईल फोन, स्वस्तात उपलब्ध होणारं इंटरनेट, जन-धन योजनेतून बँकिंग आणि आर्थिक क्षेत्राशी जोडला गेलेला एक मोठा वर्ग आणि त्यात भरीस भर म्हणून २०१९ साली आलेला कोरोना. या सर्व बाबी भारतात बदलांचे वारे एकाच वेळी घेऊन आल्या. त्यामुळेच अडचणीच्या काळात Unified Payments Interface (UPI) हे आर्थिक व्यवहारांसाठी एक जीवनदान ठरलं. असं म्हणतात एकदा का रक्ताची चटक लागली की मग त्याचाच मागोवा शिकारी घेत जातो. भारतीय या बाबतीत वेगळे नव्हतेच डिजिटल व्यवहारांची चटक भारतीयांना लागली. यु.पी.आय. ने सगळ्यात मुळाशी वार केला. अगदी १ आणि २ रुपयांचे व्यवहार पण जेव्हा सुरक्षिततेने डिजिटल प्रणालीने केले जाऊ लागले तेव्हा साहजिक भारतीयांना जवळ कागदी रक्कम बाळगण्याची गरज वाटू लागली नाही. हा  वेग किंवा हा ट्रेंड इतक्या झपाट्याने पसरत गेला ज्याची कल्पना त्याच्या निर्मात्यांनी ही केली नव्हती. 

२०२२-२३ या एका आर्थिक वर्षातील काही आकडे आपल्याला काय वेगात बदल होत आहेत याची जाणीव करून देऊ शकतात. फेब्रुवारी २०२३ मधे भारतात रोज यु.पी.आय. च्या माध्यमातून तब्बल ३६ कोटी व्यवहार होत आहेत. ज्यांची एकत्रित किंमत ६.२७ लाख कोटी रुपयांची आहे. फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत ही वाढ ५०% टक्के इतकी प्रचंड आहे. २०२२-२३ आर्थिक वर्षात आत्तापर्यंत ८८४० कोटी डिजिटल व्यवहार झाले आहेत. ज्यांची एकत्रित किंमत १२६ लाख कोटी रुपये आहे. ज्यात एकट्या यु.पी.आय. चा ५२% वाटा आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते ही केवळ सुरवात आहे. येत्या २-३ वर्षात भारतात होणाऱ्या सर्व आर्थिक व्यवहारातील ७५% वाटा हा डिजिटल व्यवहारांचा असणार आहे. आज यु.पी.आय. रोज १०० कोटी व्यवहार हाताळण्यात सक्षम आहे. पण ही क्षमता ही येत्या काळात कमी पडेल इतक्या वेगाने भारतात डिजिटल व्यवहारांचे वारे वहात आहेत. 

यु.पी.आय. जरी आज फुकट असलं आणि त्याने बँकिंग क्षेत्राला फायदा होत नसला तरी येत्या काळात तो होण्यासाठी काही पावले टाकली जातील. डिजिटल व्यवहाराचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कॅशलेस आर्थिक व्यवस्था. आपल्याला चलन निर्माण करण्यासाठी पण पैसे मोजावे लागतात. माझ्या, तुमच्या हातात असलेल्या प्रत्येक नोटेसाठी जवळपास ३ रुपये ते ५ रुपयांपर्यंत खर्च येतो. प्रत्येक वर्षी हा खर्च कित्येक करोडो रुपयांच्या घरात जातो. ज्या वेगाने आपण डिजिटल व्यवहारांकडे जातो आहोत त्याच वेळेस चलनी नोटांची मागणी झपाट्याने कमी होते आहे. येत्या २-३ वर्षात जर आपले ७५% व्यवहार डिजिटल झाले तर आपल्याला ७५% कमी चलनी नोटा लागतील. त्याचवेळी हा वाचलेला पैसा बँकिंग क्षेत्राला यु.पी.आय. सेवा देण्यासाठी वळवण्यात येईल. या शिवाय काही व्यवहारांसाठी शुल्लक अधिभार लावण्याचा ही विचार आहेच. 

