Tuesday 3 September 2024

व्हॉट अ शॉट'... विनीत वर्तक ©

व्हॉट अ शॉट'... विनीत वर्तक ©

"व्हॉट अ शॉट" या नावाने काल एक क्लिप व्हायरल झाली आणि मन पुन्हा एकदा भूतकाळात गेलं. १९९८ चा काळ आणि शारजा क्रिकेट ग्राउंड. भारत आणि ऑस्ट्रेलिया च्या त्या सामन्यात मायकेल कास्प्रोवीच ला सचिन तेंडुलकर ने मारलेला तो उत्तुंग षटकार आणि टोनी ग्रेग च्या मुखातून निघालेले तेच शब्द पुन्हा ऐकल्यासारखे वाटले. पण यावेळेस ते शब्द एका भाष्यकाराच्या मुखातून बाहेर आले होते ते एका १७ वर्षाच्या मुलीसाठी जिच्या प्रतिभेने जगाला तोंडात बोटे घालायला लावली आहेत. जगातील एकमेव खांदा वापरून तिरंदाजी करणारी आणि आधुनिक कंपाऊंड धनुष्य वापरण्यात जगातील क्रमांक १ ची खेळाडू भारताची शितल देवी हिच्यासाठी.  

शितल देवी भारताच्या मुकुटात म्हणजेच जम्मू काश्मीर इथल्या एका छोट्या खेडेगावात गरीब घरात राहणारी एक सर्वसामान्य मुलगी. जन्मतः फोकोमेलिया, या एका दुर्मिळ जन्मजात विकारामुळे आपले हात गमावून बसलेली. या आजारामुळे तिच्या हाताची वाढ होऊ शकलेली नाही. दोन्ही हात नसताना आपल्या मुलीच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याची चिंता तिच्या आई वडिलांना लागून राहिलेली होती. शेती करणारे वडील आणि घरची बेताची परिस्थिती त्यात जम्मू काश्मीर सारखा संवेदनशील भाग अश्या सगळ्या खडतर परिस्थितीतून पुढे उज्ज्वल भविष्याचा विचार करण्याचं धाडस सर्वसामान्य माणसं करू शकत नाहीत. पण शितल वेगळी होती. म्हणतात न,

‘The only person stopping you is yourself. Where there is a will there is a way.’”

आपल्या दोन्ही हातांच्या नसण्याला शितल ने आपली सगळ्यात मोठं प्रेरणास्थान बनवलं. जे काम हात असणारी लोक करू शकतात ते आपण हात नसताना करून दाखवण्याचा चंग तिने बांधला. त्यातूनच मग हाताची काम पायाने आणि शरीराच्या इतर अवयवांच्या मदतीने करायला ती शिकली. मग ते लिखाण असो, केस विंचरण किंवा स्वतःला आरशात बघणं असो. वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत जगाच्या काय आपल्या गावाच्या खिजगणतीत नसलेल्या शितल मधल्या प्रतिभेला ओळखलं ते भारताच्या सैन्य दलाने. राष्ट्रीय रायफल या भारतीय सैन्य दलाच्या एका कार्यक्रमात हात नसताना फक्त आपल्या पायांच्या जोरावर शिताफितीने झाडावर सरसर चढणाऱ्या शितल मधील प्रतिभेला भारताच्या सैन्य दलाने अचूक हेरलं आणि तिथून सुरु झाला एक वेगळा प्रवास.

भारताच्या सैन्य दलाने तिला योग्य ती औषध, व्यायाम आणि तिच्यातील लपलेल्या तिच्या स्वतःच्या प्रतिभेची जाणीव करून दिली. तिला दिलेल्या वेगवेगळ्या पर्यायातून तिने तिरंदाजी मधे आपल्याला रस असल्याचं सांगितलं. पण तिरंदाजी करण्यासाठी हात असणं गरजेचं होतं आणि त्यासाठी कृत्रिम अवयव (प्रोस्थेटिक्स) बसवणं हा पर्याय निवडावा लागणार होता. पण प्रोस्थेटिक्स हा पर्याय शितल च्या बाबतीत अव्यवहार्य असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा शितल ने तिरंदाजी निवडण्याचा निर्णय घेतला. पॅराऑलम्पिक साठी भारतीय स्पर्धक तयार करण्याची जबाबदारी भारतीय सैन्याच्या या दलाने उचललेली होती त्यातून शितल च नाव पुढे आलं होतं. तिच्यातील प्रतिभेला पंखांचं बळ देण्यासाठी अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वाधवान या कोचेस नी अव्याहत प्रयत्न केले. त्यातून अवघ्या दोन वर्षात शितल ने तिरंदाजी चे संदर्भ आज बदलवून टाकले आहेत.

२०२२ च्या पॅरा एशियन खेळात शितल ने आपल्या प्रतिभेची चुणूक आणि भारतीय सैन्याने दाखवलेला विश्वास सार्थ करताना तब्बल दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. तिच्या वैशिष्ठपूर्ण अश्या धनुष्य बाण वापरण्याच्या कलेला अनेकांनी तेव्हाच कुर्निसात केला होता. दोन्ही हात नसताना ती तिचे धनुष्य तिच्या पायाच्या बोटांमध्ये पकडते आणि उजव्या पायाने उचलते. तिच्या जबड्याने बाण सोडण्यापूर्वी ती तिच्या खांद्याचा वापर करून स्ट्रिंग मागे खेचते. या गोष्टी वाचायला अतिशय सोप्या वाटत असल्या तरी प्रत्यक्षात करणं म्हणजे प्रत्यक्षात एखादं शिवधनुष्य उचलण्यापेक्षा कठीण काम आहे. जगात आजवर कोणीच असा पराक्रम महिलांच्या गटात करू शकलेलं नाही. यावरून शितल च्या प्रतिभेचा अंदाज आपण बांधू शकतो.

सध्या सुरु असलेल्या पॅरीस इथल्या पॅरा ऑलम्पिक खेळात आपल्या पहिल्या स्पर्धेत पहिला बाण सोडताना शितल ने 'बुल्स आय' म्हणजेच तंतोतंत लक्ष्याचा भेद केला. ते बघत असताना तिथल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि भाष्यकाराच्या अंगावर काटे उभे राहिले आणि नकळत त्यांच्या तोंडातून निघालं "व्हॉट अ शॉट". आजवर अनेक तिरंदाजांनी लक्ष्यच भेद केला असेल पण ज्या पद्धतीने,एकाग्रतेने आणि सर्व गोष्टी प्रतिकूल असताना शितल ने लक्ष्याचा भेद केला ते बघून आज सर्व जग म्हणते आहे. "व्हॉट अ शॉट"...

पॅरीस ऑलम्पिक मधे मेडल मिळवायला शितल कमी पडली असली तरी तिच्या प्रतिभेची जगाने नोंद घेतली आहे. नुसती नोंद नाही तर आज मेडल जिंकणाऱ्या स्पर्धकांपेक्षा शितल च्या त्या बुल्स आय ची चर्चा होते आहे. ज्यात विविध खेळातील जगातील नामवंत खेळाडू,समालोचक,प्रसिद्ध व्यक्ती समाविष्ट आहेत. असं म्हणतात,

"कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ हारना भी पडता है. और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं"...

आज शितल भले ऑलम्पिक च्या स्पर्धेत स्वतःच पदक मिळवायला कमी पडली असेल पण मिश्र गटात तिने आणि राकेश कुमार यांनी मिळून भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली आहे. तिच्या कोच अभिलाषा चौधरी यांच्या मते,

“शीतल देवी ने तिरंदाजी निवडली नाही, तर तिरंदाजीने शीतलची निवड केली आहे.”

पॅरीस ऑलम्पिक मधे खेळाच्या २२ प्रकारात तब्बल ४४०० दिव्यांग खेळाडू समाविष्ट आहेत. प्रत्येकजण काहीतरी कमी असताना आपल्या प्रतिभेने ती कमतरता भरून काढत ज्यांची प्रकृती निरोगी आहेत त्यांना दाखवून देत आहेत की आपल्या इच्छा आणि आकांक्षेपुढे आकाश पण ठेंगणं आहे. याच पॅरीस ऑलम्पिक मधे एकीकडे आपल्या १०० ग्रॅम वाढलेल्या वजनाचा बाऊ करत राजकारण करून सर्व जगाला दोष देऊन स्वतःला मोठं करणाऱ्या खुज्या प्रवृत्तीच्या खेळाडूंना बघताना मन थोडं विषण्ण झालं होतं पण त्याच पॅरीस मधे आपल्या प्रतिभेने, आपल्या मेहनतीने आपल्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल रडत न बसता आपल्या त्याच कमतरतेला आपलं शस्त्र बनवत जगाला नोंद घ्यायला लावणाऱ्या शितल देवी ला माझा कडक सॅल्यूट. शितल देवी आता फक्त १७ वर्षाची आहे आणि माझ्या मते,

ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं....

असे अनेक शॉट शितल च्या भात्यातून निघतील की जग त्याची नोंद घेईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तूर्तास तिच्या त्या शॉट साठी फक्त आणि फक्त...

'व्हॉट अ शॉट'....

