Tuesday 3 September 2024

व्हॉट अ शॉट'... विनीत वर्तक ©

व्हॉट अ शॉट'... विनीत वर्तक ©

"व्हॉट अ शॉट" या नावाने काल एक क्लिप व्हायरल झाली आणि मन पुन्हा एकदा भूतकाळात गेलं. १९९८ चा काळ आणि शारजा क्रिकेट ग्राउंड. भारत आणि ऑस्ट्रेलिया च्या त्या सामन्यात मायकेल कास्प्रोवीच ला सचिन तेंडुलकर ने मारलेला तो उत्तुंग षटकार आणि टोनी ग्रेग च्या मुखातून निघालेले तेच शब्द पुन्हा ऐकल्यासारखे वाटले. पण यावेळेस ते शब्द एका भाष्यकाराच्या मुखातून बाहेर आले होते ते एका १७ वर्षाच्या मुलीसाठी जिच्या प्रतिभेने जगाला तोंडात बोटे घालायला लावली आहेत. जगातील एकमेव खांदा वापरून तिरंदाजी करणारी आणि आधुनिक कंपाऊंड धनुष्य वापरण्यात जगातील क्रमांक १ ची खेळाडू भारताची शितल देवी हिच्यासाठी.  

शितल देवी भारताच्या मुकुटात म्हणजेच जम्मू काश्मीर इथल्या एका छोट्या खेडेगावात गरीब घरात राहणारी एक सर्वसामान्य मुलगी. जन्मतः फोकोमेलिया, या एका दुर्मिळ जन्मजात विकारामुळे आपले हात गमावून बसलेली. या आजारामुळे तिच्या हाताची वाढ होऊ शकलेली नाही. दोन्ही हात नसताना आपल्या मुलीच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलेलं आहे याची चिंता तिच्या आई वडिलांना लागून राहिलेली होती. शेती करणारे वडील आणि घरची बेताची परिस्थिती त्यात जम्मू काश्मीर सारखा संवेदनशील भाग अश्या सगळ्या खडतर परिस्थितीतून पुढे उज्ज्वल भविष्याचा विचार करण्याचं धाडस सर्वसामान्य माणसं करू शकत नाहीत. पण शितल वेगळी होती. म्हणतात न,

‘The only person stopping you is yourself. Where there is a will there is a way.’”

आपल्या दोन्ही हातांच्या नसण्याला शितल ने आपली सगळ्यात मोठं प्रेरणास्थान बनवलं. जे काम हात असणारी लोक करू शकतात ते आपण हात नसताना करून दाखवण्याचा चंग तिने बांधला. त्यातूनच मग हाताची काम पायाने आणि शरीराच्या इतर अवयवांच्या मदतीने करायला ती शिकली. मग ते लिखाण असो, केस विंचरण किंवा स्वतःला आरशात बघणं असो. वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत जगाच्या काय आपल्या गावाच्या खिजगणतीत नसलेल्या शितल मधल्या प्रतिभेला ओळखलं ते भारताच्या सैन्य दलाने. राष्ट्रीय रायफल या भारतीय सैन्य दलाच्या एका कार्यक्रमात हात नसताना फक्त आपल्या पायांच्या जोरावर शिताफितीने झाडावर सरसर चढणाऱ्या शितल मधील प्रतिभेला भारताच्या सैन्य दलाने अचूक हेरलं आणि तिथून सुरु झाला एक वेगळा प्रवास.

भारताच्या सैन्य दलाने तिला योग्य ती औषध, व्यायाम आणि तिच्यातील लपलेल्या तिच्या स्वतःच्या प्रतिभेची जाणीव करून दिली. तिला दिलेल्या वेगवेगळ्या पर्यायातून तिने तिरंदाजी मधे आपल्याला रस असल्याचं सांगितलं. पण तिरंदाजी करण्यासाठी हात असणं गरजेचं होतं आणि त्यासाठी कृत्रिम अवयव (प्रोस्थेटिक्स) बसवणं हा पर्याय निवडावा लागणार होता. पण प्रोस्थेटिक्स हा पर्याय शितल च्या बाबतीत अव्यवहार्य असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा शितल ने तिरंदाजी निवडण्याचा निर्णय घेतला. पॅराऑलम्पिक साठी भारतीय स्पर्धक तयार करण्याची जबाबदारी भारतीय सैन्याच्या या दलाने उचललेली होती त्यातून शितल च नाव पुढे आलं होतं. तिच्यातील प्रतिभेला पंखांचं बळ देण्यासाठी अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वाधवान या कोचेस नी अव्याहत प्रयत्न केले. त्यातून अवघ्या दोन वर्षात शितल ने तिरंदाजी चे संदर्भ आज बदलवून टाकले आहेत.