यु.पी.आय.तर आलं पण आता तिकडे न थांबता येत्या काळात यु.पी.आय. ला अजून एका नवीन पर्वावर नेलं गेलं आहे. त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला स्तब्ध करणाऱ्या आहेत. इंटरनेट नसताना पण आता यु.पी.आय.च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. तुमच्याकडे स्मार्ट फोन असो वा नसो एका कॉल वर तुम्ही डिजिटल व्यवहार आता करू शकणार आहात. आज जरी डेबिट द्वारे यु.पी.आय. चे व्यवहार होत असले तरी येत्या काळात क्रेडिट ने तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकणार आहात. तुमच्या सगळ्या बिलांची काळजी यु.पी.आय. घेणार आहे. येत्या काळात यु.पी.आय.आणि इतर डिजिटल प्रणाली इतक्या सक्षम होणार आहेत की संपूर्ण भारतात तुम्हाला कॅश ची गरज पडणार नाही. तुम्ही, आम्ही विचार करतो त्या पेक्षा जास्त वेगाने हे बदल येऊ घातलेले आहेत. तेव्हा त्या बदलांना मागच्या अर्थमंत्र्या प्रमाणे नाकं मुरडण्यापेक्षा त्या बदलांचा सुरक्षितपणे भाग होणं ही काळाची गरज आहे. 

भारतात वेगवेगळ्या आघाड्यांवर होऊ घातलेल्या बदलांविषयी पुढल्या भागात "चेंज इज ओन्ली कॉन्स्टन्ट". 

जय हिंद!!!

क्रमशः 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.




Sunday, 12 March 2023

चारित्र्याचे कैवारी... विनीत वर्तक ©

 चारित्र्याचे कैवारी... विनीत वर्तक ©

सोशल मिडिया आपल्या खऱ्या आयुष्याचा गेल्या काही वर्षात भाग झाला आणि आता तो जवळपास आपलं आयुष्य बनलेला आहे. आधी अनोळखी लोकांना ओळखण्यापासून सुरु झालेला प्रवास आता अनोळखी लोकांच्या चारित्र्याचा दाखला ते त्याच हनन करण्या पर्यंत येऊन पोहचलेला आहे. अनोळखी लोकांच्या आभासी ओळखीतून आजवर अनेक लोक पडद्यामागून ते पडद्यासमोर बांधले गेले आहेत. कधी हे संबंध मैत्रीचे, नात्यांचे किंवा अगदी प्रेमाचे असले तरी त्यातून मिळणारी सोबत प्रत्येकाने आजवर अनुभवलेली आहे. एकीकडे जिकडे चांगली नाती किंवा परस्परांमधील संबंध दृढ होत गेले तिकडेच वेगवेगळ्या लोकांचा अप्रत्यक्ष प्रवेश आपल्या व्यक्तिगत आयुष्यात सुरु झाला. मग त्याच अनोळखी लोकांसमोर सिद्ध करण्याची एक स्पर्धा सुरु झाली. फेसबुक ही सोशल मिडिया मधलं असं अंगवळणी पडलेलं माध्यम. तिकडे रोज याची प्रचिती आपल्यापैकी प्रत्येकाला येतेच. 

सोशल मिडिया च आभासी जग आपल्या इतक्या जवळ आलं की ते म्हणजेच आपलं खरं आयुष्य असं अनेक जण जगायला लागले आहेत. त्यामुळेच इकडे आपल्या बद्दल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडला जाऊ लागला. हे सगळं लिहण्याचं कारण इतकच की आज स्वतःला या आभासी आयुष्यात सिद्ध करण्यासाठी अनेक जण जीवाचा आटापिटा करताना दिसतात. अनेकदा हे सगळं आपल्याला नैराश्याकडे घेऊन जाते आहे याचा अंदाज ही अनेकांना कडेलोट होई पर्यंत लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येते तेव्हा खूप काही उशीर झालेला असतो अथवा तुम्ही खूप काही गमावलेलं असते. या सगळ्यातून खूप कमी लोक बाहेर पडू शकतात. पडद्यामागच्या निरर्थक गुजगोष्टी एखाद्याला आपलं आयुष्य संपवून टाकण्या पर्यंत घेऊन जाऊ शकतात हे आपल्याला अजून उमगलेलं नाही हे खेदाने सांगावस वाटते. 