फोटो सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



 

Friday 30 August 2024

स्टारलायनर... विनीत वर्तक ©

 स्टारलायनर... विनीत वर्तक ©


अवकाशात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधे अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनी (सुनीता) विल्यम्स यांना पृथ्वीवर पुन्हा सुरक्षित आणण्यासाठी स्पेस एक्स च्या क्रू ड्रॅगन चा वापर केला जाईल असं नासाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट करून बोईंग स्टारलायनरच्या भविष्यापुढे एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. हि सगळी घटना काय आहे? कशामुळे असं घडलं आहे? तसेच याचे दूरगामी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम काय होतील हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

आपण जर नासा च्या इतिहासात डोकावलं तर अवकाश संशोधनासाठी स्थापन झालेली ही संस्था कोल्ड वॉर च्या काळात माणसाच्या अवकाशात झेप घेण्याच्या प्रवासातील एक मूलभूत संस्था म्हणून नावारूपाला आली. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवलं ते याच संस्थेच्या अपोलो मिशन च्या माध्यमातून. पुढे नासाने आणि पर्यायाने अमेरिकेने इतर देशांसोबत इंटरनेशनल स्पेस स्टेशन अवकाशात उभारलं. तिकडे संशोधनासाठी अवकाश यात्रींची ने आण करण्यासाठी स्पेस शटल प्रोग्रॅम सुरु केला. ३१ ऑगस्ट २०११ ला नासाने स्पेस शटल प्रोग्रॅम बंद केला. पण याआधीच २०१० साली नासाने कमर्शियल लॉंचेस आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अवकाश यात्रींची नेआण करण्यासाठी बोईंग कंपनीला स्पेस क्राफ्टच संशोधन करण्यासाठी ९२.३ मिलियन अमेरिकन डॉलर दिले. यातूनच जन्माला आलं ते स्टारलायनर. पुढे २०१४ साली नासाने बोईंग ला २०३० पर्यंत जोवर आय. एस. एस. सुरु राहणार आहे तोवर अवकाश यात्रींची नेआण ६ वेळा आय.एस.एस. वर करण्यासाठी ४.२ बिलियन डॉलर च कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्याच वेळेस बोईंग ची स्पर्धक कंपनी स्पेस एक्स ला मात्र २.६ बिलियन च कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. स्पर्धेच्या बाबतीत बोईंग ने जरी आघाडी घेतली तरी ती बोईंग ला टिकवता आली नाही. स्पेस एक्स च क्रू ड्रॅगन जिकडे यशाची चव चाखत होतं दुसरीकडे बोईंग च स्टारलायनरच्या अडचणी वाढत जात होत्या.  

 २०१० नंतर प्रत्यक्षात स्टारलायनरच पहिलं उड्डाण व्हायला २० डिसेंबर २०१९ तारीख उजाडावी लागली. पण त्याही दिवशी स्टारलायनर आय.एस.एस. पर्यंत जाऊ शकलं नाही. अर्ध्या रस्त्यात पुन्हा त्याला पृथ्वीवर उतरवावं लागलं. जवळपास ८० पेक्षा जास्त त्रुटी नासा च्या इंजिनिअरिंग टीम ने स्टारलायनर मधे काढल्या. या सर्वांचं निराकारण करून मग पुन्हा उड्डाण करण्याचा विचार करण्याचा सल्ला बोईंग ला दिला. आधीच उशीर झालेल्या आणि आखून दिलेल्या बजेट पेक्षा जास्त खर्च होत चाललेल्या स्टारलायनर च्या प्रोग्रॅममुळे बोईंग च्या खिशाला कात्री बसायला सुरवात झाली होती. स्टारलायनर एक प्रकारे बोईंगसाठी पांढरा हत्ती बनत चाललं होतं आणि डोईजड व्हायला लागलं होतं. तिकडे याच काळात स्पेस एक्स च क्रू ड्रॅगन नासाच्या सगळ्या चाचण्यांमधून यशस्वीपणे पास होऊन अवकाशयात्रींची ने आण करत होतं. जुलै २०२३ मग ६ मे २०२४ त्यानंतर १८ मे २०२४, १ जून २०२४ अश्या सगळ्या तारखांना काही न काही कारणांमुळे स्टारलायनर च उड्डाण पुढे ढकलत राहिलं. शेवटी ५ जून २०२४ रोजी स्टारलायनर ने आय.एस.एस. कडे २ अवकाशयात्रींना घेऊन यशस्वी उड्डाण केलं. उड्डाण यशस्वी झालं तरी बोईंग च्या अडचणी संपल्या नव्हत्या.

५ जून २०२४ च्या दिवशी सुद्धा स्टारलायनर मधे हेलियम गळती असल्याचं नासा आणि बोईंग ला कळलेलं होतं. ही अवकाश यात्रा फक्त ८ दिवसांसाठी असल्याने आणि गळती अगदीच अडचणीची नसल्याने नासाने उड्डाणाला हिरवा कंदील दिला. ज्यावेळेस स्टारलायनर आय.एस.एस. शी डॉकिंग करण्याचा प्रयत्न करत होतं त्याचवेळी त्याच्या २८ थ्रस्टर पैकी ५ थ्रस्टर मधे तांत्रिक अडचणी येऊन ते बंद पडले. तरीपण स्टारलायनर यशस्वी पद्धतीने आय.एस.एस. शी जोडलं गेलं. नासाच्या दृष्टीने हेलियम गळती अवकाश यात्रींसाठी अगदी जिवन मरणाचा प्रश्न नसली तरी त्या सोबत थ्रस्टर च बंद पडणे हा स्टारलायनर आणि बोईंग च्या विश्वासार्हतेला खूप मोठा धक्का होता. चॅलेंजर आणि कोलंबिया या स्पेस शटल च्या अपघातानंतर नासाने आपल्या नियमात खूप बदल केलेले आहेत.  जिकडे अवकाश यात्रींच्या जिवाला धोका निर्माण होत असेल तर ती मोहीम अगदी शेवटच्या क्षणी रद्द करण्याची तसेच अर्ध्या रस्त्यात असेल तरीसुद्धा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी स्पष्ट भूमिका नासाने घेतलेली आहे.

सामान्य माणसाच्या मनात येईल की स्टारलायनर वरील २८ पैकी ५ थ्रस्टर बंद पडली तर त्यात काय मोठं. उरलेले थ्रस्टर तर यानाला व्यवस्थित उतरवू शकतात. पण हे ५ थ्रस्टर का महत्वाचे आहेत ते समजून घेण्यासाठी आपण थोडं सोप्प उदाहरण घेऊ. समजा तुम्ही एखाद्या मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवत असाल तेव्हा तुमच्या गाडीचा ब्रेक थोडा हळू लागला तरी त्याने फारसा फरक पडणार नाही. पण हेच समजा तुमची गाडी एखाद्या ट्रॅफिक मधे असेल तर पुढल्या किंवा बाजूच्या गाडीची तुमची टक्कर होऊ शकते. आता विचार करा की ट्रॅफिक मधे तुमच्या गाडीच्या सर्व बाजूला फेरारी, पोर्शे, जॅग्वार किंवा मर्सिडीज सारख्या गाड्या आहेत. आता जर तुमचा ब्रेक लागला नाही तर त्या गाड्यांशी टक्कर झाल्यावर आलेला बारीकसा ओरखडापण तुमच्या गाडीच्या किमतीपेक्षा जास्त महाग पडू शकतो. आता हेच जेव्हा तुम्ही अवकाशात विचार कराल तेव्हा याची दाहकता कित्येक पट वाढलेली असेल.

स्टारलायनर वरील ५ थ्रस्टर काम करत नाही याचा अर्थ स्टारलायनर वरील चालकाचा म्हणजेच अवकाश यात्री जे स्टारलायनर चालवणार आहेत त्यांचा पूर्ण कंट्रोल त्यावर नाही. आय.एस.एस. वरून विलग होताना किंवा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना समजा योग्य तो वेग, कोन आणि कक्षा जर नियंत्रित झाली नाही तर स्टारलायनर स्वतः तर नष्ट होईल पण त्यासोबत आय.एस.एस. त्याच्या दुसऱ्या बाजूला डॉक असलेलं क्रू ड्रॅगन यांना सुद्धा त्याचा धोका आहे. नासा आणि बोईंग ने कश्यामुळे स्टारलायनर वरील थ्रस्टर बंद पडली यासाठी अनेक वेळा पृथ्वीवर चाचण्या केल्या त्या चाचण्यातून असं स्पष्ट झालं की प्रॉपेलंट पाठवणाऱ्या यंत्रणेत असणारी सिल अचानक घट्ट होत असल्याने प्रॉपेलंट चा पुरवठा बंद होऊन थ्रस्टर बंद पडलेली आहेत. सर्व २८ थ्रस्टर वर अशी यंत्रणा किंवा सिल वापरले गेले आहेत. पृथ्वीवर केलेल्या अनेक चाचण्यांमध्ये अचानक ते अश्या पद्धतीने जॅम होत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. चॅलेंजर दुर्घटनेला फक्त दोन ओ रिंग जबाबदार होत्या. इकडे तर कोणत्याच सिल बद्दल खात्री सद्यस्थितीला बोईंग चे इंजिनिअर देऊ शकत नाहीत. जोवर स्टारलायनर पुन्हा पृथ्वीवर उतरत नाही तोवर यामागचं नक्की कारण कळणं अशक्य आहे.

थ्रस्टर आणि हेलियम ची सुरु असलेली गळती या दोन्ही गोष्टी अवकाश यात्री आय.एस.एस. मधे रिपेअर करू शकत नाही. या स्थितीत स्टारलायनर ला अवकाश  यात्रींसोबत पृथ्वीवर उतरवण्याची जोखीम नासा घ्यायला तयार नाही. बोईंग च्या इंजिनीअर आणि स्टारलायनर टीम ने गेले जवळपास २ महिने हेच नासाच्या टीम ला समजावण्याचा प्रयत्न केला पण स्टारलायनर चा इतिहास आणि स्पेस शटल मधील अपघातांचा इतिहास लक्षात घेता नासाने बोईंग ला पर्याय शोधल्याच स्पष्ट केलं आहे. बोईंग च्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा धक्का आहे. यानंतर स्टारलायनर च भविष्य काय असेल याबद्दल बोईंग सुद्धा सांशक आहे. कारण जर करारा प्रमाणे बोईंग नासाला स्टारलायनर वेळेत देऊ शकली नाही तर स्टारलायनर च्या निर्मिती वर झालेला खर्च बोईंग च्या खात्यातला असणार आहे. २०३० पर्यंत आय.एस.एस. ला रिटायर करण्याचं नासाने स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ बोईंग कडे फक्त ५-६ वर्षाचा कालावधी उरलेला आहे ज्यात कमीत कमी तीन वेळा तरी त्यांना अवकाश यात्रींची ने आण आय.एस.एस. वर करणं गरजेचं आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा नासाकडून स्टारलायनर ला या कामासाठी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला जाईल. पण सध्याची परिस्थिती बघता स्टारलायनर आणि एकूणच बोईंग च भविष्य दोलायमान आहे.