२०२२ च्या पॅरा एशियन खेळात शितल ने आपल्या प्रतिभेची चुणूक आणि भारतीय सैन्याने दाखवलेला विश्वास सार्थ करताना तब्बल दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. तिच्या वैशिष्ठपूर्ण अश्या धनुष्य बाण वापरण्याच्या कलेला अनेकांनी तेव्हाच कुर्निसात केला होता. दोन्ही हात नसताना ती तिचे धनुष्य तिच्या पायाच्या बोटांमध्ये पकडते आणि उजव्या पायाने उचलते. तिच्या जबड्याने बाण सोडण्यापूर्वी ती तिच्या खांद्याचा वापर करून स्ट्रिंग मागे खेचते. या गोष्टी वाचायला अतिशय सोप्या वाटत असल्या तरी प्रत्यक्षात करणं म्हणजे प्रत्यक्षात एखादं शिवधनुष्य उचलण्यापेक्षा कठीण काम आहे. जगात आजवर कोणीच असा पराक्रम महिलांच्या गटात करू शकलेलं नाही. यावरून शितल च्या प्रतिभेचा अंदाज आपण बांधू शकतो.

सध्या सुरु असलेल्या पॅरीस इथल्या पॅरा ऑलम्पिक खेळात आपल्या पहिल्या स्पर्धेत पहिला बाण सोडताना शितल ने 'बुल्स आय' म्हणजेच तंतोतंत लक्ष्याचा भेद केला. ते बघत असताना तिथल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि भाष्यकाराच्या अंगावर काटे उभे राहिले आणि नकळत त्यांच्या तोंडातून निघालं "व्हॉट अ शॉट". आजवर अनेक तिरंदाजांनी लक्ष्यच भेद केला असेल पण ज्या पद्धतीने,एकाग्रतेने आणि सर्व गोष्टी प्रतिकूल असताना शितल ने लक्ष्याचा भेद केला ते बघून आज सर्व जग म्हणते आहे. "व्हॉट अ शॉट"...

पॅरीस ऑलम्पिक मधे मेडल मिळवायला शितल कमी पडली असली तरी तिच्या प्रतिभेची जगाने नोंद घेतली आहे. नुसती नोंद नाही तर आज मेडल जिंकणाऱ्या स्पर्धकांपेक्षा शितल च्या त्या बुल्स आय ची चर्चा होते आहे. ज्यात विविध खेळातील जगातील नामवंत खेळाडू,समालोचक,प्रसिद्ध व्यक्ती समाविष्ट आहेत. असं म्हणतात,

"कभी कभी कुछ जीतने के लिए कुछ हारना भी पडता है. और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं"...

आज शितल भले ऑलम्पिक च्या स्पर्धेत स्वतःच पदक मिळवायला कमी पडली असेल पण मिश्र गटात तिने आणि राकेश कुमार यांनी मिळून भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली आहे. तिच्या कोच अभिलाषा चौधरी यांच्या मते,

“शीतल देवी ने तिरंदाजी निवडली नाही, तर तिरंदाजीने शीतलची निवड केली आहे.”