एखाद्याचं चारित्र्य काय असावं? ते चांगलं का वाईट याची सर्टिफिकेट घेऊन आज अनेक जण या आभासी विश्वात वावरत असतात. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या व्यक्तीची किंवा त्याच्या आयुष्याबद्दल अथवा व्यक्तिगत गोष्टींबद्दल काहीही माहिती नसताना त्या व्यक्तीच चारित्र्य हनन करण्याचा एक प्रकारे परवाना आपल्याला मिळालेला आहे अश्या आवेशात आपल्याच आजूबाजूला या व्यक्ती वावरत असतात. कारण आभासी जगात आपलं अंग काढण्याची सगळीच सोय उपलब्ध असते. एकतर तकलादू कायदे व्यवस्था त्यात सोशल मिडीयाच्या Garbage in, garbage out या उक्तीचा फायदा घेऊन मी नाही त्यातला अथवा त्यातली असं म्हणून नामनिराळं होण्याची वृत्ती आज सगळीकडे फोफावली आहे. आपण जे पुढे ढकलत आहोत त्याला कोणताही सबळ पुरावा अथवा कोणताही आधार नसताना फक्त असं ऐकलं या उक्तीवर एखाद्याच्या चारित्र्याच हनन करण्याची एक स्पर्धाच सुरु झाली आहे. 

स्क्रीन शॉट हा अजून एक प्रकार आजकाल सगळ्याच सोशल मिडिया मधून फोफावला आहे. कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिगत बोलणं हे त्या बोलण्याचा मागचा, पुढचा संदर्भ काढून त्याच चारित्र्य हनन करण्यासाठी सगळीकडे वापरलं जात आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीशी काय बोलावं अथवा काय संबंध ठेवावेत हा त्या दोन व्यक्तींचा संबंध असताना त्यातील मथळ्याचा चुकीचा अर्थ काढून अथवा त्याला आपल्याला हवं तसं एडिट करून त्यात मज्जा घेणाऱ्या लोकांचा आजकाल सुळसुळाट आहे. अर्थात यात खेदाने पांढरपेशा समाजातले स्वतःला प्रगल्भ समजणारे अनेक लोक समाविष्ट आहेत. या सगळ्याचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय फरक पडू शकतो याच सोयरसुतक ना ते शेअर करणाऱ्या लोकांना असतं ना त्यावर आपला मत ठोकून देणाऱ्या इतर लोकांना. 

सोशल मिडिया वर ज्या व्यक्ती अथवा ज्यांच चारित्र्य आपल्याला योग्य वाटत नाही अश्या लोकांना ब्लॉक करण्याचा ऑप्शन असताना त्यांच्या भिंतीवर किंवा त्यांच्या तोंडावर कौतुकाचे पाट वाहून दुसऱ्याच क्षणी त्या व्यक्तीच्या चारित्र्याचा उद्धार करणारे चारित्र्याचे कैवारी आजकाल सगळीकडे आहेत. अनेकदा या चिखलात आपण का उतरायचं याचा विचार करून अनेक व्यक्ती याकडे दुर्लक्ष करतात. पण याचाच अर्थ जे काही बोललं जात आहे त्याला मूक संमती आहे असा काढला जातो. संपूर्ण सोशल मिडियावर एखाद्याच्या चारित्र्याचा बाजार करून याच व्यक्ती पुन्हा येऊन मी नाही त्यातली / त्यातला असं समोरच्याला भासवत असतात. 

हे सगळं लिहण्याच कारण इतकच की सोशल मिडिया म्हणजे चारित्र्य ठरवण्याचं माध्यम नाही. कोणालाच कोणाचं चारित्र्य हनन करण्याचा कोणीच अधिकार दिलेला नाही. पण नकळत आपण त्याचा भाग बनत असू तर त्यामुळे होणाऱ्या परिणामांची पण एकदा आपण कल्पना करायला हवी. कारण आज ज्या गोष्टी आपण दुसऱ्यांबाबत बोलत आहोत किंवा पसरवत आहोत त्या आपल्या बद्दल पण होऊ शकतात. ज्या कोणी व्यक्ती याची सुरवात करतात त्यांच स्वतःच चारित्र्य बरबटलेलं असते आणि आपल्यापेक्षा कोणी पुढे जाऊ नये याचा आटापिटा ते करत असतात. त्यामुळे पुढल भक्ष्य तुम्ही स्वतः बनू शकता. 