अवकाशात अडकलेले बुच विल्मोर आणि सुनी (सुनीता) विल्यम्स फेब्रुवारी २०२५ मधेच पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. ते स्पेस एक्स च्या क्रू ड्रॅगन मधून इतर दोन अवकाश यात्रींसोबत पृथ्वीवर येतील. यासाठी आता जाणारं क्रू ड्रॅगन आपल्यासोबत ४ ऐवजी फक्त २ अवकाश यात्रींचा क्रू घेऊन जाणार आहे. स्पेस एक्स ला मात्र स्टारलायनर च्या अपयशाने लॉटरी लागल्याचं स्पष्ट आहे. नासा ज्या मोहिमा स्टारलायनर सोबत करणार होती त्या सगळ्या आता स्पेस एक्स कडे जातील हे स्पष्ट आहे. रशिया आणि अमेरिका यांचे संबंध युक्रेन युद्धामुळे ताणले गेल्याने अमेरिकेला रशियाच्या यानाचा वापर करायचा नाही. पण स्टारलायनर च्या अपयशाने त्यांच्याकडे आता फक्त स्पेस एक्स च क्रू ड्रॅगन उपलब्ध आहे. तूर्तास हा वाढलेला काळ दोन्ही अवकाश यात्रींसाठी खूप खडतर असणार आहे. हे म्हणजे तुम्ही ८ दिवसांच्या ट्रिप ला निघालात आणि तुमचा मुक्काम ८ महिन्यांचा झाल्यासारखं आहे. पण हा मुक्काम अवकाशातील आहे त्यामुळे समोर उभ्या राहणाऱ्या अनेक अडचणी या तितक्याच मोठ्या स्वरूपाच्या असणार आहेत.

फोटो सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Saturday 24 August 2024

बदला... विनीत वर्तक ©

बदला... विनीत वर्तक ©


७ ऑक्टोबर २०२३ चा दिवस इस्राईलसाठी एक काळा दिवस होता. याच दिवशी हमास या आतंकवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी इस्राईल मधे घुसून तब्बल १२०० लोकांची निर्घृण हत्या केली आणि जवळपास २५० लोकांना बंधक बनवून ओलीस ठेवलं. हा इस्राईलच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आणि इस्राईल ची जगप्रख्यात गुप्तचर संघटना मोसाद च अपयश म्हणून जगाने याची नोंद घेतली. इस्राईल च्या इतिहासात जर डोकावून पाहिलं तर इस्राईल आणि इस्राईल मधील ज्यू लोकं नेहमीच अश्या प्रकारच्या हल्ल्याच्या सावटाखाली जगत आलेली आहेत. पण इस्राईल च वेगळंपण इकडे उठून दिसते जिकडे ते स्वतःला ज्यू लोकांचं राष्ट्र म्हणण्यापासून कचरत नाहीत आणि जे लोक अश्या हल्ल्याला जबाबदार असतात त्यांचा अगदी पद्धतशीरपणे खात्मा करून आपला बदला घेण्याची वृत्ती इस्राईल आजही जगत आलेला आहे.

सप्टेंबर १९७२ च्या म्युनिच ऑलम्पिक मधे इस्राईल च्या ११ खेळाडूंचा खून करण्यात आला. याचा बदला घेण्यासाठी इस्राईल च्या तत्कालीन पंतप्रधान 'गोल्डा मेअर' आणि रक्षा मंत्री 'मोशे डायन' यांनी 'ब्लॅक सप्टेंबर' च्या हल्ल्यासाठी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आणि त्यात सामील असलेल्या सर्वांना संपवण्यासाठी "Wrath of God" नावाचं एक सिक्रेट मिशन आखलं. इस्राईल च्या मोसाद ने अगदी चुनचुनके यातील प्रत्येकाला यमसदनी पाठवून आपला बदला पूर्ण केला होता. यासाठी अनेक वर्ष लागली पण प्रत्येकाचा खात्मा केल्याशिवाय मोसाद शांत बसली नव्हती. हे सगळं मिशन संपूर्ण होई पर्यंत जगाला याचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळेच आजही मोसाद ही जगातली क्रमांक एक ची गुप्तचर संघटना मानली जाते. अमेरिकेची सि.आय.ए. सुद्धा अनेकवेळा मोसाद पुढे फिकी असल्याचं संरक्षण क्षेत्रातील अनेक जाणकारांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे.

त्यामुळेच ७ ऑक्टोबर २०२३ चा इस्राईल भूमिवरील हल्ला मोसाद च मोठं अपयश मानलं गेलं. पण शांत बसतील ती मोसाद कुठली. जेव्हा जग झालेल्या गोष्टी विसरून पुढे जायला लागलं तेव्हा मोसाद बदला कसा घ्यायचा याचे डावपेच आखत होती. शोले चित्रपटातील एक संवाद खूप प्रसिद्ध आहे, "गब्बर सिंग अगर तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे" त्याच प्रमाणे मोसाद आपला बदला घेण्यासाठी शांतपणे आपलं काम करत होती. १२०० लोकांच्या जिवाचा बदला घ्यायचा होता. तेव्हा तो असा असायला हवा की त्याची जाणीव आपल्या शत्रुपक्षाला झोपेत सुद्धा व्हावी. राजकुमार च्या संवादासारखं मोसाद ने ठरवलं हा बदला घेताना, 

"बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा".

३१ जुलै २०२४ चा दिवस उजाडला तोच मुळी मोसाद ने केलेल्या बदल्याची घोषणा करून. इराण च्या राजधानी तेहरान मधे घुसून मोसाद ने हमासच्या अध्यक्षाची हत्या केली. 'इस्माईल हनियेह' ची शिकार म्हणजे एखाद्या राजाच्या राजवाड्यात घुसून सर्व संरक्षण यंत्रणा त्याची रक्षा करत असताना त्याची हत्या करण्यासारखं होतं आणि आपल्या अंगाला एकही ओरखडा न होता सुखरूप तिकडून बाहेर पडणं होतं. त्यामुळेच हमास या संघटनेला जबरदस्त धक्का बसला आहे. त्याचसोबत हमास च्या अध्यक्षाची हत्या इराण मधे करून इस्राईल ने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. इस्राईल वर झालेल्या हल्या नंतर इस्राईल आणि मोसाद त्याचा बदला घेणार हे सर्वश्रुत होतं याचा अर्थ हमास मधील अधिकारी, त्याचे अध्यक्ष आणि अजून त्या संबंधित लोकांची सुरक्षा किती जागरूक असेल याचा विचार आपण करू शकतो. हे सर्व असताना अगदी शांतपणे मोसाद ने इस्माईल हनियेह यांची शिकार केली. मोसाद तेवढ्यावर थांबली नाही तर त्याच दिवशी हिजबुल्लाचा एक मोठा नेता आणि अधिकारी 'फौद शुक्र' चा खात्मा करत आपल्या शत्रूची दोन्ही बाजूने कोंडी केली आहे. एकाचवेळी दोन मोठ्या नेत्यांच्या हत्येनंतर शत्रुपक्षाच्या निर्णय क्षमतेवर एक प्रकारे अंकुश बसवला आहे.

इस्माईल हनियेह यांच्या हत्येनंतर इराण मधे एकप्रकारे अफरातफरी माजली आहे. इस्माईल हनियेह यांना एक प्रकारे व्ही.व्ही.आय.पी. सारखी सुरक्षा व्यवस्था असताना त्यांना त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पलंगावर मारून मोसाद ने अक्षरशः हमास आणि इराण च्या किल्याला भगदाड पाडलं आहे. अश्या प्रकारची हत्या करण्याची यंत्रणा म्हणजेच ज्या पद्धतीची स्फोटके वापरण्यात आली ती आधीच तिकडे ठेवण्यात आली होती. ते तिकडे येणार हे मोसाद ला आधीच ठाऊक होते. याचा सरळ अर्थ हमास आणि इराण ची संरक्षण यंत्रणा मोसाद ने विकत घेतली आहे अथवा त्यांना फोडण्यात तिला यश आलं आहे. 

इस्माईल हनियेह यांच्या हत्येनंतर सगळ्यात मोठी अडचण आणि गोची अशी झाली आहे की आपलं नक्की कोण हे इराण आणि हमास दोघांनाही एक प्रकारे ठरवता येत नाही. कारण कोण विकलं गेलेलं आहे आणि कोण आपलं आहे याचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या हत्येनंतर किंवा मोसाद च्या मिशननंतर जे कोणी फितवले गेले आहेत त्यांना आपलं काय होणार याची पूर्ण जाणीव आहे. तरीसुद्धा आपल्या संघटने विरुद्ध आणि राष्ट्राविरुद्ध जाऊन मोसाद ला माहिती देण्यासाठी मोसाद ने काय पत्ते फिरवले असतील याचा विचार करण्याची गरज आहे. 

इस्राईल आणि मोसाद जगात आपला दबदबा राखून आहेत ते याच कारणामुळे. आपलं राष्ट्र, आपली माणसं आणि आपला धर्म हा त्यांच्यासाठी जिवापलीकडे श्रेष्ठ आहे. तिकडे पैसे आणि स्वतःच्या हितासाठी राष्ट्र विकलं जात नाही. राष्ट्रधर्म सर्वप्रथम असतो. त्यामुळेच इस्राईल बदला घेऊ शकते ते ही समोरच्याच्या नाकावर टिच्चून.  

"हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण"... विनायक दामोदर सावरकर

७ ऑक्टोबर २०२३ ला मोसाद चे अध्यक्ष 'डेव्हिड बारेना' यांनी सगळ्यांसमोर सांगितलं होतं की हमास संघटना चालवणारे जे कोणी लोकं आहेत, जे कोणी अध्यक्ष आहेत. ते जगात कुठेही लपून बसून दे. आम्ही त्यांचा खात्मा केल्याशिवाय सोडणार नाही. आज एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत मोसाद ने आपला बदला घेतला आहे. हमास संघटनेच्या अध्यक्षाला संपवून आपलं बोलणं खरं करून दाखवलं आहे. यालाच म्हणतात बदला घेणं. समोरच्याला समोरून वार करणं आणि सांगून संपवणं याला जिगर लागते. ती जिगर इस्राईल आणि मोसाद कडे आहे कारण त्यांच्याकडे खरा राष्ट्रवाद आहे, राष्ट्रप्रेम आहे.