पॅरीस ऑलम्पिक मधे खेळाच्या २२ प्रकारात तब्बल ४४०० दिव्यांग खेळाडू समाविष्ट आहेत. प्रत्येकजण काहीतरी कमी असताना आपल्या प्रतिभेने ती कमतरता भरून काढत ज्यांची प्रकृती निरोगी आहेत त्यांना दाखवून देत आहेत की आपल्या इच्छा आणि आकांक्षेपुढे आकाश पण ठेंगणं आहे. याच पॅरीस ऑलम्पिक मधे एकीकडे आपल्या १०० ग्रॅम वाढलेल्या वजनाचा बाऊ करत राजकारण करून सर्व जगाला दोष देऊन स्वतःला मोठं करणाऱ्या खुज्या प्रवृत्तीच्या खेळाडूंना बघताना मन थोडं विषण्ण झालं होतं पण त्याच पॅरीस मधे आपल्या प्रतिभेने, आपल्या मेहनतीने आपल्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल रडत न बसता आपल्या त्याच कमतरतेला आपलं शस्त्र बनवत जगाला नोंद घ्यायला लावणाऱ्या शितल देवी ला माझा कडक सॅल्यूट. शितल देवी आता फक्त १७ वर्षाची आहे आणि माझ्या मते,

ये तो ट्रेलर हैं, पिक्चर अभी बाकी हैं....

असे अनेक शॉट शितल च्या भात्यातून निघतील की जग त्याची नोंद घेईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तूर्तास तिच्या त्या शॉट साठी फक्त आणि फक्त...

'व्हॉट अ शॉट'....

फोटो सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  



 

Friday 30 August 2024

स्टारलायनर... विनीत वर्तक ©

 स्टारलायनर... विनीत वर्तक ©


अवकाशात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधे अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनी (सुनीता) विल्यम्स यांना पृथ्वीवर पुन्हा सुरक्षित आणण्यासाठी स्पेस एक्स च्या क्रू ड्रॅगन चा वापर केला जाईल असं नासाने काही दिवसांपूर्वी स्पष्ट करून बोईंग स्टारलायनरच्या भविष्यापुढे एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. हि सगळी घटना काय आहे? कशामुळे असं घडलं आहे? तसेच याचे दूरगामी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम काय होतील हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

आपण जर नासा च्या इतिहासात डोकावलं तर अवकाश संशोधनासाठी स्थापन झालेली ही संस्था कोल्ड वॉर च्या काळात माणसाच्या अवकाशात झेप घेण्याच्या प्रवासातील एक मूलभूत संस्था म्हणून नावारूपाला आली. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवलं ते याच संस्थेच्या अपोलो मिशन च्या माध्यमातून. पुढे नासाने आणि पर्यायाने अमेरिकेने इतर देशांसोबत इंटरनेशनल स्पेस स्टेशन अवकाशात उभारलं. तिकडे संशोधनासाठी अवकाश यात्रींची ने आण करण्यासाठी स्पेस शटल प्रोग्रॅम सुरु केला. ३१ ऑगस्ट २०११ ला नासाने स्पेस शटल प्रोग्रॅम बंद केला. पण याआधीच २०१० साली नासाने कमर्शियल लॉंचेस आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अवकाश यात्रींची नेआण करण्यासाठी बोईंग कंपनीला स्पेस क्राफ्टच संशोधन करण्यासाठी ९२.३ मिलियन अमेरिकन डॉलर दिले. यातूनच जन्माला आलं ते स्टारलायनर. पुढे २०१४ साली नासाने बोईंग ला २०३० पर्यंत जोवर आय. एस. एस. सुरु राहणार आहे तोवर अवकाश यात्रींची नेआण ६ वेळा आय.एस.एस. वर करण्यासाठी ४.२ बिलियन डॉलर च कॉन्ट्रॅक्ट दिलं. त्याच वेळेस बोईंग ची स्पर्धक कंपनी स्पेस एक्स ला मात्र २.६ बिलियन च कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. स्पर्धेच्या बाबतीत बोईंग ने जरी आघाडी घेतली तरी ती बोईंग ला टिकवता आली नाही. स्पेस एक्स च क्रू ड्रॅगन जिकडे यशाची चव चाखत होतं दुसरीकडे बोईंग च स्टारलायनरच्या अडचणी वाढत जात होत्या.  