सोशल मिडिया हे आयुष्य नाही. त्यामुळे इकडे कोणी कोणाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही. त्यामुळे इथल्या चारित्र्य सर्टिफिकेट वर तुम्ही स्वतःला जज करत असाल तर तुम्ही नैराश्याकडे खेदाने प्रवास करत आहात. लाईक, कमेंट आणि प्रसिद्ध ते स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात आपण आपल्या आनंदाची, सुख समाधानाची चावी सोशल मिडियाच्या हाती सुपूर्द करत आहात. ज्या वेळेस ही चावी अश्याच चारित्र्याचा कैवार घेतलेल्या लोकांच्या हाताला लागते तेव्हा तुमचा कधी बाजार उठून जातो तुम्हाला कळत सुद्धा नाही. त्यासाठीच अश्या चारित्र्याच्या कैवार घेऊन गॉसिप करणाऱ्या लोकांपासून स्वतःला अलिप्त ठेवणं महत्वाचं आहे. कारण आज दुसरं कोणीतरी तुमच्या गॉसिप चा विषय असेल पण तुमच्या नकळत तुमचाच कधी नंबर लागेल याचा अंदाज तुम्हाला स्वतःला पण येणार नाही. 

सोशल मिडिया हे आयुष्य नाही. तेव्हा या चारित्र्य हनन साखळीचा भाग होऊ नका. कोणाचंही व्यक्तिगत आयुष्य हे त्या व्यक्तीचा व्यक्तिगत भाग आहे. जोवर तुम्ही त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष जोडलेले नसाल तोवर त्याच्या व्यक्तिगत आयुष्यावर कोणतंही भाष्य करण्याचा ना कायद्याने अथवा ना सामाजिक दृष्टीने अधिकार आहे. आज आपण घेतलेली २ मिनिटांची मज्जा त्या व्यक्तीला आत्महत्या करेपर्यंत प्रवृत्त करू शकते याच भान सोशल मिडिया वापरणाऱ्या सर्वच व्यक्तींनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा या चारित्र्यांच्या कैवाऱ्यांपासून सावध रहा. स्वतः ते बनू नका. 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.

Thursday, 23 February 2023

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये... विनीत वर्तक ©

'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये'... विनीत वर्तक ©

गेल्या काही महिन्यांपासून खरे तर काही वर्षांपासून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा बदलायला सुरवात झाली आहे. भारत सरकारने घेतलेल्या योग्य निर्णयामुळे या बदलणाऱ्या प्रतिमेचा वेग प्रचंड वाढताना गेल्या काही दिवसात जास्त प्रकर्षाने जाणवत आहे. गेली ७ दशके जागतिक पातळीवर भारताची निर्माण झालेली प्रतिमा बदलायला वेळ लागणार हे अपेक्षित होतं. पण ती इतक्या लवकर बदलेल याची खूप शक्यता खूप कमी जणांना जाणवत होती. एकेकाळी जागतिक पातळीवर न्यूट्रल किंवा कोणत्याही बाजूने न झुकणारा, तसेच जागतिक मुद्यांवर सोडाच पण आपल्या घरातल्या मुद्यांवर पण संयत प्रतिमा देणारा देश अशी एक प्रतिमा जागतिक स्तरावर भारताची होती. त्यामुळे भारताच्या मताला कोणी विचारात घेत नव्हतं आणि त्याला किंमत पण दिली जायची नाही. 

भारत म्हणजेच भारताचं राजकीय नेतृत्व करणारे लोक, मंत्री हे काय बोलतात किंवा त्यांच्या बोलण्यामागे जागतिक पटलावर काही स्थितंतर येऊ घातली आहेत का? असे प्रश्न कधीच कोणत्या देशाला अथवा त्यांच्या राजकीय नेतृत्वाला पडलेले नव्हते. भारताची भूमिका काय असावी हे ही अनेकदा परदेशी शक्ती, विकसित देश किंवा भारताच्या भूमिकेचं चित्र जागतिक पातळीवर उभं करणारे टूलकिट ठरवत असे. ज्यात मोठ्या मोठ्या न्यूज एजन्सी, पत्रकार, संस्था आणि इतर लोक होते. ज्यांचे स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी अनेकदा भारताला गळचेपी भूमिका घ्यावी लागत होती. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणतात? भारताने एखाद्या मुद्यावर व्यक्त झाल्यावर युरोपियन राष्ट्रांची भूमिका काय असेल? रशियाला एखादी गोष्ट आवडेल का आवडणार नाही? देशातील अल्पसंख्याक लोकांची भूमिका काय असेल? अश्या अनेक गोष्टींवर भारताची प्रतिक्रिया गेल्या ७० वर्षात अवलंबून राहिलेली होती. अर्थात ती पूर्णपणे चुकीची होती असं मला अजिबात वाटत नाही. कारण परिस्थिती तशी होती पण अनेकदा परिस्थिती अनुकूल असूनसुद्धा भारताची भूमिका बदलण्याची ताकद असलेलं खंबीर नेतृत्व भारताकडे त्याकाळी नव्हतं हे आपल्याला मान्य करावंच लागेल. 

पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज भारत आत्मविश्वासाने पुढे जातो आहे. आज अनेक आघाड्यांवर भारताची भूमिका काय असेल याकडे जगाचं लक्ष लागलेलं असते. भारताच्या भूमिकेवर जागतिक भूमिका आज मांडली जाते. या गोष्टीला दुजोऱ्या देणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना आपण आज अनुभवत आहोत. तुर्की खरे तर भारताचा शत्रू देश म्हणावा लागेल. पण त्यांच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भारताने केलेली मदत आज जगात चर्चेचा विषय ठरलेली आहे. ही मदत नुसती भारत सरकार पर्यंत मर्यादित नाही तर भारताच्या लोकांनी स्वहस्ते केलेल्या मदतीचा ओघ अजून थांबत नाही आहे. हा ओघ इतका मोठा आहे की तुर्की च्या भारतातील कार्यालयात भारतीयांनी पाठवलेल्या मदतीला सामावून घेण्यासाठी जागा नसल्याचं ट्विट तुर्कीच्या राजदूतांनी केलं आहे. हे सगळं भारत कश्या पद्धतीने जागतिक स्तरावर मदतीला उभा राहतो आहे याच प्रतीक आहे. 

येत्या महिन्याभरात जगातील ४ राष्ट्रप्रमुख भारतात येत आहेत. ज्यात २५-२६ फेब्रुवारीला जर्मन चॅन्सलर ओलॉफ शॉल्झ भारतात येत आहेत. त्या पाठोपाठ इटली च्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी भारतात दाखल होत आहेत. त्या जात नाही तोच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ८ मार्च ला भारतात येत आहेत. त्या पाठोपाठ फ्रांस चे राष्ट्रप्रमुख इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात येत आहेत. एकाचवेळी युरोपातील ३ प्रमुख राष्ट्रांचे प्रमुख भारतात का येत आहेत? ते ही अवघ्या एका महिन्याच्या आत हे चित्र खूप काही विचार करायला लावणारं आहे. 

रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने मांडलेली संयत आणि तटस्थ पण जबाबदारीची भूमिका जागतिक पटलावर नोंदली गेली आहे. आज भारत कोणाच्या बाजूने झुकतो यापेक्षा तो आपल्या विरुद्ध जाऊ नये यासाठी त्या त्या देशांचे प्रतिनिधी सगळे प्रयत्न करत आहेत. याच एक बोलकं उदाहरण म्हणजे जर्मनी चे भारतातील राजदूत फिलिप अकरमन यांनी आपल्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी आधीच,

"भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे हा जर्मनीसाठी चिंतेचा विषय नाही." 

हे सांगून जर्मनीची भूमिका स्पष्ट केली आहे. याचा अर्थ काय तर भारत रशियासोबत काय व्यवहार करतो यात जर्मनी ढवळाढवळ करणार नाही. जर्मनीच्या राष्ट्रप्रमुखांची भेट ही जर्मनी आणि भारत हितसंबंधांसाठी आहे. त्याचा भारताच्या युक्रेन - रशिया युद्ध भूमिकेशी काही देणंघेणं नाही. 

माझ्या ज्ञात इतिहासात तरी जर्मनी सारख्या प्रगत युरोपियन राष्ट्राने अशी उघड भूमिका घेतल्याचं माझ्या वाचनात नाही. भारताने काय करावं अथवा काय करू नये हे भारताला आजवर सांगत आलेला युरोप आज स्वतः चुकूनसुद्धा भारताच्या विरुद्ध अथवा भारताला दुखावणारी भूमिका न मांडण्यासाठी स्पष्टीकरण देण्यासाठी आटापिटा करत आहे. 

आज भारताकडे एखाद्याला झुकवण्याची ताकद मग ती आर्थिक असो वा सैनिकी किंवा इतर ती आहे. तसे निर्णय घेणारी सरकारी यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व आहे. त्यामुळेच आज जग भारतापुढे झुकताना आपल्याला बघायला मिळते आहे. त्यासाठीच आज "झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये" ही युक्ती भारताच्या प्रतिमेबाबत खरी होताना दिसत आहे.  

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.