या घटनेचे पडसाद येणाऱ्या काळात निश्चित पडतील. उद्या कदाचित इराण इस्राईल विरुद्ध युद्ध पुकारले अथवा अजून हल्ले करेल पण याचा विचार इस्राईल आणि मोसाद ने आधीच केलेला असेल. आजही जागतिक घडामोडी चालू असलेल्या बघितल्या तर इराण च्या मोकाच्या ठिकाणावर इस्राईल हल्ले करून प्रतिहल्याची शक्यताच संपुष्टात आणते आहे. तिकडे मोसाद अजून शिकार करतेच आहे. एकूणच काय तर बदला अजून पूर्ण व्हायचा आहे. याचे परीणाम काहीही झाले तरी आपल्या नागरीकांच्या सांडलेल्या रक्ताची किंमत वसूल केल्याशिवाय इस्राईल आणि मोसाद शांत बसणार नाहीत हे उघड आहे. कोणाला हे अयोग्य वाटेल, कोणाला इस्राईल अमानुष वाटेल पण,

"खून का बदला खून होता है" हे उघड सत्य आहे.

फोटो सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  






Thursday 24 August 2023

तोच चंद्रमा नभांत (भाग 2)... विनीत वर्तक ©

 तोच चंद्रमा नभांत (भाग 2)... विनीत वर्तक ©

चंद्राचा दक्षिण ध्रुव गेल्या काही वर्षात समोर आलेल्या निष्कर्षामुळे वैज्ञानिकांच्या रडारवर आहे. या भागात अनेक विवर आहेत. उंच सखल आणि खडकाळ असलेला हा भाग सूर्यापासून तसा लपलेला आहे. चंद्रावर वातावरण नसल्याने काही अब्जावधी वर्षापूर्वी त्यावर असलेलं पाणी हे सूर्याच्या उष्णतेने वाफेत रूपांतरित होऊन अवकाशाच्या पोकळीत नष्ट झालेलं आहे. पण चंद्राचा दक्षिण ध्रुवावरील काही भाग मात्र गेल्या अब्जोवधी वर्षांपासून सूर्यापासून लपलेला आहे. इथलं तपमान जवळपास शून्याच्या खाली उणे -230 डिग्री सेल्सिअस इतकं कमी आहे. यामुळेच अब्जोवधी वर्षापूर्वी तिकडं असलेलं पाण्याचं अस्तित्व चंद्राच्या पृष्ठभागावर बर्फाच्या स्वरूपात आजही असल्याचं सिद्ध झालेलं आहे. पण हे सगळं आजवर ऑर्बिटर च्या माध्यमातून सामोरं आलेलं होतं. प्रत्यक्षात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय आहे हे आजवर कोणालाही बघता आलेलं नव्हतं. 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजवर दुर्लक्षित आणि सुरक्षित असणारी बर्फाची गोष्ट ज्यावेळेस वैज्ञानिकांना वेध घ्यायला प्रवृत्त करायला लागली तेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करणार हे उघड होतं. पण चंद्राच्या इतर भागावर उतरणं आणि दक्षिण भागावर आपलं यान उतरवणं तितकं सोप्प नाही. कारण उणे -230 डिग्री सेल्सिअस मधे काम करताना यानाच्या इलेक्ट्रॉनिक्स मधे गडबडी होण्याची शक्यता जास्त असते. चंद्रावर दिवसा तपमान 250 डिग्री सेल्सिअस इतकं उकळतं असते तर रात्रीच्या वेळी ते उणे -130 डिग्री सेल्सिअस इतकं कमी होते. दक्षिण ध्रुवावर तर हा फरक अजून जास्ती होतो. तापमानातील इतका मोठा फरक सहन न करता आल्यामुळे अनेकदा यानाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर सिस्टीम मधे गडबडी होते आणि त्याच पर्यवसान मोहीम अपयशी ठरण्यात होते. त्यात भरीस भर म्हणून चंद्राचा दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभाग हा विवरांनी भरलेला असल्याने सपाट जागा कमी आहेत जिकडे यान सुरक्षितरीत्या उतरू शकेल. या कारणामुळेच आजवर दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवण्याची हिंमत आजवर जगातील प्रगत देश दाखवू शकलेले नव्हते. भारताने हे शिवधनुष्य उचलायचं ठरवलं आणि आपली चंद्रयान 2 मोहीम ही दक्षिण ध्रुवाकडे रवाना केली. 

चंद्रयान 2 मोहिमेत अगदी शेवटच्या क्षणी अपयश आलं पण हे अपयश इसरो च्या वैज्ञानिकांना खूप काही शिकवून गेलं. यातूनच चंद्रयान 3 मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली गेली. नेमकं काय चुकलं आणि काय चुकू शकते याचा अभ्यास केला गेला. अभ्यासातून जे निष्कर्ष पुढे आले त्यावर काम केलं गेलं. झालेलं काम एकदा नाही दोनदा नाही तर अनेकवेळा तपासून बघितलं गेलं. एखादी गोष्ट काम करणार नाही असं गृहीत धरून पर्यायी मार्ग शोधले गेले तसं तंत्रज्ञान विकसित केलं गेलं. खरे तर चंद्रयान 2 च्या वेळेस जी चूक झाली होती त्यात बदल करायला इसरोला एक सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा होता. पण इसरो ने तब्बल 4 वर्ष घेतली ती आपला अभ्यास परिपूर्ण करण्यासाठी. सगळ्या शक्यतांचा विचार करून मगच पुढे जायचं हे इसरो ने ठरवलं होतं. त्यामुळेच चंद्रयान 3 मोहिमेला उड्डाणासाठी 4 वर्षाचा कालावधी लागला. 

भारताने चंद्रयान 3 मोहीम अवकाशात पाठवल्या नंतर रशियाने आपलं ल्यूना 25 यान आपण चंद्राच्या कक्षेत पाठवत असल्याचं जगासमोर आणलं. तोवर ही गोष्ट रशियाने जगापासून आणि आपल्या मित्रापासून म्हणजेच भारतापासून लपवून ठेवली होती. तसं तर रशिया ल्यूना 25 या मोहिमेवर गेली 10 वर्ष काम करत होता. पण त्यांच लॅण्डर रेडी आहे अथवा मोहीम आखण्यासाठी तयारीत आहे असं कोणालाही माहित नव्हतं. खरं तर रशियाने घाईगडबडीत ही मोहीम पुढे रेटली. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशिया मधील जनता त्रस्त झाली आहे. एकेकाळी अवकाश क्षेत्रातील दादा आणि थोरला असणारा रशिया गेल्या काही वर्षात अवकाश क्षेत्रात विशेष असं काही करू शकलेला नाही. त्यांचे सोयूझ रॉकेट आजही मानवी उड्डाण करण्यासाठी सुरक्षित असले तरी काळाच्या कसोटीवर ते पिछाडीवर पडले आहेत हे सत्य रशियाला सुद्धा माहित होतं. त्यामुळेच भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवण्याचा घाट रशियाने घातला. 

13 सप्टेंबर 1959 चा दिवस होता जेव्हा मानवी इतिहासात रशियाने (आधीचा सोव्हियत युनियन) सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं यान ल्यूना 2 उतरवलं होतं. जे काम आपण जवळपास 60 वर्षापूर्वी केलं ते आता का नाही करू शकणार असा विचार रशियाने केला. त्यामुळे वेळ न दवडता त्यांनी ल्यूना 25 ला चंद्राच्या कक्षेत पाठवून दिलं. इकडे एक लक्षात घ्यायला हवं की चंद्राच्या कक्षेत येईपर्यंत रशियाचे सोयूझ 2.1 बी रॉकेट हे सगळं कार्य करत होतं. ल्यूना 25 यानावरील इंजिन तोवर ना तपासली गेली होती ना त्यांच कार्य बघितलं गेलं होतं. कारण रशियाच रॉकेट इतकं प्रबळ होतं की  त्याने ल्यूना 25 ला चंद्राच्या दारात आणून सोडलं. त्यामुळे रशियन वैज्ञानिकांच्या गणिताचा खरा कस लागलाच नाही. भारताच्या बाबतीत मात्र गणित एकदम विरुद्ध होतं. भारताकडे प्रबळ रॉकेट नसल्याने अगदी पृथ्वीच्या कक्षेपासून भारतीय वैज्ञानिकांना सिंगल शॉट पद्धतीने चंद्रयान 3 ची कक्षा वाढवत नेत त्याला चंद्राकडे ढकलावे लागलं होतं. त्याचवेळी चंद्राच्या घराजवळ आल्यावर त्याचा वेग कमी करण्यासाठी पुन्हा उलट्या पद्धतीने इंजिन्स प्रज्वलित करायला लागली होती. 

भारतीय वैज्ञानिकांना चंद्रयान 1 आणि 2 तसेच मंगळयान मोहिमेमुळे सिंगल शॉट पद्धतीवर खूप चांगलं नियंत्रण मिळवता आलेलं आहे. या पद्धतीत सगळ्यात महत्वाचं असते ती अचूक वेळ आणि तुमची बदललेली डेल्टा व्हेलॉसिटी. वेग आणि वेळ यांच अचूक नियंत्रण जर नसेल तर तुमचं यान गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे आपली कक्षा सोडून भलतीकडे जाऊ शकते ज्याचं पर्यावसन एकतर कपाळमोक्ष किंवा अवकाशात भरकटंण हे असते. इसरो ने वेग आणि वेळेचं गणित अतिशय अचूक जमवून आणलं होतं. यासाठी तुमच्या इंजिन्स फायरिंग वर तुमच्या सिस्टीम च योग्य नियंत्रण, इंजिन्स नी निर्माण केलेला थ्रस्ट आणि तुम्ही साधलेली योग्य वेळ अतिशय महत्वाची असते. चंद्रयान 2 आणि 3 च्या बाबतीत इसरो च्या  प्रॉपल्शन मॉड्यूल च्या इंजिन्स नी आपलं काम चोख बजावलं. जेव्हा तुम्ही कोणत्याही ग्रह अथवा आपण म्हणून अवकाशात कोणत्याही बॉडी भोवती अंडाकार म्हणजेच एलिप्टिकल ऑर्बिट मधे फिरत असतात त्यावेळी दोन टोकांवरील वेगात फरक असतो. जेव्हा तुम्ही त्या बॉडीच्या सगळ्यात जवळ असतात तेव्हा तुमचा वेग सगळ्यात जास्ती असतो. जेव्हा तुम्ही सगळ्यात लांब असतात तेव्हा तुमचा वेग सगळ्यात कमी असतो. 

भौतिकशास्त्र हे सांगते की जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त वेगात असतात तेव्हा तुम्ही केलेला बदल म्हणजेच डेल्टा व्हेलॉसिटी ही तुमचा वेग सगळ्यात जास्त वाढवते. याचा अर्थ तुम्ही जर तुमची इंजिन्स सगळ्यात जवळ असताना प्रज्वलित केली तर तुमचा वेग कित्येक पटीने वाढतो आणि तुमची कक्षा रुंदावली जाते. कारण जास्त वेगामुळे तुम्ही जास्त दूरवर फेकले जातात. आता हाच नियम उलट पण लागू आहे. जेव्हा तुम्ही उलट दिशेने इंजिन्स प्रज्वलित करता तेव्हा तुमचा वेग जास्त कमी होतो म्हणजेच कक्षा कमी होते. यामुळे प्रत्येक सेकंद हा अतिशय महत्वाचा असतो. 1 सेकंद कमी जास्त आणि कक्षेत कित्येक किलोमीटर चा फरक पडू शकतो. हे सगळं लिहण्याच कारण इतकच ल्यूना 25 मधे जी गडबड झाली ती इकडेच झाली. सोयूझ रॉकेट ने चंद्राच्या दारात नेऊन सोडलेल्या ल्यूना 25 ला आपला वेग कमी करत चंद्रावर उतरण्याच्या आधी 18 किलोमीटर ची कक्षा गाठायची होती. याचा अर्थ 18 किलोमीटर उंचीवरून ते चंद्रावर उतरणार होतं. (विक्रम लॅण्डर च्या बाबतीत ही उंची 30 किलोमीटर होती.). ल्यूना 25 च्या इंजिन्स ला जेव्हा रशियाच्या रॉसकॉसमॉस ने चालू करण्याचा कमांड दिला तेव्हा त्याची इंजिन्स चालू तर झाली पण बंद व्हायचं नाव त्यांनी घेतलं नाही. जोवर सिस्टीम हँग होऊन बंद झाली तोवर मी वर लिहिलं तसं इंजिन्स जास्त काळ प्रज्वलित झाल्याने 18 किलोमीटर ची उंची गाठायच्या ऐवजी ल्यूना 25 चा वेग इतका कमी झाला की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने त्याचा कपाळमोक्ष चंद्राच्या पृष्ठभागावर झाला. 

भारताच्या विक्रम लॅण्डर आणि  प्रॉपल्शन मॉड्यूल वरील यंत्रणांनी मात्र आपलं काम चोख केलं होतं. जर तुमची ही यंत्रणा अगदी सेकंदाच्या वेळेप्रमाणे अचूक चालली तर तुम्हाला कमीत कमी इंधन लागते कारण तुम्ही गाठलेली कक्षा ही तितकी अचूक असते. भारताच्या चंद्रयान 3 च्या प्रॉपल्शन मॉड्यूल वरील इंजिन्स आणि यंत्रणेने इतकं अचूक काम केलं आहे की अजून जवळपास 150 लिटर इंधन त्यावर शिल्लक आहे. ज्यामुळे प्रॉपल्शन मॉड्यूल हे कदाचित कित्येक वर्ष चंद्राच्या भोवती परिवलन करत राहू शकेल. इसरो ने त्याचा कार्यकाळ जास्तीत जास्त 6 महिने ठेवला होता. पण अतिशय अचूक कक्षा गाठल्यामुळे इंजिन्स कमीवेळा प्रज्वलित करावी लागली. त्यामुळे इंधन जास्त प्रमाणात खर्च झालं नाही. आपल्या कक्षेत फिरत राहण्यासाठी प्रॉपल्शन मॉड्यूल अगदी थोडं इंधन गरजेचं आहे. जोवर इंधन त्यावर आहे तोवर त्याची इंजिन्स प्रज्वलित होत राहतील आणि प्रॉपल्शन मॉड्यूल आपल्या ठरलेल्या कक्षेत (100 किलोमीटर उंचीवर) कदाचित काही वर्ष आरामात राहू शकेल. 

याच प्रॉपल्शन मॉड्यूल वर Spectro-polarimetry of HAbitable Planet Earth (SHAPE) नावाचं उपकरण आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे उपकरण पृथ्वी सारख्या मानवाला राहण्यास योग्य असणाऱ्या ग्रह अथवा लघुग्रहांच्या वातावरणाचा शोध घेईल. आता आपण विचार करू की नक्की याचा काय उपयोग तर याच्या माध्यमातून आपल्याला ग्रहाच्या वातावरणाचा एक ढोबळ अंदाज येईल त्यावरून आपण आपल्या शोधांची पुढची रूपरेषा आखू शकू. एखादी मोहीम तिकडे न्यायची का? नक्की राहण्यायोग्य असेल का? हा अभ्यास असल्याशिवाय अंधारात कोणीच उडी घेणार नाही. हे जे उपकरण आहे त्याच आयुष्य आधी 6 महिने होतं पण आता कित्येक वर्ष झालं आहे. 

एकीकडे रशिया सारखा प्रबळ देश आपल्याला 60 वर्षापूर्वी अवगत असलेलं तंत्रज्ञान वापरण्यात चुकला तिकडे आजवर कधी चंद्रावर पाऊल न ठेवलेल्या भारताने अतिशय सुरळीत चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा झेंडा रोवला. 1600 कोटी रुपये खर्चून चंद्रावर पाठवलेलं ल्यूना 25 अयशस्वी झालं तर 615 कोटी खर्च करून पाठवलेलं चंद्रयान 3 आज इतिहासाची पान आपल्या सुवर्ण अक्षरांनी लिहिते आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही पहिले उतरता की दुसरे. प्रश्न हा आहे की तुमची तयारी योग्य झाली आहे न? कारण तयारी नसताना जेव्हा आपण शर्यतीत पळायला जातो तेव्हा आपण अश्याच पद्धतीने तोंडावर आपटतो. रशियाने घाई करून 1600 कोटी रुपये तर उडवले पण आंतरराष्ट्रीय पटलावर आपल्या नावाला एक असा डाग लावला आहे जो कधीच पुसला जाणार नाही. रशियाने भारताला वेळोवेळी अवकाश क्षेत्रात मदत केली आहे. त्यामुळेच रशियाचं अपयश जास्ती जिव्हारी लागणारं आहे. जेव्हा आपला मित्र हरतो किंवा मागे पडतो तेव्हा विजयाचा आनंद पूर्णपणे उपभोगता येत नाही हेच खरं. तूर्तास रशिया यातून शिकेल आणि पुन्हा एकदा चंद्रावर यशस्वी स्वारी करेल हीच अपेक्षा आहे.

 जय हिंद!!!

ता.क. :- विक्रम लॅण्डर आणि एकूणच चंद्रयान 3 मोहिमेतील अनेक क्लिष्ट गोष्टींविषयी सोप्या शब्दात जाणून घेऊ या मालिकेच्या पुढल्या भागात. 

क्रमश: 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Wednesday 23 August 2023

तोच चंद्रमा नभांत (भाग 1)... विनीत वर्तक ©

 तोच चंद्रमा नभांत (भाग 1)... विनीत वर्तक ©

आजवर आपण रात्रीचं चांदणं बघत आलो. रात्रीच्या त्या गडद अंधारात आपल्या शीतल प्रकाशाने भुरळ घालणाऱ्या त्या चंद्राच्या प्रेमात कोणी पडलं नसेल अशी व्यक्ती क्वचित सापडेल. आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र त्यासाठीच वैज्ञानिक संशोधनाच्या दृष्टीने सगळ्यात मोठं आकर्षण राहिला आहे. ज्या वेळेस नभांपलीकडे जाण्याचं तंत्रज्ञान मानवाने शिकलं. त्यानंतर त्याच पहिलं लक्ष्य चंद्रच होता. 21 जुलै 1969 चा तो दिवस होता जेव्हा मानवाचं पहिलं पाऊल चंद्रावर उमटलं. त्यानंतर अनेकांनी आपली पावलं चंद्राच्या मातीत उमटवली  देशांनी आपले उपग्रह त्यावर उतरवले. एकेकाळी अतिशय औत्सुक्याचा विषय असणारा चंद्र फक्त माती आणि दगड धोंड्यानी भरलेला आहे मानवाला 1970 च्या दशकात समजून चुकलं. त्यामुळेच चंद्रावर स्वारी केल्यावर मानवाचा खरे तर वैज्ञानिकांची चंद्राबद्दल असलेली उत्सुकता संपलेली होती.14 नोव्हेंबर 2008 चा दिवस होता ज्यावेळेस भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेत सोबत असलेल्या मुन इम्पॅक्टर प्रोब ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हार्ड लँडिंग (कोसळताना) चंद्राच्या पृष्ठभागावर उडालेल्या धुराळयात पाण्याचं अस्तित्व दाखवून दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा तो नभात असलेला चंद्रमा पुन्हा एकदा वैज्ञानिकांना खुणावू लागला. 

आपल्या पहिल्या यशानंतर भारताने पुन्हा एकदा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी केली ती 2019 साली. आजवर पृथ्वी सोडून दुसऱ्या कोणत्या परग्रहावर यान उतरवण्याचा अनुभव भारताच्या आणि इसरो च्या पाठीशी नव्हता. जे काही तंत्रज्ञान अवगत होतं त्यात इसरोने अगदी चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किलोमीटर पर्यंत यशस्वी मजल मारली. पैश्याचा अभाव, तंत्रज्ञानाच्या मर्यादा, रॉकेट आणि इतर गोष्टींच्या मर्यादा आणि सगळ्यात मोठं म्हणजे अश्या मोहिमेत अपयश आल्यावर झेलाव्या लागणाऱ्या टीकेचा त्रास सहन करत भारताच्या वैज्ञानिकांनी स्वबळावर 2019 साली केलेला प्रयत्न अगदी शेवटच्या क्षणी फसला. सर्व भारतीयांना तो क्षण आजही आठवत असेल. अगदी ओंजळीत पिण्यासाठी घेतलेलं पाणी निसटून जावं आणि आपल्याला तहानलेलं राहावं लागावं अशीच ती अवस्था होती. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या गोष्टी अश्या प्रयत्नात अगदी सामान्य असल्या तरी जिकडे रॉकेट अवकाशात पाठवायला खर्च का करायचा असे प्रश्न विचारले जातात तिकडे हे नुकसान खूप मोठं होतं. त्यामुळेच तत्कालीन इसरो चीफ के. सिवान यांच्या डोळ्यात आलेले अश्रू खूप काही सांगून गेले. 

असं म्हणतात, 

"अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है"... 

आज 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेद्वारे विक्रम लॅण्डर ने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून त्या अश्रूंना आज आनंदाच्या अश्रूत परावर्तित केलं आहे. 1969 साली अमेरिकेत जे घडलं ते आज भारतात घडताना मला व्यक्तिशः जाणवते आहे. त्यावेळी अमेरिकेने कोल्ड वॉर च्या लढाईत निर्णायक आघाडी चंद्रावर मानव उतरवून घेतली हा इतिहास असला तरी त्यापेक्षा अमेरिकेची आणि तिथल्या लोकांची मानसिकता या घटनेने बदलवून टाकली. येणाऱ्या दशकात अमेरिका तांत्रिक बाबतीत आघाडीवर राहिली आणि जगातील सगळ्यात प्रगत राष्ट्र असलेली अमेरिकन माणसाची मानसिकता आजही कायम आहे. आज भारताच्या विक्रम लॅण्डर ने केलेला पराक्रम हा त्याच तोडीचा आहे. तांत्रिक बाबतीत भारताने मिळवलेलं यश जितकं महत्वाचं आहे त्याहीपेक्षा कैक पटीने भारताच्या आणि भारतीयांच्या मानसिकतेत झालेला बदल जास्ती महत्वाचा आहे. आपण स्वबळावर आणि स्वस्तात तंत्रज्ञान विकसित करू शकतो. त्या पलीकडे आलेल्या अपयशाने खचून न जात अजून जोमाने आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करू शकतो हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. 

ज्यावेळेस जागतिक पटलावर रशिया  रॉसकॉसमॉस आणि भारताच्या इसरो च्या अध्यक्षांना सारखा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्या दोघांनी दिलेलं उत्तर बदललेली मानसिकता अधोरेखित करते. रॉसकॉसमॉस च्या अध्यक्षांना ज्यावेळी विचारण्यात आलं की जवळपास पाच दशकानंतर रशिया ल्यूना 25 मोहिमेद्वारे चंद्रावर पुन्हा जातो आहे. त्यावेळेस या मोहिमेच्या यशाची खात्री म्हणजेच ल्यूना 25 सॉफ्ट लँडिंग करण्याची किती खात्री आपल्याला आहे? यावर त्यांनी सांगितलं होतं की जवळपास 70% आम्ही यशस्वी होऊ. हाच प्रश्न जेव्हा इसरोच्या अध्यक्षांना विचारला गेला तेव्हा उत्तर होतं, आमच्या चंद्रयान 3 चे सगळे सेन्सर निकामी झाले, आमचा संपर्क काही काळासाठी तुटला अगदी त्याची दोन इंजिन जरी बंद पडली तरी आमचा विक्रम लॅण्डर हा चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग करेल. या दोन्ही उत्तरात मानसिकतेत असलेला बदल तुम्ही, आम्ही सगळेच जाणवू शकतो. 

एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेआधी विचारावं की तुझा अभ्यास किती झाला आहे? त्यावर त्याने उत्तर द्यावं की काहीही येऊन दे मी यशस्वी होणार, ते पुस्तकातलं असू दे, दुसऱ्या कोणत्या पुस्तकातलं असू दे, सिलॅबस मधलं असू दे नाहीतर अजून कुठलं असू दे. मला त्याने काही फरक पडत नाही. माझा बेस पक्का आहे. प्रश्न कितीही कठीण आला तरी त्याला सोडवण्याची माझी तयारी आहे. मला खात्री आहे की मी तो बरोबरचं सोडवेन. हा आत्मविश्वास येण्यासाठी त्या विद्यार्थ्याने रात्रीचा दिवस केलेला असतो हे कोणीही सांगेल कारण असा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तुम्ही तुमची तयारी इतकी पक्की केलेली असते की समोर काय येते याची भिती नसते तर येणारा प्रश्न आपण किती सहजरीत्या सोडवू याचा विचार असतो. अगदी अशीच स्थिती आज इसरो मधील प्रत्येकाची होती आणि त्यांच्या मनातील तो आत्मीश्वास इसरो च्या अध्यक्षांनी दिलेल्या उत्तरातून जाणवत होता. 

आज जेव्हा विक्रम लॅण्डर ने चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास सुरु केला तेव्हा पडद्यावर दिसणारे आकडे त्याची साक्ष देत होते. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गोष्ट ज्याला कॉपी बुक म्हणता येईल अशी घडत होती. मग ती ब्रेक डाऊन फेज असो वा एका ठिकाणी विक्रम लॅण्डर ने हॉवरिंग करणं असो. जे मापदंड आखले गेले होते त्यातल्या प्रत्येक मापदंडात आज विक्रम लॅण्डर चा प्रवास झाला. विक्रम लॅण्डर ने सॉफ्ट लँडिंग केलं यापेक्षा ते ज्या पद्धतीने केलं त्याचा अभ्यास जागतिक स्तरावर केला जाणार आहे. कारण जवळपास 3 लाख 84 हजार किलोमीटर लांबून वातावरण नसताना एखाद्या परग्रहावर अशी अचूकता निर्माण करण्याचं तंत्रज्ञान हे शिकणं आहे. युरोपियन स्पेस एजन्सी चे अध्यक्ष जोसेफ अॅशबॅकर यांची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हणाले की, 

Landing of Chandrayaan-3 as an “incredible” event. “What a way to demonstrate new technologies and achieve India's first soft landing on another celestial body, “Well done. I am thoroughly impressed.”

ते असं का म्हणाले याच एक उदाहरण सांगतो, विक्रम लॅण्डर जेव्हा चंद्राच्या पृष्ठभागापासून 150 मीटर उंचीवर असणारं होतं तेव्हा खाली उतरण्याआधी आपल्या खाली काही धोका आहे का हे बघण्यासाठी 20 सेकंद एका ठिकाणी तंरंगणार होतं. तुम्ही पुन्हा जाऊन जर यु ट्यूब वर ते लाईव्ह बघितलं तर अगदी 149.98 मीटर वर येऊन विक्रम लॅण्डर तरंगायला लागलं. आपण 0.02 मीटर खाली आहोत हे त्याच्या कॉम्प्युटर च्या लक्षात आल्यावर विक्रम लॅण्डर च्या कॉम्प्युटर ने त्याची उंची पुन्हा 150.20 मीटर इतकी केली. हे सगळं अवघ्या 5 सेकंदात घडलं. त्या नंतर खाली कोणताही धोका नाही हे लक्षात आल्यावर विक्रम लॅण्डर ने आपला पुढला प्रवास सुरु केला. 

हे सगळं सांगण्याचं कारण इतकचं ही अचूकता आज इसरो आणि भारताच्या वैज्ञानिकांनी स्वबळावर मिळवली आहे. त्यामुळेच विक्रम लॅण्डर च सॉफ्ट लँडिंग हे त्या पलीकडे आहे. हे कदाचित जोसेफ अॅशबॅकर यांना जाणवलं असेल असा माझा कयास आहे. कारण यातलं आर्टिफिशियल इंटीलिजन्स च तंत्रज्ञान, त्या तंत्रज्ञानाने इंजिन आणि इतर सेन्सरवर मिळवलेलं प्रभुत्व आणि या सर्वांना एकत्रित आणून विक्रम लॅण्डर च सॉफ्ट लँडिंग करणारी इसरो एक लंबी रेस का घोडा तर आहेच पण हा घोडा आता शर्यतीत उतरला आहे हे त्यांना नक्की पटलं असेल. 

21 जुलै 1969 चा दिवस जसा अमेरिका, नासा आणि पर्यायाने प्रत्येक अमेरिकन माणसाच्या मानसिकतेला कलाटणी देणारा होता तसाच 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारत, इसरो आणि प्रत्येक भारतीयांच्या मानसिकतेला कलाटणी देणारा असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यावेळी पण तोच चंद्रमा नभांत होता आणि आजही तोच चंद्रमा नभांत आहे. फरक इतकाच आहे की आज त्यावर आपला झेंडा रोवणारा देश वेगळा आहे. 

जय हिंद!!!

ता.क. :- विक्रम लॅण्डर आणि एकूणच चंद्रयान 3 मोहिमेतील अनेक क्लिष्ट गोष्टींविषयी सोप्या शब्दात जाणून घेऊ या मालिकेच्या पुढल्या भागात. 

क्रमश: 

फोटो शोध सौजन्य :- गुगल 

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Sunday 30 July 2023

'मौका सबको मिलता हैं'.... विनीत वर्तक ©

'मौका सबको मिलता हैं'.... विनीत वर्तक ©

२०१४ च वर्ष होतं जेव्हा भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत आपलं यान यशस्वीपणे प्रक्षेपित केलं. आजवरच्या इतिहासात जे कोणत्या देशाला जमलं नाही अशी कामगिरी भारताने जगाला करून दाखवली होती. एकतर भारताने अशी कामगिरी स्वबळावर पहिल्याच प्रयत्नात करणं आणि त्यातही सगळ्यात कमी खर्चात करणं यामुळे सो कॉल्ड वेस्टर्न मिडिया ला प्रचंड मिरच्या झोंबल्या होत्या. त्याचीच भडास एका व्यंगचित्राच्या रूपाने न्यूयॉर्क टाइम्स ने प्रसिद्ध केली. भारताचा अपमान करणारं हे व्यंगचित्र जगात भारताच्या प्रगतीबद्दल किती खदखद आहे ते दाखवून तर गेलंच पण यासाठी न्यूयॉर्क टाइम्स ला उघडपणे माफी मागण्याची नामुष्की आली. अँड्र्यू रोसेन्थल, न्यूयॉर्क टाइम्सचे संपादकीय पृष्ठ संपादक यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. पण म्हणतात न, 

जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती... 