 २०१० नंतर प्रत्यक्षात स्टारलायनरच पहिलं उड्डाण व्हायला २० डिसेंबर २०१९ तारीख उजाडावी लागली. पण त्याही दिवशी स्टारलायनर आय.एस.एस. पर्यंत जाऊ शकलं नाही. अर्ध्या रस्त्यात पुन्हा त्याला पृथ्वीवर उतरवावं लागलं. जवळपास ८० पेक्षा जास्त त्रुटी नासा च्या इंजिनिअरिंग टीम ने स्टारलायनर मधे काढल्या. या सर्वांचं निराकारण करून मग पुन्हा उड्डाण करण्याचा विचार करण्याचा सल्ला बोईंग ला दिला. आधीच उशीर झालेल्या आणि आखून दिलेल्या बजेट पेक्षा जास्त खर्च होत चाललेल्या स्टारलायनर च्या प्रोग्रॅममुळे बोईंग च्या खिशाला कात्री बसायला सुरवात झाली होती. स्टारलायनर एक प्रकारे बोईंगसाठी पांढरा हत्ती बनत चाललं होतं आणि डोईजड व्हायला लागलं होतं. तिकडे याच काळात स्पेस एक्स च क्रू ड्रॅगन नासाच्या सगळ्या चाचण्यांमधून यशस्वीपणे पास होऊन अवकाशयात्रींची ने आण करत होतं. जुलै २०२३ मग ६ मे २०२४ त्यानंतर १८ मे २०२४, १ जून २०२४ अश्या सगळ्या तारखांना काही न काही कारणांमुळे स्टारलायनर च उड्डाण पुढे ढकलत राहिलं. शेवटी ५ जून २०२४ रोजी स्टारलायनर ने आय.एस.एस. कडे २ अवकाशयात्रींना घेऊन यशस्वी उड्डाण केलं. उड्डाण यशस्वी झालं तरी बोईंग च्या अडचणी संपल्या नव्हत्या.

५ जून २०२४ च्या दिवशी सुद्धा स्टारलायनर मधे हेलियम गळती असल्याचं नासा आणि बोईंग ला कळलेलं होतं. ही अवकाश यात्रा फक्त ८ दिवसांसाठी असल्याने आणि गळती अगदीच अडचणीची नसल्याने नासाने उड्डाणाला हिरवा कंदील दिला. ज्यावेळेस स्टारलायनर आय.एस.एस. शी डॉकिंग करण्याचा प्रयत्न करत होतं त्याचवेळी त्याच्या २८ थ्रस्टर पैकी ५ थ्रस्टर मधे तांत्रिक अडचणी येऊन ते बंद पडले. तरीपण स्टारलायनर यशस्वी पद्धतीने आय.एस.एस. शी जोडलं गेलं. नासाच्या दृष्टीने हेलियम गळती अवकाश यात्रींसाठी अगदी जिवन मरणाचा प्रश्न नसली तरी त्या सोबत थ्रस्टर च बंद पडणे हा स्टारलायनर आणि बोईंग च्या विश्वासार्हतेला खूप मोठा धक्का होता. चॅलेंजर आणि कोलंबिया या स्पेस शटल च्या अपघातानंतर नासाने आपल्या नियमात खूप बदल केलेले आहेत.  जिकडे अवकाश यात्रींच्या जिवाला धोका निर्माण होत असेल तर ती मोहीम अगदी शेवटच्या क्षणी रद्द करण्याची तसेच अर्ध्या रस्त्यात असेल तरीसुद्धा पर्यायी मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी स्पष्ट भूमिका नासाने घेतलेली आहे.

सामान्य माणसाच्या मनात येईल की स्टारलायनर वरील २८ पैकी ५ थ्रस्टर बंद पडली तर त्यात काय मोठं. उरलेले थ्रस्टर तर यानाला व्यवस्थित उतरवू शकतात. पण हे ५ थ्रस्टर का महत्वाचे आहेत ते समजून घेण्यासाठी आपण थोडं सोप्प उदाहरण घेऊ. समजा तुम्ही एखाद्या मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवत असाल तेव्हा तुमच्या गाडीचा ब्रेक थोडा हळू लागला तरी त्याने फारसा फरक पडणार नाही. पण हेच समजा तुमची गाडी एखाद्या ट्रॅफिक मधे असेल तर पुढल्या किंवा बाजूच्या गाडीची तुमची टक्कर होऊ शकते. आता विचार करा की ट्रॅफिक मधे तुमच्या गाडीच्या सर्व बाजूला फेरारी, पोर्शे, जॅग्वार किंवा मर्सिडीज सारख्या गाड्या आहेत. आता जर तुमचा ब्रेक लागला नाही तर त्या गाड्यांशी टक्कर झाल्यावर आलेला बारीकसा ओरखडापण तुमच्या गाडीच्या किमतीपेक्षा जास्त महाग पडू शकतो. आता हेच जेव्हा तुम्ही अवकाशात विचार कराल तेव्हा याची दाहकता कित्येक पट वाढलेली असेल.

स्टारलायनर वरील ५ थ्रस्टर काम करत नाही याचा अर्थ स्टारलायनर वरील चालकाचा म्हणजेच अवकाश यात्री जे स्टारलायनर चालवणार आहेत त्यांचा पूर्ण कंट्रोल त्यावर नाही. आय.एस.एस. वरून विलग होताना किंवा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना समजा योग्य तो वेग, कोन आणि कक्षा जर नियंत्रित झाली नाही तर स्टारलायनर स्वतः तर नष्ट होईल पण त्यासोबत आय.एस.एस. त्याच्या दुसऱ्या बाजूला डॉक असलेलं क्रू ड्रॅगन यांना सुद्धा त्याचा धोका आहे. नासा आणि बोईंग ने कश्यामुळे स्टारलायनर वरील थ्रस्टर बंद पडली यासाठी अनेक वेळा पृथ्वीवर चाचण्या केल्या त्या चाचण्यातून असं स्पष्ट झालं की प्रॉपेलंट पाठवणाऱ्या यंत्रणेत असणारी सिल अचानक घट्ट होत असल्याने प्रॉपेलंट चा पुरवठा बंद होऊन थ्रस्टर बंद पडलेली आहेत. सर्व २८ थ्रस्टर वर अशी यंत्रणा किंवा सिल वापरले गेले आहेत. पृथ्वीवर केलेल्या अनेक चाचण्यांमध्ये अचानक ते अश्या पद्धतीने जॅम होत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. चॅलेंजर दुर्घटनेला फक्त दोन ओ रिंग जबाबदार होत्या. इकडे तर कोणत्याच सिल बद्दल खात्री सद्यस्थितीला बोईंग चे इंजिनिअर देऊ शकत नाहीत. जोवर स्टारलायनर पुन्हा पृथ्वीवर उतरत नाही तोवर यामागचं नक्की कारण कळणं अशक्य आहे.

थ्रस्टर आणि हेलियम ची सुरु असलेली गळती या दोन्ही गोष्टी अवकाश यात्री आय.एस.एस. मधे रिपेअर करू शकत नाही. या स्थितीत स्टारलायनर ला अवकाश  यात्रींसोबत पृथ्वीवर उतरवण्याची जोखीम नासा घ्यायला तयार नाही. बोईंग च्या इंजिनीअर आणि स्टारलायनर टीम ने गेले जवळपास २ महिने हेच नासाच्या टीम ला समजावण्याचा प्रयत्न केला पण स्टारलायनर चा इतिहास आणि स्पेस शटल मधील अपघातांचा इतिहास लक्षात घेता नासाने बोईंग ला पर्याय शोधल्याच स्पष्ट केलं आहे. बोईंग च्या दृष्टीने हा सगळ्यात मोठा धक्का आहे. यानंतर स्टारलायनर च भविष्य काय असेल याबद्दल बोईंग सुद्धा सांशक आहे. कारण जर करारा प्रमाणे बोईंग नासाला स्टारलायनर वेळेत देऊ शकली नाही तर स्टारलायनर च्या निर्मिती वर झालेला खर्च बोईंग च्या खात्यातला असणार आहे. २०३० पर्यंत आय.एस.एस. ला रिटायर करण्याचं नासाने स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ बोईंग कडे फक्त ५-६ वर्षाचा कालावधी उरलेला आहे ज्यात कमीत कमी तीन वेळा तरी त्यांना अवकाश यात्रींची ने आण आय.एस.एस. वर करणं गरजेचं आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा नासाकडून स्टारलायनर ला या कामासाठी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला जाईल. पण सध्याची परिस्थिती बघता स्टारलायनर आणि एकूणच बोईंग च भविष्य दोलायमान आहे.

