Thursday 23 February 2023

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये... विनीत वर्तक ©

'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये'... विनीत वर्तक ©

गेल्या काही महिन्यांपासून खरे तर काही वर्षांपासून जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा बदलायला सुरवात झाली आहे. भारत सरकारने घेतलेल्या योग्य निर्णयामुळे या बदलणाऱ्या प्रतिमेचा वेग प्रचंड वाढताना गेल्या काही दिवसात जास्त प्रकर्षाने जाणवत आहे. गेली ७ दशके जागतिक पातळीवर भारताची निर्माण झालेली प्रतिमा बदलायला वेळ लागणार हे अपेक्षित होतं. पण ती इतक्या लवकर बदलेल याची खूप शक्यता खूप कमी जणांना जाणवत होती. एकेकाळी जागतिक पातळीवर न्यूट्रल किंवा कोणत्याही बाजूने न झुकणारा, तसेच जागतिक मुद्यांवर सोडाच पण आपल्या घरातल्या मुद्यांवर पण संयत प्रतिमा देणारा देश अशी एक प्रतिमा जागतिक स्तरावर भारताची होती. त्यामुळे भारताच्या मताला कोणी विचारात घेत नव्हतं आणि त्याला किंमत पण दिली जायची नाही. 

भारत म्हणजेच भारताचं राजकीय नेतृत्व करणारे लोक, मंत्री हे काय बोलतात किंवा त्यांच्या बोलण्यामागे जागतिक पटलावर काही स्थितंतर येऊ घातली आहेत का? असे प्रश्न कधीच कोणत्या देशाला अथवा त्यांच्या राजकीय नेतृत्वाला पडलेले नव्हते. भारताची भूमिका काय असावी हे ही अनेकदा परदेशी शक्ती, विकसित देश किंवा भारताच्या भूमिकेचं चित्र जागतिक पातळीवर उभं करणारे टूलकिट ठरवत असे. ज्यात मोठ्या मोठ्या न्यूज एजन्सी, पत्रकार, संस्था आणि इतर लोक होते. ज्यांचे स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी अनेकदा भारताला गळचेपी भूमिका घ्यावी लागत होती. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणतात? भारताने एखाद्या मुद्यावर व्यक्त झाल्यावर युरोपियन राष्ट्रांची भूमिका काय असेल? रशियाला एखादी गोष्ट आवडेल का आवडणार नाही? देशातील अल्पसंख्याक लोकांची भूमिका काय असेल? अश्या अनेक गोष्टींवर भारताची प्रतिक्रिया गेल्या ७० वर्षात अवलंबून राहिलेली होती. अर्थात ती पूर्णपणे चुकीची होती असं मला अजिबात वाटत नाही. कारण परिस्थिती तशी होती पण अनेकदा परिस्थिती अनुकूल असूनसुद्धा भारताची भूमिका बदलण्याची ताकद असलेलं खंबीर नेतृत्व भारताकडे त्याकाळी नव्हतं हे आपल्याला मान्य करावंच लागेल. 

पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आज भारत आत्मविश्वासाने पुढे जातो आहे. आज अनेक आघाड्यांवर भारताची भूमिका काय असेल याकडे जगाचं लक्ष लागलेलं असते. भारताच्या भूमिकेवर जागतिक भूमिका आज मांडली जाते. या गोष्टीला दुजोऱ्या देणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडताना आपण आज अनुभवत आहोत. तुर्की खरे तर भारताचा शत्रू देश म्हणावा लागेल. पण त्यांच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी भारताने केलेली मदत आज जगात चर्चेचा विषय ठरलेली आहे. ही मदत नुसती भारत सरकार पर्यंत मर्यादित नाही तर भारताच्या लोकांनी स्वहस्ते केलेल्या मदतीचा ओघ अजून थांबत नाही आहे. हा ओघ इतका मोठा आहे की तुर्की च्या भारतातील कार्यालयात भारतीयांनी पाठवलेल्या मदतीला सामावून घेण्यासाठी जागा नसल्याचं ट्विट तुर्कीच्या राजदूतांनी केलं आहे. हे सगळं भारत कश्या पद्धतीने जागतिक स्तरावर मदतीला उभा राहतो आहे याच प्रतीक आहे. 

येत्या महिन्याभरात जगातील ४ राष्ट्रप्रमुख भारतात येत आहेत. ज्यात २५-२६ फेब्रुवारीला जर्मन चॅन्सलर ओलॉफ शॉल्झ भारतात येत आहेत. त्या पाठोपाठ इटली च्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी भारतात दाखल होत आहेत. त्या जात नाही तोच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ८ मार्च ला भारतात येत आहेत. त्या पाठोपाठ फ्रांस चे राष्ट्रप्रमुख इमॅन्युएल मॅक्रॉन भारतात येत आहेत. एकाचवेळी युरोपातील ३ प्रमुख राष्ट्रांचे प्रमुख भारतात का येत आहेत? ते ही अवघ्या एका महिन्याच्या आत हे चित्र खूप काही विचार करायला लावणारं आहे. 

रशिया - युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने मांडलेली संयत आणि तटस्थ पण जबाबदारीची भूमिका जागतिक पटलावर नोंदली गेली आहे. आज भारत कोणाच्या बाजूने झुकतो यापेक्षा तो आपल्या विरुद्ध जाऊ नये यासाठी त्या त्या देशांचे प्रतिनिधी सगळे प्रयत्न करत आहेत. याच एक बोलकं उदाहरण म्हणजे जर्मनी चे भारतातील राजदूत फिलिप अकरमन यांनी आपल्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी आधीच,

"भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे हा जर्मनीसाठी चिंतेचा विषय नाही." 

हे सांगून जर्मनीची भूमिका स्पष्ट केली आहे. याचा अर्थ काय तर भारत रशियासोबत काय व्यवहार करतो यात जर्मनी ढवळाढवळ करणार नाही. जर्मनीच्या राष्ट्रप्रमुखांची भेट ही जर्मनी आणि भारत हितसंबंधांसाठी आहे. त्याचा भारताच्या युक्रेन - रशिया युद्ध भूमिकेशी काही देणंघेणं नाही. 

माझ्या ज्ञात इतिहासात तरी जर्मनी सारख्या प्रगत युरोपियन राष्ट्राने अशी उघड भूमिका घेतल्याचं माझ्या वाचनात नाही. भारताने काय करावं अथवा काय करू नये हे भारताला आजवर सांगत आलेला युरोप आज स्वतः चुकूनसुद्धा भारताच्या विरुद्ध अथवा भारताला दुखावणारी भूमिका न मांडण्यासाठी स्पष्टीकरण देण्यासाठी आटापिटा करत आहे. 

आज भारताकडे एखाद्याला झुकवण्याची ताकद मग ती आर्थिक असो वा सैनिकी किंवा इतर ती आहे. तसे निर्णय घेणारी सरकारी यंत्रणा आणि राजकीय नेतृत्व आहे. त्यामुळेच आज जग भारतापुढे झुकताना आपल्याला बघायला मिळते आहे. त्यासाठीच आज "झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये" ही युक्ती भारताच्या प्रतिमेबाबत खरी होताना दिसत आहे.  

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.



1 comment: