Saturday 4 May 2019

चक्रीवादळ फनी... विनीत वर्तक ©

चक्रीवादळ फनी... विनीत वर्तक ©

काल भारताच्या पूर्व किनाऱ्यावर फनी चक्रीवादळाने तडाखा दिला. फनी चक्रीवादळ हे ४ थ्या श्रेणीमधील चक्रीवादळ होते. चक्रीवादळाच्या श्रेणी हे त्यात वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. फनी चक्रीवादळात असलेल्या वाऱ्यांचा वेग तब्बल २५० किमी/तास इतका प्रचंड होता. फनी चक्रीवादळाने भारताच्या ओरिसा राज्यातील पुरी इकडे हाहाकार माजवला पण योग्य नियोजन आणि समन्वय ह्यांच्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. ह्या वादळामुळे आत्त्तापर्यंत ६ लोकांना जीव गमवावा लागला आहे. पण फनी ची तीव्रता बघता ह्या चक्रीवादळात लाखो लोकांचा जीव जाण्याची शक्यता होती. सरकारी यंत्रणांनी तसेच आय.एम.डी. ने योग्य वेळात माहिती दिल्याने हा आकडा दुहेरी च्या खाली ठेवण्यात यश आलं आहे. मुळात ही चक्रीवादळ निर्माण होतात कशी? फक्त भारताची पूर्व किनारपट्टी ला ह्याचा नेहमी तडाखा का बसतो? ते ह्या वादळात कसा योग्य समन्वय साधल्याने अनेक निष्पाप जिवांचा जीव वाचला हे सगळं आपण जाणून घ्यायला हवं.

चक्रीवादळाची निर्मिती होण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणचा जो भाग महत्वाचा असतो तो म्हणजे ट्रोपोस्फिअर. हा वातावरणाचा भाग जमिनीपासून साधारण ७ किमी. ते २० किमी. उंचीवर असतो. ह्या भागात चक्रीवादळांची निर्मिती होते. बंगाल च्या उपसागराच्या पृष्ठभागाच तपमान हे साधारण २८ डिग्री सेल्सिअस आहे जे की अश्या वादळांच्या निर्मितीसाठी अतिशय योग्य आहे. जमीन सूर्याच्या उष्णतेने लवकर तापून लवकर थंड होते. पण पाण्याच्या बाबतीत ह्याला वेळ लागतो. तपमानातील उष्णतेच्या फरकामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. कमी दाबाचा पट्टा म्हणजे इथल्या हवेच वस्तुमान हे बाजूच्या हवेपेक्षा कमी असते. त्यामुळे जास्त वस्तुमानाची हवा इकडे ओढली जाते. गोल फिरणाऱ्या हवेला योग्य बाष्प मिळालं की त्याचा चक्रीवादळाकडे बनण्याचा प्रवास सुरु होतो. पाण्याच्या पृष्ठभागाच तपमान हे काम करत असते. ह्या बाष्पाच घन स्वरूपात रुपांतर होऊन मग ह्याची तीव्रता वाढत जाते. हे घोंगावणार चक्रीवादळ जेव्हा कोणत्याही जमिनीवर येते तेव्हा त्याचा इंधन स्त्रोत म्हणजे बाष्प संपते. इंधन संपल्यावर तिव्रता कमी झाल्यावर जमवलेला साठा पाऊसाच्या स्वरूपात जमिनीवर पडतो. इंधन म्हणजेच बाष्प आणि उर्जा संपल्याने वादळ शांत होते.

बंगाल चा उपसागराच स्थान आणि त्याच तपमान हे त्याच्या चक्रीवादळ निर्मितीमागे प्रमुख कारण आहे. बंगाल चा उपसागर ते प्रशांत महासागर ह्यांच्यात कमी जमीन असल्याने प्रशांत महासागर हा ह्या वादळांसाठी इंधन म्हणजेच बाष्प पुरवतो. बंगाल च्या उपसागरात येईपर्यंत जमीन नसल्याने निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला इंधन मिळत राहते. त्याची तीव्रता वाढत रहाते. ह्या उलट भारताचा पश्चिम किनारपट्टी वरील अरबी समुद्र बंगाल च्या उपसागरापेक्षा २ डिग्री ने थंड आहे. हा दोन डिग्री चा फरक इकडे चक्रीवादळांची निर्मिती होऊ देत नाही. पुढे जाऊन अरबी समुद्राच तपमान वाढल्यास भारताच्या पश्चिम किनारपट्टी ला ही अश्या महाकाय चक्रीवादळांचा तडाखा बसू शकतो.

जगातील सर्वात अधिक बळी घेणाऱ्या चक्रीवादळात पहिल्या सहा पेकी तब्बल पाच चक्रीवादळ ही बंगाल च्या उपसागरात निर्माण झालेली आहेत. १९७० साली आलेल्या वादळात तब्बल ५,५०,००० लोकांचा जीव गेला आहे. १९९२ साली ओरिसा ला दिलेल्या तडाख्यात जवळपास १०,००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ह्याची पुरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारने ह्यावर खूप उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळेच गेल्या वादळात काही डझन तर कालच्या फनी वादळात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा अगदी एकेरीत आला आहे. चक्रीवादळाशी सामना यशस्वी करायचा असेल तर सगळ्यात महत्वाच आहे ते म्हणजे त्याची निर्मिती ओळखणं. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याचा होणारा प्रवास ठरवणं. एकदा का त्याचा प्रवास निश्चित झाला की त्या मार्गावर योग्य त्या उपाययोजना करणं ज्यामुळे कमीतकमी जीवितहानी होईल.

India Meteorological Department (IMD) ने फनी चक्रीवादळाच्या आकलनासाठी योग्य ती उपाययोजना आधीच केली होती. वेळेआधीच बाकी सर्व यंत्रणांना येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती ची सूचना मिळाली. ह्यासाठी भारताचे अवकाशात असलेले रिमोट सेन्सिंग उपग्रह तसेच समुद्रात ठिकठिकाणी ठेवलेल्या सेन्सर च्या माहितीचा अभ्यास आय.एम.डी. ने अतिशय अचूकतेने केला. अवघ्या ५० की.मी. च्या अचूकतेने आय.एम.डी. ने सांगितलेल्या ठिकाणी फनी वादळाने भारतात प्रवेश केला. इतकी अचूकता अंदाजात आणण्यासाठी प्रचंड अभ्यास आणि प्रत्येक क्षणाला वातावरणात होत असलेल्या प्रत्येक बदलाचा अभ्यास प्रचंड गरजेचा होता. आय.एम.डी. ने वादळाची तिव्रता आणि त्याचा प्रवास ह्याची कल्पना सरकारला दिल्यावर सरकार च्या अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्री ते शेवटच्या पातळीपर्यंत यंत्रणा कामाला लागल्या.
भारतीय सेना, नौसेना, वायू दल, एन.डी.आर.फ., ओ.डी.आर.एफ., पोलीस, अग्निशामक दल, हॉस्पिटल्स, भारतीय रेल्वे, कोस्ट गार्ड सह पंतप्रधान कार्यालय ह्या सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. एकमेकात समन्वय साधताना १३ जिल्ह्यातील तब्बल १२ लाख लोकांपेक्षा जास्ती लोकांना सुरक्षित स्थळी वेळेआधी हलवलं गेलं. एन.डी.आर.एफ. ने आपल्या ६५ टीम मदतीसाठी उतरवल्या. ( प्रत्येक टीम मद्धे जवळपास ४५ लोकं असतात). एखाद्या युद्धासारख भारतीय सेनेने आपले ३ कॉलम कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार ठेवले. भारतीय नौसेने ने ६ बोटी बंगाल च्या उपसागरात तैनात केल्या. इकडे भारतीय वायू दलाने २ गोल्बमास्टर सी-१७ आणि सी-१३० विमाने तसच चार एन-३२ विमान बचावकार्यासाठी तयार ठेवली. तब्बल एक लाखापेक्षा जास्त खाद्य पाकिटे, औषधे, चादरी तसेच सगळ्या जिवनावश्यक गोष्टींचा साठा कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्यासाठी तयार ठेवला गेला. पोलीस दल, अग्निशामक दल ह्यांना पण तयार ठेवण्यात आलं. ह्या सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी २४ तास चालू असणारी कंट्रोल रूम ही सुरु केली गेली.

आय.एम.डी. च्या सुचने नंतर भारताची प्रत्येक यंत्रणा पूर्ण शक्ती आणि नियोजन करून फनी चक्रीवादळाचा सामना करण्यात सज्ज झाली. त्यामुळेच इतक्या प्रचंड ताकदीच्या फनी वादळाने भारताच्या ओरिसा ला तडाखा दिल्यानंतर ही जीवित हानीचा आकडा आपण हाताच्या बोटावर मोजू इतका रोखण्यात यशस्वी झालो. ह्या सगळ्यामागे सरकारी यंत्रणांचा समन्वय, त्यांनी दाखवलेली तत्परता, तसेच आय.एम.डी. सारख्या यंत्रणांनी वेळेआधी दिलेली धोक्याची सूचना कारणीभूत आहेत. ह्या सर्व यंत्रणांच अभिनंदन. वाढत्या तपमानामुळे फनी सारखी चक्रीवादळे येणाऱ्या काळात अजून जास्ती तिव्रतेने भारताच्या पूर्व किनारपट्टीला तडाखा देतील असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण ही शून्य जीवितहानी च्या दिशेने वाटचाल करत अश्या सगळ्या नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला करण्यात सक्षम होतं आहोत.

माहिती स्रोत :- विकिपिडीया, टाईम्स ऑफ इंडिया

फोटो स्रोत :- गुगल



No comments:

Post a Comment