अवकाशात अडकलेले बुच विल्मोर आणि सुनी (सुनीता) विल्यम्स फेब्रुवारी २०२५ मधेच पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. ते स्पेस एक्स च्या क्रू ड्रॅगन मधून इतर दोन अवकाश यात्रींसोबत पृथ्वीवर येतील. यासाठी आता जाणारं क्रू ड्रॅगन आपल्यासोबत ४ ऐवजी फक्त २ अवकाश यात्रींचा क्रू घेऊन जाणार आहे. स्पेस एक्स ला मात्र स्टारलायनर च्या अपयशाने लॉटरी लागल्याचं स्पष्ट आहे. नासा ज्या मोहिमा स्टारलायनर सोबत करणार होती त्या सगळ्या आता स्पेस एक्स कडे जातील हे स्पष्ट आहे. रशिया आणि अमेरिका यांचे संबंध युक्रेन युद्धामुळे ताणले गेल्याने अमेरिकेला रशियाच्या यानाचा वापर करायचा नाही. पण स्टारलायनर च्या अपयशाने त्यांच्याकडे आता फक्त स्पेस एक्स च क्रू ड्रॅगन उपलब्ध आहे. तूर्तास हा वाढलेला काळ दोन्ही अवकाश यात्रींसाठी खूप खडतर असणार आहे. हे म्हणजे तुम्ही ८ दिवसांच्या ट्रिप ला निघालात आणि तुमचा मुक्काम ८ महिन्यांचा झाल्यासारखं आहे. पण हा मुक्काम अवकाशातील आहे त्यामुळे समोर उभ्या राहणाऱ्या अनेक अडचणी या तितक्याच मोठ्या स्वरूपाच्या असणार आहेत.

फोटो सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.  




Saturday 24 August 2024

बदला... विनीत वर्तक ©

बदला... विनीत वर्तक ©


७ ऑक्टोबर २०२३ चा दिवस इस्राईलसाठी एक काळा दिवस होता. याच दिवशी हमास या आतंकवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी इस्राईल मधे घुसून तब्बल १२०० लोकांची निर्घृण हत्या केली आणि जवळपास २५० लोकांना बंधक बनवून ओलीस ठेवलं. हा इस्राईलच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आणि इस्राईल ची जगप्रख्यात गुप्तचर संघटना मोसाद च अपयश म्हणून जगाने याची नोंद घेतली. इस्राईल च्या इतिहासात जर डोकावून पाहिलं तर इस्राईल आणि इस्राईल मधील ज्यू लोकं नेहमीच अश्या प्रकारच्या हल्ल्याच्या सावटाखाली जगत आलेली आहेत. पण इस्राईल च वेगळंपण इकडे उठून दिसते जिकडे ते स्वतःला ज्यू लोकांचं राष्ट्र म्हणण्यापासून कचरत नाहीत आणि जे लोक अश्या हल्ल्याला जबाबदार असतात त्यांचा अगदी पद्धतशीरपणे खात्मा करून आपला बदला घेण्याची वृत्ती इस्राईल आजही जगत आलेला आहे.