हे व्यंगचित्र काढणारे चित्रकार होते 'हेंग किम सॉंग'. जरी हे चित्रकार सिंगापूर मध्ये रहात असले तरी चीन चे नागरिक आहेत. भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या यशाने चिनी चित्रकाराला मळमळ झाली. त्याचा द्वेष त्याच्या कुंचल्यांमधून प्रकट झाला. हे व्यंगचित्र आजही बघितल्यावर प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. या व्यंगचित्रात एका बाजूला एका आलिशान रूम मधे एलाईट स्पेस क्लब मधले सदस्य बसले आहेत. ते वृत्तपत्रातील बातम्या वाचत आहेत. त्यात भारताचे यान मंगळावर पोहचल्याची बातमी आहे. त्याच रूम च्या बाहेर एका गाईला घेऊन धोतर नेसलेला एक भारतीय आत मधे येण्यासाठी दरवाजावर ठोठावत आहे. एक प्रकारे गरीबांचा आणि गाई, बैलांना घेऊन शेती करणारे भारतीय आता स्पेस क्लब चा भाग होऊ पहात आहेत अशी भारतीयांची थट्टा आणि टिंगल त्यातून दाखवली गेली होती. 

हेंग किम सॉंग तर भारताचा अपमान करणाऱ्या लोकांमधील हिमनगाचे एक टोक होतं. त्यांच्या लाईनीत बी.बी.सी.,अल-जझीरा, न्यूयॉर्क टाइम्स, फायनान्शियल टाइम्स अश्या अनेक वृत्तसंस्था आणि त्यांचे प्रतिनिधी होते. पण त्यावेळी भारताने अथवा भारताच्या वैज्ञानिकांनी त्याला कोणतंही शाब्दिक उत्तर दिलं नाही. गौतम बुद्ध म्हणतात तसं, 

"हजार लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे चांगले. मग विजय तुमचाच आहे. तो तुमच्याकडून हिरावून घेता येणार नाही."

त्यामुळेच इसरो ने आपल्या कृतीतून आपण काय आहोत हे आजवर दाखवून दिलेलं आहे. याच वेस्टर्न मिडिया ची मळमळ अजून कमी झालेली नाही याची अनेक उदाहरणे देता येतील. ज्यावेळेस भारताने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडून जागतिक विक्रम केला तेव्हा या वेस्टर्न मिडिया ने या उपग्रहांचं वजन फक्त १३०० किलोपेक्षा जास्त असल्याचं म्हणत असे छोटे उपग्रह कोणीही प्रक्षेपित करेल असे लेख लिहले. काही वर्षांनी जेव्हा स्पेस एक्स ने १४३ उपग्रह एकत्र सोडून इसरो चा रेकॉर्ड मोडला तेव्हा एकाही मिडिया हाऊस ने त्यांच एकत्रित वजन छापण्याची तसदी घेतली नव्हती. कारण स्पेस एक्स ने सोडलेल्या १४३ उपग्रहांचे एकत्रित वजन १००० किलोपेक्षा कमी होतं. ज्यावेळेस भारत अशी कामगिरी करेल तेव्हा वजनाचा मुद्दा पुढे रेटायचा आणि आपलं कोणी केलं कि त्याची संख्या दाखवायची. अर्थात यातून भारताबद्दल यांची असणारी मळमळ अजून जास्ती दिसून येते. 

मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्थापन केल्यावर बी.बी.सी. च्या एका पत्रकाराने लाईव्ह मुलाखतीत भारतात इतके मिलियन लोकं गरीब असताना हे असले स्पेस चे खेळ का करायचे असं स्वतःच मत थोपवलं होतं. ज्यांच्यावर आम्ही १५० वर्ष राज्य केलं त्यांनी आपला देश सांभाळावा असं त्यातून दाखवून दिलं. ही मळमळ यासाठी की एकेकेळी ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य अस्ताला जात नसे त्यांचा आज स्वतःचा असा काहीच स्पेस प्रोग्रॅम नाही न त्यांनी अवकाशात जाऊन जगाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही भलं केलं आहे. आज युरोपियन युनियन मधून बाहेर पडल्यावर युनायटेड किंग्डम स्वतःच जी.पी.एस. उभारणार होता. पण त्यांची ही योजना अजून कागदावर राहिली आहे आणि त्यांचे वैज्ञानिक पळून गेले आहेत. तर दुसरीकडे भारताची आज स्वतःची नाविक प्रणाली आहे. जी नासा च्या जी.पी.एस. पेक्षा कैक पटीने सरस असल्याचं जागतिक पातळीवर मानलं गेलं आहे. 

चंद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आलेल्या अपयशानंतर याच वेस्टर्न मिडिया ने रकाने भरून भारताचं काय चुकलं आणि कसे पैसे वाया गेले यावर लेख लिहले पण या सगळ्यात भारताने काय मिळवलं आणि अश्या मोहिमांमध्ये अपयश अगदी नासा ला ही आलेलं आहे हे पद्धतशीरपणे लपवण्यात आलं. अर्थात त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा नव्हतीच. आजही जेव्हा भारताने अवघ्या ४ वर्षात पुन्हा चंद्रावर स्वारी केली आहे तेव्हा यांची मळमळ पुन्हा बाहेर यायला सुरवात झाली आहे. भारताच्या चंद्रयान ३ च्या प्रक्षेपणाबद्दल लिहताना सुरवात मात्र अमेरीका, रशिया, चीन ४ दिवसात पोहचले आणि भारताचं चंद्रयान ३ हे ४२ दिवसात पोहचण्यासाठी रवाना झालं अशी केली आहे. अर्थात त्यांची री ओढणारे भारतात ही काही कमी नाहीत. पण हे सगळे विसरता आहेत की नियती म्हणून एक गोष्ट असते आणि ती "मौका सबको देती हैं"... 

थोडे दिवस थांबा अजून आम्ही भारतीय ते व्यंगचित्र विसरलेलो नाहीत आणि कधी विसरणार पण नाही. तुम्ही व्यंगचित्रातून तुमची मळमळ बाहेर काढत रहा. आम्ही आमच्या कर्तृत्त्वाने दाखवून देऊ की, मौका सबको मिलता हैं...

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.    




Tuesday 25 July 2023

चार ते चाळीस दिवसांचा प्रवास... विनीत वर्तक ©

 चार ते चाळीस दिवसांचा प्रवास... विनीत वर्तक ©

गेल्या काही दिवसांपासून इसरो आणि पर्यायाने भारताची खिल्ली उडवणारा एक मेसेज फेसबुक आणि व्हाट्स अप च्या माध्यमातून फिरतो आहे. एकीकडे जिकडे अमेरिका, रशिया आणि चीन ची चंद्रयान ४ दिवसात चंद्रावर गेलेली आहेत. तिकडे भारताला मात्र ४० दिवस लागत आहेत. चंद्रयान आणि त्या मोहिमेतील तांत्रिक अडचणी याचा अभ्यास न करता फक्त राजकारणाच्या उद्देशाने जी चिखलफेक सुरु आहे ती नक्कीच कुठेतरी उद्दिग्न करणारी आहे. यासाठीच ही पोस्ट लिहावीशी वाटली. चार ते चाळीस दिवसांचा हा प्रवास आपण समजून घेतला पाहिजे. 

चंद्र जरी पृथ्वीवरून जवळ वाटत असला तरी पृथ्वी ते चंद्र हे अंतर सरासरी ३,८४,४०० किलोमीटर इतकं आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र हा पृथ्वी भोवती परिवलन करतो. जेव्हा आपण हे चित्र स्वरूपात बघतो तेव्हा फक्त दोन पटलांवर बघत असतो. जर तिसऱ्या पटलाचा  विचार केला तर असं लक्षात येईल की ही दोन्ही परिवलन एका सरळ रेषेत होत नसतात. आता हा झाला एक भाग पृथ्वीवरून चंद्राकडे जाण्यासाठी आपल्याला दोन गुरुरुत्वाकर्षण शक्तींनवर मात करत प्रवास करायचा असतो. पृथ्वी च गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड आहे की तुमच्या यानाचा वेग ४०,००० किलोमीटर/ तास वेग गाठावा लागतो तेव्हाच तुम्ही पृथ्वी पासून अवकाशात प्रवास करू शकता. त्याचवेळी चंद्राच्या गुरुत्वाकर्षणात अडकण्यासाठी तुम्हाला यानाचा वेग ७५८० किलोमीटर / तास इतका कमी करण्याची गरज असते. चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा १/६ असल्याने वेगाचं हे गणित महत्वाचं आहे. 

कोणत्याही चंद्र मोहिमेत सगळ्यात कठीण काम आहे ते वेगाचं नियंत्रण. पृथ्वी वरून सुटण्यासाठी एकीकडे तुम्हाला ४०,००० किलोमीटर / तास वेग गाठावा लागतो. पण हा वेग गाठला तरी पृथ्वी आणि चंद्र यातलं अंतर या वेगाने आपण ९ तास आणि काही मिनिटात कापू शकू. त्याचवेळी आपल्याला ब्रेक लावून यानाचा वेग ७८५० किलोमीटर/ तास इतका कमी करायचा आहे. नाहीतर आपलं यान चंद्रा पलीकडे निघून जाईल किंवा चंद्रावर जाऊन आदळेल. आता आपण चंद्र आणि पृथ्वी यांच्या परिवलनाचा वेग लक्षात घेऊ. पृथ्वी स्वतःभोवती १६७० किलोमीटर / तास या वेगाने फिरते तर चंद्र पृथ्वीभोवती ३६८३ किलोमीटर / तास या वेगाने परिवलन करतो आहे. आता हे सगळं सांगण्याचं कारण इतकं की पृथ्वी वरून निघताना कोणत्याही यानाचा वेग आणि वेळ अतिशय अचूक असणं गरजेचं आहे. जर का यातली एकही गोष्ट थोडी जरी चुकली तर पुन्हा त्यात बदल करण्यासाठी अत्यंत कमी जागा उपलब्ध आहे. 

अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी विकसित केलेली रॉकेट ही जास्त शक्तिशाली आहेत. त्यामुळे हे देश पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव मोडून आपली यान थेट चंद्राकडे पाठवू शकलेले आहेत. रॉकेट जास्त शक्तिशाली करण्यासाठी आणि जास्त अंतर पार करण्यासाठी साहजिक रॉकेट बनवण्याचा खर्च जास्ती येतो. रॉकेटला जास्त इंधन वाहून न्यावं लागते. त्याची यंत्रणा तितकी सक्षम करावी लागते. या सगळ्याचा आपण पैश्याच्या स्वरूपात विचार केला तर ही रक्कम कित्येक कोटी अमेरिकन डॉलर च्या घरात जाते. या तिन्ही देशांनी हे तंत्रज्ञान आणि रॉकेट बनवण्यासाठी कित्येक कोटी डॉलर खर्च केले आणि पृथ्वीपासून चंद्राकडे अवघ्या ४ दिवसात हे देश आपलं यान पाठवू शकलेले आहेत. मग असं असताना भारताने हा मार्ग का निवडला नाही? असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. तर त्यासाठी आपण भारताने वेगळा मार्ग का निवडला हे समजून घेऊ. 

भारतात आजही अवकाश क्षेत्राकडे पांढरा हत्ती असं बघणारे अनेक लोक आहेत. चंद्रावर जाण्यापेक्षा तेवढ्या पैश्यातून गरिबांचे कल्याण करता आलं असतं असा सूर आजही प्रत्येक मोहिमेनंतर आवळला जातो. कारण गरिबांना सगळं फुकट देण्याची वाईट सवय आपण लावलेली आहे. असो तर मुद्दा असा आहे की एखाद्या अवकाश मोहिमेसाठी देण्यात येणाऱ्या पैश्यावर आजही बंधन आहेत. मग कमी खर्चात चंद्रावर जायचं असेल तर थोडा लांबचा पण स्वस्त असा मार्ग निवडणं हाच पर्याय इसरो कडे होता. वर लिहिलं तसं गुरुत्वाकर्षण ही एक खूप मोठी शक्ती आहे. तिचा वापर करून आपण यान पाठवू शकतो हे इसरो  ओळखलेलं होतं. स्वस्त आणि सुरक्षित पद्धतीने यान चंद्रावर नेण्यासाठी इसरो ने स्लिंग शॉट किंवा ज्याला गोफण पद्धती म्हणतात त्याचा वापर केलेला आहे. या पद्धतीत तुमच्या यानाला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण भेदण्याची शक्ती खुद्द पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण देते. त्यामुळे जास्त इंधन नेण्याची गरज भासत नाही. कमी शक्तिशाली रॉकेट च्या साह्याने सुद्धा आपण अपेक्षित वेग गाठून अंतराळात जाऊ शकतो. 

शेतातील पिकांवर आलेली पाखरं उडवण्यासाठी गोफणीचा वापर केला जातो. यात गोफण अतिशय वेगात गोल फिरवली जाते. गोफणीच्या वेगामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या सेंट्रिफ्युगल फोर्स (केंद्रापसारक शक्ती) मुळे त्यातील दगड अतिशय वेगात दूरवर भिरकावला जातो. अश्याच पद्धतीने इसरो ने आपलं चंद्रयान ३ हे पृथ्वीच्या लंब गोलाकार कक्षेत आपल्या रॉकेट च्या साह्याने प्रक्षेपित केलं. पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरते त्या वेगाचा फायदा उचलत जेव्हा यान पृथ्वीच्या अगदी जवळ येते तेव्हा त्याची इंजिन काही वेळासाठी प्रज्वलित केली जातात. या प्रज्वलनामुळे यानाचा वेग थोडा वाढतो पण पृथ्वी भोवती कक्षेत फिरताना तिच्या १६,००० किलोमीटर / तास वेगाचा फायदा घेत यानाचा वेग कित्येक पटीने वाढला जातो. यान अजून दूरवर फेकलं जाते. आपण असं म्हणू की त्याची लंब गोलाकार कक्षा वाढत जाते. जितके वेळा यान पृथ्वी भोवती घिरट्या घालेल तितके वेळा त्याचा वेग वाढत जातो. एक क्षण असा येतो की जेव्हा यान पृथ्वी च गुरुत्वाकर्षण भेदण्याचा वेग म्हणजेच ४०,००० किलोमीटर / तास प्राप्त करते. आता गरज असते ती गोफण सोडण्याची. इतका वेळ गोलाकार फिरवून यानाला एक शेवटचा धक्का लागतो. तो दिला की यान पृथ्वी पासून कायमसाठी अंतराळात भिरकावलं जाते. यालाच तांत्रिक भाषेत ट्रान्स-लूनर इंजेक्शन (TLI) म्हणतात. 

चंद्रयान ३ ला आत्तापर्यंत ५ वेळा अश्या पद्धतीने योग्य वेळी इंजिन प्रज्वलित करून अतिशय लंब गोलाकार कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. शेवटच्या मॅन्युव्हर मधून आता त्याची कक्षा १,२७,६०९ किलोमीटर X २३६ किलोमीटर अशी झालेली आहे. याचा अर्थ चंद्रयान ३ आता पृथ्वीपासून जास्तीत जास्त जवळ २३६ किलोमीटर वर असते तर सगळ्यात लांब १,२७,६०९ किलोमीटर अंतरावर जाते. हे अंतर कापताना त्याचा वेग ४०,००० किलोमीटर / तास च्या जवळपास पोहचलेला आहे. आता पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला पृथ्वीपासून लांब जाण्यासाठी लागणारा वेग देते आहे. साधारण १ ऑगस्ट २०२३ ला इसरो ट्रान्स-लूनर इंजेक्शन (TLI) म्हणजेच गोफणीतून दगड दूर भिरकावून देईल. याचा अर्थ चंद्रयान ३ एक तारखेला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदून चंद्राकडे फेकलं जाईल. चंद्राकडे जाता जाता ते आपली दिशा उलट करेल. 

वर लिहिलं तसं चंद्राच्या गुरुरुत्वाकर्षणच्या ताकदीत बंदिस्त होण्यासाठी चंद्रयान ३ चा वेग ७८५० किलोमीटर / तास इतका कमी होणं अपेक्षित आहे. त्यासाठीच उलट झालेलं चंद्रयान ३ आता उलट दिशेने आपली इंजिन्स प्रज्वलित करेल. एका अर्थी ही इंजिन्स ब्रेक लावण्याचं काम करतील. इंजिन किती वेळ प्रज्वलित करायची याच गणित चंद्रयान ३ ला आधीच फीड केलं गेलं आहे. एकदा का वेग अपेक्षित इतका कमी झाला की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे ते त्याच्या भोवती परिवलन करायला सुरवात करेल. पृथ्वी वर जसा वेग आणि कक्षा वाढवण्यासाठी मॅन्युव्हर केले गेले त्याच्या अगदी विरुद्ध वेग आणि कक्षा कमी करण्यासाठी चंद्राच्या कक्षेत मॅन्युव्हर केले जातील. चंद्रयान ३ मग १०० किलोमीटर X १०० किलोमीटर च्या गोलाकार कक्षेत आलं की विक्रम लॅण्डर चा पुढला प्रवास सुरु होईल. 

आता यामुळे जरी भारताला आणि पर्यायाने इसरो ला अंतराळात कसरती कराव्या लागल्या आणि चाराचे चाळीस दिवस झाले तरी मोहिमेच्या उद्दिष्ठानवर अथवा वैज्ञानिकांच्या तांत्रिक उपलब्धी वर काहीच फरक पडणार नाही. पण खूप फरक पडेल तो मोहिमेच्या खर्चावर. आज भारताची चंद्रयान मोहीम जगातील सगळ्यात स्वस्त चंद्र मोहीम आहे. ती इसरो ने केलेल्या जुगाडांमुळेच. भले आपल्याला ४० दिवस लागतील पण चंद्रावर जाऊन भारताला  स्पर्धा करायची नाही अथवा कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही. उलट भारत अश्या ठिकाणी चंद्रयान ३ उतरवतो आहे ज्याठिकाणी आजवर कोणीच गेलेलं नाही न कोणी आपले झेंडे गाडलेले आहेत. इसरो ने निवडलेली जागा अनेक कारणांसाठी विशेष आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव आजवर उपेक्षित आहे. तिकडे नक्की काय आहे याच अमेरिका सह जगातील सर्व वैज्ञानिकांना कुतूहल आहे. कारण चंद्राच्या कित्येक बिलियन वर्षाच्या इतिहासात आजवर तिकडे काय आहे हे गुलदस्त्यात आहे. 

अमेरिका, रशिया आणि चीन जरी ४ दिवसात तिकडे पोहचले. अमेरिकेने आपले १२ अंतराळवीर चंद्रावर उतरवले असले तरी जे त्यांना जमलं नाही ते भारताच्या चंद्रयान १ मोहिमेने करून दाखवलेलं आहे. चंद्रावर पाणी शोधण्याचा मान इसरो च्या या मोहिमेला मिळालेला आहे. तेव्हा चंद्रयान ३ येत्या काही दिवसात चंद्राच्या कोणत्या रहस्यांची उकल करते ते बघणं जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे ४० दिवसाचा प्रवास हा कित्येक बिलियन वर्षांची रहस्य उलगडणारा असेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तेव्हा ते ४ दिवसात गेले आणि आपण ४० दिवसात याचा उपापोह करण्यापेक्षा ४० दिवसांनी काय उलगडणार आहे याचा विचार प्रत्येक भारतीयाने करायला हवा. इसरो ची ही मोहीम यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तूर्तास व्हाट्स अप युनिव्हर्सिटी वर येणाऱ्या अश्या फॉरवर्ड न या त्यांची जागा दाखवा. 

जय हिंद!!!

फोटो शोध सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.