सप्टेंबर १९७२ च्या म्युनिच ऑलम्पिक मधे इस्राईल च्या ११ खेळाडूंचा खून करण्यात आला. याचा बदला घेण्यासाठी इस्राईल च्या तत्कालीन पंतप्रधान 'गोल्डा मेअर' आणि रक्षा मंत्री 'मोशे डायन' यांनी 'ब्लॅक सप्टेंबर' च्या हल्ल्यासाठी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आणि त्यात सामील असलेल्या सर्वांना संपवण्यासाठी "Wrath of God" नावाचं एक सिक्रेट मिशन आखलं. इस्राईल च्या मोसाद ने अगदी चुनचुनके यातील प्रत्येकाला यमसदनी पाठवून आपला बदला पूर्ण केला होता. यासाठी अनेक वर्ष लागली पण प्रत्येकाचा खात्मा केल्याशिवाय मोसाद शांत बसली नव्हती. हे सगळं मिशन संपूर्ण होई पर्यंत जगाला याचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळेच आजही मोसाद ही जगातली क्रमांक एक ची गुप्तचर संघटना मानली जाते. अमेरिकेची सि.आय.ए. सुद्धा अनेकवेळा मोसाद पुढे फिकी असल्याचं संरक्षण क्षेत्रातील अनेक जाणकारांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे.

त्यामुळेच ७ ऑक्टोबर २०२३ चा इस्राईल भूमिवरील हल्ला मोसाद च मोठं अपयश मानलं गेलं. पण शांत बसतील ती मोसाद कुठली. जेव्हा जग झालेल्या गोष्टी विसरून पुढे जायला लागलं तेव्हा मोसाद बदला कसा घ्यायचा याचे डावपेच आखत होती. शोले चित्रपटातील एक संवाद खूप प्रसिद्ध आहे, "गब्बर सिंग अगर तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे" त्याच प्रमाणे मोसाद आपला बदला घेण्यासाठी शांतपणे आपलं काम करत होती. १२०० लोकांच्या जिवाचा बदला घ्यायचा होता. तेव्हा तो असा असायला हवा की त्याची जाणीव आपल्या शत्रुपक्षाला झोपेत सुद्धा व्हावी. राजकुमार च्या संवादासारखं मोसाद ने ठरवलं हा बदला घेताना, 

"बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा".

३१ जुलै २०२४ चा दिवस उजाडला तोच मुळी मोसाद ने केलेल्या बदल्याची घोषणा करून. इराण च्या राजधानी तेहरान मधे घुसून मोसाद ने हमासच्या अध्यक्षाची हत्या केली. 'इस्माईल हनियेह' ची शिकार म्हणजे एखाद्या राजाच्या राजवाड्यात घुसून सर्व संरक्षण यंत्रणा त्याची रक्षा करत असताना त्याची हत्या करण्यासारखं होतं आणि आपल्या अंगाला एकही ओरखडा न होता सुखरूप तिकडून बाहेर पडणं होतं. त्यामुळेच हमास या संघटनेला जबरदस्त धक्का बसला आहे. त्याचसोबत हमास च्या अध्यक्षाची हत्या इराण मधे करून इस्राईल ने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. इस्राईल वर झालेल्या हल्या नंतर इस्राईल आणि मोसाद त्याचा बदला घेणार हे सर्वश्रुत होतं याचा अर्थ हमास मधील अधिकारी, त्याचे अध्यक्ष आणि अजून त्या संबंधित लोकांची सुरक्षा किती जागरूक असेल याचा विचार आपण करू शकतो. हे सर्व असताना अगदी शांतपणे मोसाद ने इस्माईल हनियेह यांची शिकार केली. मोसाद तेवढ्यावर थांबली नाही तर त्याच दिवशी हिजबुल्लाचा एक मोठा नेता आणि अधिकारी 'फौद शुक्र' चा खात्मा करत आपल्या शत्रूची दोन्ही बाजूने कोंडी केली आहे. एकाचवेळी दोन मोठ्या नेत्यांच्या हत्येनंतर शत्रुपक्षाच्या निर्णय क्षमतेवर एक प्रकारे अंकुश बसवला आहे.

इस्माईल हनियेह यांच्या हत्येनंतर इराण मधे एकप्रकारे अफरातफरी माजली आहे. इस्माईल हनियेह यांना एक प्रकारे व्ही.व्ही.आय.पी. सारखी सुरक्षा व्यवस्था असताना त्यांना त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या पलंगावर मारून मोसाद ने अक्षरशः हमास आणि इराण च्या किल्याला भगदाड पाडलं आहे. अश्या प्रकारची हत्या करण्याची यंत्रणा म्हणजेच ज्या पद्धतीची स्फोटके वापरण्यात आली ती आधीच तिकडे ठेवण्यात आली होती. ते तिकडे येणार हे मोसाद ला आधीच ठाऊक होते. याचा सरळ अर्थ हमास आणि इराण ची संरक्षण यंत्रणा मोसाद ने विकत घेतली आहे अथवा त्यांना फोडण्यात तिला यश आलं आहे. 

इस्माईल हनियेह यांच्या हत्येनंतर सगळ्यात मोठी अडचण आणि गोची अशी झाली आहे की आपलं नक्की कोण हे इराण आणि हमास दोघांनाही एक प्रकारे ठरवता येत नाही. कारण कोण विकलं गेलेलं आहे आणि कोण आपलं आहे याचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या हत्येनंतर किंवा मोसाद च्या मिशननंतर जे कोणी फितवले गेले आहेत त्यांना आपलं काय होणार याची पूर्ण जाणीव आहे. तरीसुद्धा आपल्या संघटने विरुद्ध आणि राष्ट्राविरुद्ध जाऊन मोसाद ला माहिती देण्यासाठी मोसाद ने काय पत्ते फिरवले असतील याचा विचार करण्याची गरज आहे. 

इस्राईल आणि मोसाद जगात आपला दबदबा राखून आहेत ते याच कारणामुळे. आपलं राष्ट्र, आपली माणसं आणि आपला धर्म हा त्यांच्यासाठी जिवापलीकडे श्रेष्ठ आहे. तिकडे पैसे आणि स्वतःच्या हितासाठी राष्ट्र विकलं जात नाही. राष्ट्रधर्म सर्वप्रथम असतो. त्यामुळेच इस्राईल बदला घेऊ शकते ते ही समोरच्याच्या नाकावर टिच्चून.  

"हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण"... विनायक दामोदर सावरकर

७ ऑक्टोबर २०२३ ला मोसाद चे अध्यक्ष 'डेव्हिड बारेना' यांनी सगळ्यांसमोर सांगितलं होतं की हमास संघटना चालवणारे जे कोणी लोकं आहेत, जे कोणी अध्यक्ष आहेत. ते जगात कुठेही लपून बसून दे. आम्ही त्यांचा खात्मा केल्याशिवाय सोडणार नाही. आज एक वर्ष पूर्ण व्हायच्या आत मोसाद ने आपला बदला घेतला आहे. हमास संघटनेच्या अध्यक्षाला संपवून आपलं बोलणं खरं करून दाखवलं आहे. यालाच म्हणतात बदला घेणं. समोरच्याला समोरून वार करणं आणि सांगून संपवणं याला जिगर लागते. ती जिगर इस्राईल आणि मोसाद कडे आहे कारण त्यांच्याकडे खरा राष्ट्रवाद आहे, राष्ट्रप्रेम आहे.

या घटनेचे पडसाद येणाऱ्या काळात निश्चित पडतील. उद्या कदाचित इराण इस्राईल विरुद्ध युद्ध पुकारले अथवा अजून हल्ले करेल पण याचा विचार इस्राईल आणि मोसाद ने आधीच केलेला असेल. आजही जागतिक घडामोडी चालू असलेल्या बघितल्या तर इराण च्या मोकाच्या ठिकाणावर इस्राईल हल्ले करून प्रतिहल्याची शक्यताच संपुष्टात आणते आहे. तिकडे मोसाद अजून शिकार करतेच आहे. एकूणच काय तर बदला अजून पूर्ण व्हायचा आहे. याचे परीणाम काहीही झाले तरी आपल्या नागरीकांच्या सांडलेल्या रक्ताची किंमत वसूल केल्याशिवाय इस्राईल आणि मोसाद शांत बसणार नाहीत हे उघड आहे. कोणाला हे अयोग्य वाटेल, कोणाला इस्राईल अमानुष वाटेल पण,

"खून का बदला खून होता है" हे उघड सत्य आहे.

फोटो सौजन्य :- गुगल

सूचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (विनीत वर्तक ©) कॉपीराईट आहे.